Thursday, May 8, 2014

पुणे विद्यापीठातील काही आठवणी........भाग 4

एक दोन दिवसांपूर्वी एक मित्र शेगाव ला माझ्याकडे आला. आम्ही सोबत शिकलेलो असल्याने खूप गप्पा रंगल्या. रात्री दीड-दोन वाजेपर्यंत आम्ही गप्पा करत होतो. विद्यापीठातल्या कित्येक प्रसंगांवर नि घटनांवर आम्ही चर्चा केली. मग त्याने मला विचारलं कि पुणे विद्यापीठातला तुला कुठला प्रसंग नेहमी आठवतो? मी थोडा वेळ थांबलो. मग त्याला सांगायला सुरुवात केली.
विद्यापीठात असताना कमवा आणि शिका योजनेत काम करून काही पैसे मिळायचे. महिन्याचा खर्च तर निघून जायचा. पण अभ्यास होत नाही म्हणून मी दुसर्या वर्षाला असताना ते काम सोडलं आणि फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. तेव्हापासून पैशाची कमतरता निर्माण झाली. मी पैसे उसने घेऊन कसतरी भागवत होतो. पण पैसे वेळेवर मिळत नव्हते. कधी कधी तर कित्येक दिवस एक रुपया हि खिशात नसायचा. डबेवाल्या चे पैसे दोन तीन महिने देणे शक्य होत नव्हते. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. पैसे नसतील तर अभ्यासात मन लागत नव्हत.
एकदा काय झालं कि रात्री डबेवाला आलाच नाही. माझ्याकडे पैसे नव्हते जेवणासाठी. कुणी देईल असंही नव्हतं कारण आधीच त्यांच्याकडून पैसे घेतलेले होते. म्हणून अभ्यास सोडून मी रूम ला जाऊन झोपलो. भूक खूप लागली होती पण उपाशी झोपण्याचा प्रयत्न सुरु होता. खूप वेळ झोप लागली नाही. सकाळी खूप लवकर जाग आली. रात्री जेवण केलेलं नसल्याने पोटात कावळे ओरडत होते. नाश्ता करण्याइतके पैसे पण नव्हते. भूक अनावर झाली होती. आंघोळ करून सरळ गेट च्या बाहेर आलो. समोर एका ठिकाणी खूप मुलं नाश्ता करत होती. पैसे तर नाही पण खायचं तर आहे. थोडा वेळ विचार करत पीएमटी बस stop वर बसलो. शेवटी सरळ रस्ता ओलांडला नि समोर गेलो. एक पोहे घेतले आणि खायला सुरुवात केली. पैसे कुठून द्यायचे हा प्रश्न होताच. पोहे तर खाऊन झाले. खूप गर्दी असल्याने त्या stall मालकाचं पण माझ्याकडे काही लक्ष नव्हतं. म्हणून हळू च तिथून काढता पाय घेतला ते नीट रूम ला जाऊन धडकलो. म्हणजे माणूस काय करू शकतो भूक लागल्यावर त्याचा प्रत्यय आला. प्रश्न फक्त दहा रुपयांचा होता पण ते हि माझ्याकडे नव्हते. हे इथेच संपलं नाही तर विद्यापीठातील ओपन कॅन्टीन ला पण पैसे न देतच दोन-तीन वेळा नाश्ता केला. हे करत असताना फार वाईट वाटलं. तरी पण मी ते करत गेलो. हे मला बदलायचं आहे या आशेवर मी जगत गेलो. आज पैसा आहे पण खाण्याची ती इच्छा नाही. पैसे खिशात असल्यानंतर कधीच भूक लागत नाही.
आजही हे प्रसंग आठवतात. हसायला येतं कधी कधी. पण ती परिस्थिती तशी होती. कुणाला फसवणं हा उद्देश नव्हताच कधी. नाईलाजास्तव हे करावं लागलं. माणूस परिस्थितीचा गुलाम असतो. असं माझ्याबाबतीत झालं असं नाही. असे अनेक आहेत. फक्त कुणी सांगत नाही. आणि मला असल्या गोष्टी सांगण्याचा भारी शोक. जे आपण केलं ते सांगण्यात कसली लाज. लाज असतीच तर असल्या गोष्टी केल्याचं नसत्या. करायला लाज वाटली नाही तर सांगायला कुठली आली लाज.
सगळं ऐकल्यानंतर आम्ही खूप हसलो. ते खरंच हसणं होतं कि चेहऱ्यावर चे भाव लपवण्याचा प्रयत्न होता याबद्दल मी साशंक आहे. यानंतर मात्र आम्ही फार काही बोललो नाही. अतिशय आनंदात सुरु झालेल्या आमच्या गप्पांना वेगळी वास्तवतेची किनार मिळाली होती. ते स्पष्ट जाणवत होतं. आणि असंच गंभीर होऊन आम्ही कधी झोपलो ते कळाल नाही. हा प्रसंग सांगावा कि नाही या विचारात मी होतो. पण खरं सांगण्याचा प्रयत्न केला. आजपर्यंत मला माहित असलेलं प्रसंग गुपित राहिलं नव्हतं. आज हि ती परिस्थिती आठवली कि मन स्तब्ध होतं. मनाची ती घालमेल. चुकीचं करताना सापडलो तर किती अपमान होईल असे वेगवेगळे विचार आणि तरीही आपण तशी कृती करायला धजावतो. आहे ना कोडं. जे कधी सोडवता येत नाही. ते फक्त कोडं बनून राहते. मलाही ते कोडं सोडवायचं नाही. भरपूर गोष्टी करायच्या आहेत. मागचं सगळं विसरून पुढे जायचं आहे. जन्माला घालताना निसर्गाने विसरण्याची कला द्यायला हवी होती. कमीत कमी आनंदाने जगता आलं असतं. कारण आठवणी पाठ सोडत नाही. जेवढं विसरण्याचा प्रयत्न करावा तेवढं जास्त आठवतो. कदाचित यालाच जीवन म्हणतात.

पुणे विद्यापीठातील काही आठवणी....भाग 3


पाच-सहा वर्षांच्या कालावधीत पुणे विध्यापिठात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. काही गोष्टी अंगाशी आल्या पण सुदैवाने त्यातून सहीसलामत बाहेर पडलो. पुणे विद्यापीठ म्हणजे विद्येचं माहेरघरच नाही तर आंदोलनांच पण. मी त्यात पडणार नाही असं होणार नव्हतंच. तिथे असताना प्रत्येक आंदोलनात भाग घेतला. त्यातून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. पण सगळीच आंदोलन योग्य असतात असं नाही. काही चुकीची आंदोलन पण पाहायला मिळाली. कमवा आणि शिका संदर्भात झालेलं आंदोलन त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणता येईल. राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी केलेलं ते आंदोलन. पूर्णपणे चुकीच होत. पण मागे हटतील ते राज्याशास्राचे विद्यार्थी कसले. आधीच त्यांना असं वाटायचं कि सगळं त्यानांच कळते. विषय कुठलाही असो त्यात ते पारंगत असल्याचा त्यांचा भास. प्रत्येक जन स्वतःला राजकारणाचा विश्लेषक समजायचा. काही अपवाद आहेत. दुर्दैवाने त्याचं त्याचं ते आंदोलन यशस्वी झालं होतं. यात काही शहाण्या पत्रकार मंडळीनीही खूप प्रसिद्धी दिली या प्रकरणाला. ते पण त्याचं विभागातून शिकून पुढे वृत्तपत्रपदविका करून पत्रकार झाले होते. त्यामुळे खरं काय नि खोटं काय कुणीही जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. असो. झालं गेलं गंगेला मिळालं.

मी विद्यापीठात गेल्यानंतर कॅन्टीन संदर्भात झालेल्या आंदोलनात सहभाग घेतला. त्यात ओपन कॅन्टीन ची थोडी तोडफोड पण केली. मॉब असल्यावर काही पण करता येतं. तिथून मग असल्या निरर्थक भानगडीमध्ये पडणे हा माझा हक्कच झाला. मग ते एम फिल स्टायपेंड, होस्टेल च आंदोलन असो कि अजून काही. सहभाग सुरूच राहिला ते एक प्रकरण अंगाशी येईपर्यंत.

ते झालं असं कि एकदा मी एम फिल ला असताना पाच नंबरच्या वसतिगृहात राहायचो. रात्रीचे एक-दीड वाजले असतील. एका जुनिअर चा फोन आला कि कुणीतरी आजारी आहे. हेल्थ सेंटर ला आलोय पण डॉक्टर काही प्रतिसाद देत नव्हता. मग काय आम्ही दोन तीन मित्र हेल्थ सेंटर ला गेलो. दरवाजा ठोकून पाहिला, फोन करून पाहिला, आवाज देऊन झालं पण डॉक्टर काही बाहेर येत नव्हता. मग मी दगड भिरकावून काच फोडली. क्षणार्धात डॉक्टर आपल्या पत्नीसह बाहेर आला. फार रागात होते ते. भरपूर तोंड सुख घेतलं त्यांनी माझ्यावर. सेक्युरिटी तेथे होताच. कारवाई करा म्हणत होतं. काही वेळानंतर अजून दोन-तीन सेक्युरिटी आले. डॉक्टर महाशय माफी मग असं म्हणत होते नि नुकसान भरपाई मागत होते. मी नाही म्हटलो. मी माफी मागितली नाही. कारण आई-वडिलांनी मला माफी मागायला कधी शिकवलं नाही किंवा शिकवलं असेल मी ते लक्षात ठेवलं नसेल. माफी मागितली असती नि भरपाई दिली असती तर पुढची प्रक्रिया टळली असती कदाचित. पण माज जास्त होता माझ्यात. केलेल्या कृत्याचा मला पश्चाताप नव्हता. 

मला चिंता होती पुढे काय होणार त्याची. तसं पाहिलं तर माझ्यापुढे पर्याय होता. बाईक असल्याने बाहेर हॉस्पिटल ला जान शक्य होतं. पण कुणाच्याच डोक्यात आलं नाही. कारण विद्यापीठ म्हणजे आपल्या बापाचीच मालमत्ता असं प्रत्येकाचा समज. मी पण त्यातलाच एक. नंतर मेन बिल्डींग ला सेक्युरिटी ऑफिस मध्ये जाऊन माझ्याकडून सगळं लिहून घेण्यात आलं. रात्री २ वाजेपासून सकाळी सहा वाजेपर्यंत मी तिथेच होतो खुर्चीवर बसून. सकाळी रूम ला जाऊन फ्रेश होऊन आलो. मग माझ्यावर कारवाईची प्रक्रिया सुरु झाली. दरम्यान डॉक्टर दाम्पत्यानं रजिस्ट्रार कडे तक्रार केली होती. त्यामुळे निर्णय लांबला नि मला सोडण्यात आलं. सगळा प्रकार माझ्या विभाग प्रमुखाला कळवण्यात आला. त्याने मला बोलावून चांगलीच खरडपट्टी काढली. मी काहीच बोललो नाही. ज्या व्यक्तीसाठी मी हे सगळं केलं होत तिने सांगितलं कि मला तिने बोलावलं नव्हतं. मी स्वतःच आलो होतो असं ती म्हटली. तिचा आणि माझा फार काही संबंध नव्हता. मी तिच्याशी कधी बोललेलो पण नव्हतो. पण आपली समाजसेवा काय करणार. नको तिथे हस्तक्षेप करायचा. मी या प्रकरणात चांगलाच अडकलो होतो. विभाग प्रमुखांशी माझे संबंध चांगले नव्हते त्यामुळे आपली आता वाट लागणार हे कळून चुकलं होतं. 

दोन-तीन दिवसांनी मला मिटिंग ची नोटीस मिळाली. स्थळ होतं रजिस्ट्रार ऑफिस. तेथे मी, विभागप्रमुख, दोन्ही होस्टेल चे रेक्टर, रजिस्ट्रार, सेक्युरिटी आणि डॉक्टर असे सगळे होते. मग प्रत्येकाने मी कसा चुकीचा आहे नि माझा कसा इतर घटनांमध्ये कसा सहभाग होता हे कथन केलं. आमचे विभागप्रमुख तर म्हटले याला जेल मध्ये टाका नि एम फिल रद्द करा. रेक्टर चं हि तेच मत. डॉक्टर ला तर तेच हवं होत. पण सगळं ऐकून झाल्यावर रजिस्ट्रार ने मला खूप शिव्या घातल्या नि माझ्या समोर दोन पर्याय ठेवले. एक मी आई-वडिलांना बोलावून त्यांच्यासमोर माफी मागावी अन दुसरा एम.फिल रद्द करावं अन्यथा आम्ही करू ते असं सांगण्यात आलं. मी फक्त ऐकत होतो. शेवटी मी म्हटलो कि आई-वडिलांना बोलावणे शक्य नाही. पण मी होस्टेल सोडून बाहेर राहायला जातो. बाकी कुठलाच पर्याय मला मान्य शक्य नव्हता. नंतर विनंती करून मी ते मान्य करून घेतलं. बाहेर येऊन आधी तेच करण्यात आलं. होस्टेल जमा करण्यात आलं. पण मी काही बाहेर जाणार नव्हतो. माझ्यानंतर होस्टेल माझ्या मित्राला मिळणार हे मला माहित होतं. त्याने लगेच होस्टेल ऑफिस ला जाऊन रूम मिळवली नि मी त्या रूम मध्ये आयुष्यात पहिल्यांदा अनधिकृत राहायला लागलो. कारवाई झाली होती पण माझ्या वर त्याचं फार काही फरक पडलं नव्हता. हे सगळं करत असताना जो मनाचा खंबीरपणा हवं होता तो माझ्याकडे होता म्हणून या प्रकरणात साहिसाहालामात बाहेर पडलो.

हे माझं शेवटच प्रकरण. नंतर मी कधीही कुठल्याही प्रकरणात सामील झालो नाही. काही फायदा होत नाही. आपण अडकलो कि कुणी आपल्या मागे येत नाही हे कळून चुकलं. कारवाई झाली याचं मला कधीच वाईट वाटलं नाही. वाईट वाटलं ते फक्त एका गोष्टीचं कि ज्या व्यक्तीसाठी मी हे केलं होतं त्या व्यक्तीने तरी मला साथ द्यायला हवी होती. पण तसं झालं नाही. त्यामुळे मी पराभव स्वीकारला. लढून उपयोग नव्हताच मग. माझ्या या कृतीचे वेगवेगळे अर्थ काढल्या गेले. खूप चर्चा झाली पण मी कधी त्यावर बोललो नाही. एकटा पडलो होतो मी त्या प्रकरणात. माझं विद्यापीठातल आयुष्य संपलं असं मला जाणवायला लागलं होतं. मी ज्या उद्देशान इथे आलो तो उद्देश कधीच मागे पडला होता. त्याचं मला काही सोयरसुतक नव्हतं. त्यापासून मी खूप दूर गेलो होतो. आणि आता वापस येणे शक्य नव्हते. हळू-हळू मी बाहेर पडायला सुरुवात केली. माझं मन लागत नव्हतं तिथे. एकीकडे नेट/सेट पास होत नव्हतो तर दुसरीकडे असल्या रिकाम्या गोष्टी सुरु होत्या. दुसर्यांना मदत करण्याचा भारी शौक नडला. नंतर अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा खूप प्रयत्न केला पण ते काही जमलं नाही. मग अभ्यास कमी झाला तो झालाच. माझे काही हितशत्रू विद्यापीठात होतेच. त्यांना फार आनंद झाला मी अडकलो त्याचा. या प्रकरणातून मी खूप काही शिकलो. गरज असते तेव्हा कुणी मदतीला येत नाही. ज्याच्यासाठी काही कराव ते पण पाठींबा देत नाही.

या घटनेनंतर खूप दिवसांनी मी महाराष्ट्र बँकेत गेलो होतो. तिथं डॉक्टर अन माझी भेट झाली. मी सॉरी म्हटलो तेव्हा. डॉक्टर पण इट्स ओके म्हणून निघून गेला. आयुष्यात पहिल्यांदा कुणालातरी मनापसून सॉरी म्हटलं होतं. नाहीतर सॉरी हा शब्द आपल्या डिक्शनरी मध्ये नाही. चुकीच्या गोष्टीचं समर्थन करण्यात अन चुकीच्या गोष्टी करण्यात निम्मे आयुष्य गेलं. माझ्या दृष्टीने तेच जीवन. इतरांपासून वेगळ होण्याच्या नादात मी अनेक चुका केल्या. मागे वळून पाहताना फक्त चुकांचा ढीगच दिसतो जो कि आता दुरुस्त होऊ शकत नाही. तरीही आज जेथे आहे तेथे व्यवस्थित आहे. चुकांचा आयुष्यावर फार काही परिणाम झाला नाही ते बर झालं.....

पुणे विद्यापीठातील काही आठवणी: भाग-२


पुण्यात दोन वर्ष कसे निघून गेलेत कळलंच नाही. पुण्यात नाही पुणे विद्यापीठामध्ये. कारण शहरात जाने कधी शक्य झाले नाही. शहरात जायचं म्हटलं तर पैसा हवा आणि तोच माझ्याकडे नव्हता. त्यामुळे आमचा मुक्काम विद्यापीठातच. फार झालं तर एबीसी त पुस्तके आणायला जायचो. पुण्यात राहून पुणे काय हे जॉब करेपर्यंत कळाल नाही. विद्यापीठ खरं तर एक मोठ खेड. तिथं विद्यार्थी हि खेडयातलेच जास्त. त्यामुळे आपण शहरात राहतो हा भास कधी होत नव्हता. 

तीन वर्ष नेट-सेट चा अभ्यास केला पण यश काही मिळेना म्हणून जॉब सुरु केला. खर्या अर्थानं पुणे तेव्हा कळायला लागलं. इ स्क़ेअर ला पीएमटी मधून पाहिलं होतं फक्त. पण चित्रपट पाहणं शक्य झालं नाही. जॉब सुरु केल्यानंतर मात्र हे सगळं बदलत गेल. मग काय. जयकर कमी अन बाहेर जास्त. सोबतीला नवीन दुचाकी. काही सांगायलाच नको. रात्री बेरात्री शहरात फेरफटका मारणं...सारसबाग...पार्वती...शनिवारवाडा ....चतुश्रुंगी.........शनिवार अन रविवार ला...सिंहगड, तोरणा, लेण्याद्री, भीमाशंकर, राजगड, शिवनेरी, रांजणगाव, लोणावळा, थेऊर, मोरगाव असं सगळं पालथं घातलं. मुव्ही तर नेहमीचेच झालेत. आम्ही चार पांच मित्राचं फक्त हेच काम. कंटाळलो होतो त्या जयकर ला. पण या सगळ्या प्रक्रियेत अभ्यासापासून कसं दूर गेलो ते लक्षात आलंच नाही. अभ्यासात पूर्वीसारखा जोश नव्हता. तेच ते वाचून कंटाळवाण झालं होतं. सलग दोन वर्ष पुणे आणि आसपास असलेली सगळी ठिकाण भटकून झाली त्यामुळे पुणे सोडताना काहीच वाटलं नाही. फक्त तुळशीबाग नाही पाहिली कारण ती काही आपल्यासाठी नाही हे माहित होतं. आमचे काही मित्र मात्र मैत्रिणींसोबत नेहमी तुळशीबागेत जायचे. काय खरेदी केलं त्यांनी ते कधी सांगितलं नाही विचारलं तरी.

वसतिगृहात राहताना फार मजा आली. कधी अनधिकृत रहायची वेळ आली नाही ते सुदैव. देकून चा त्रास सोडला तर सगळं व्यवस्थित होत. पाच नंबरच्या वसतिगृहात राहताना वाटेल तसं आयुष्य जगायला मिळालं. तिथं राहण्यात एवढी मजा होती कि डेंगू ची साथ असताना सुद्धा आम्ही काही मित्र घरी गेलो नव्हतो. ती भन्नाट शांतता अजूनही आठवते. एवढं मोठं वसतिगृह अन मोजून १०-१५ विद्यार्थी राहत होते त्या कालावधीत. तिथं अनेक प्रसंग घडलेत. काही लक्षात आहेत. त्यातला एक प्रसंग. 

दिवाळी चा काळ होता. आम्ही दोन-तीन मित्रांनी ठरवलं कि इथे राहुनच अभ्यास करायचा. जेमतेम पैसे होते आमच्याकडे. या कालावधीत मेस बंद असते म्हणून खिचडी करायची असं ठरलं. मग झाली जुळवाजुळव सुरु. शेगडी नि भांडी मित्रांकडून गोळा केली. आम्हाला वाटलं खिचडी करणे फार अवघड नाही. पहिला दिवस होता मेस बंद असण्याचा. तांदूळ वगैरे आणून झालेत. पैसे जेमतेम असल्याने नाश्ता वगैरे बंद होतं. पातेल शेगडीवर ठेवलं नि एक एक वस्तू टाकत गेलो. भूक खूप लागली होती. सगळ पातेल भरून तांदूळ टाकलेत. आणि पाणी टाकल. आता एवढे दिवस हे हि माहित नव्हतं कि तांदूळ फुगतात. व्हायचं तेच झालं. थोड्या वेळाने जळल्याचा वास यायला लागलं. पाहतो तर काय. पाणी कधीच संपलेलं नि तांदूळ करपायला लागलेलत. मग सगळं प्रकार लक्षात आला. तरी आम्ही जिद्द सोडली नाही. मग त्यातले अर्धे तांदूळ काढून पुन्हा सगळी प्रक्रिया. असं करून दोनदा खिचडी बनवून खाल्ली. करपलेली होती पण काय करणार. भूकेपुढे कुठलाही इलाज नव्हता. खरं तर ती पण फार छान वाटली. दोन तीन दिवसांनी मात्र सगळ व्यवस्थित करायला लागलो. सलग दहा दिवस खिचडी खाल्ली. अपवाद फक्त एका दिवसाचा. पोट काही नव्हतं म्हणून बहिणीकडे जाऊन डबा आणला आमच्यासाठी. सकाळी गेलो ते संध्याकाळी परत आलो. त्या दिवशी आमच्या मित्रांचे एवढे फोन आलेत कि ते आयुष्यात कधी आले नाहीत. ते वाट पाहत होते मी कधी येतो म्हणून. संध्याकाळी चपात्या खाताना सगळयांचे चेहरे पाहण्यासारखे होते. न बोलता जेवण सुरु होत. मग कुठं सगळ्यांचे चेहरे खुलले होते. चपात्यांची बरोबरी खिचडी करणार नाही. दिवसातून दोन-तीन वेळा करावी लागत होती. अभ्यास करण्यासाठी थांबलो होतो पण झालं भलतच. दिवस-रात्र फक्त खाण्याच्या नियोजनात जात होतं. खोदा पहाड निकाला चुहा असं म्हटलं तरी हरकत नाही. नंतर खिचडी कित्येक वेळा केली, म्हटलं तर प्रत्येक रविवार ला. पण चांगला धडा मिळाला. पोटात अन्न नसेल तर डोकं पण चालत नाही. खिशात पैसे असताना कधी भूक लागली नाही किंवा लागत नाही पण पैसे नसताना पोटात कावळे ओरडतात. 

एलीस गार्डन चे फेरफटके तर नेहमीचे. प्रेमियुगुलांसाठी उत्कृष्ट ठिकाण. तेही निसर्गरम्य वातावरणात. काही तर तिथे अभ्यास करायला जायचे. नेमका किती आणि कसा अभ्यास व्हायचा ते सांगता नाही येणार. तिथं बसलेलं प्रेमीयुगुल पाहणं आम्हाला फार छान वाटायचं. मी आणि माझा मित्र संध्याकाळी न चुकता एलीस गार्डन मधून चक्कर मारून यायचो. कधी कधी आमचे मित्र हि सापडायचे तिथं त्यांच्या मैत्रिणींसोबत. आम्हीं पण न पाहिल्यासारखं करत होतो मग. आमचा मित्राला असल्या गोष्टींमध्ये फार रस. त्या निमित्ताने माझी हि सुप्त इच्छा जागृत व्हायची. मी सांगत नव्हतो पण छान वाटायचं त्या सगळ्या गोष्टी अनुभवताना. त्यातून निष्पन्न काही होत नव्हतं तो भाग वेगळा. पण ते वय असते. त्यातली मजा हि काही औरच.

पुणे विद्यापीठातील काही आठवणी भाग -१

 काही आठवणी....


२००६ ची वेळ....पूण्यामध्ये नुकताच गेलो होतो. पहिल्या दिवशी वाटलं आपण काही पुण्यात राहू शकत नाही. तसंही मन जळगाव अन तिथल्या आठवणींमध्ये गुंतलेलं. सुरुवातीचे काही दिवस तर शिवाजी पुतळ्याजवळ घालवले. पण नंतर तेही नकोसं झालं. दिवसभर इंग्रजी विभागात जाऊन तत्त्वज्ञान ऐकून काही कळत नव्हतं. सगळं इंग्रजी मध्ये असायचं. आता इंग्रजी कधी माझ्या बापाला कळली नाही. अन शिक्षकांना हि फार काही इंग्रजी येत होत असंही नाही. पदवी पर्यंत सगळं इंग्रजी मराठीतून शिकलो. परीक्षेला घोकंपट्टी केली कि मिळाले गुण असं समीकरण. पण इथे पुण्यात तसं नव्हतंच. आपलं सगळं जेमतेम. त्यात हि विभागातील लोक फाडफाड इंग्रजी बोलायचे. वाटायचं काय भारी शिकवायचे कारण डोक्यात काहीच जात नव्हतं. कित्येक दिवस तर मागे बसून डुलक्या देण्यापलीकडे काहीच केलं नाही. समोरची चार पाच डोकी काहीतरी बोलत असायची. आम्ही मात्र शांत. त्यांच्या काय चर्चा चालायच्या कधी कळल्या नाही. त्या सगळ्यांचा हेवा वाटायचा. पण फक्त हेवाच वाटला. ते कधी बदलावं वाटलं नाही. आपण मराठी मानसं अशीच.

दिवसामागून दिवस जात राहिलेत. हळू हळू त्या वातावरणाचा सराव झालं. काही मित्र झालेत. सगळा वर्ग ग्रुप मध्ये विभागाला गेला. मग खर्या अर्थानं पुण्यातलं जीवन सुरु झालं. तोपर्यंत चार-पांच महिने निघून गेले होते. एकदा रूम मधून बाहेर पडलो कि रात्रीच वापस यायचं. कमवा आणि शिका....जयकर आणि आपला विभाग यातच दिवस जात होतं.
जयकर ग्रंथालय म्हणजे सगळ्या प्रकारची लोकं एकाच ठिकाणी. सुरुवातीला तिथं अभ्यास करायला फार मजा यायची. प्रत्येकाच्या जागा हि ठरलेल्या जस काय त्या आपल्या बापाच्या च आहेत असा प्रत्येकाचा आविर्भाव. काही तर एकदा पुस्तकं जागेवर ठेवली कि रात्रीच घ्यायला यायचे. कुठं जायचे ते माहित नाही...पण अनिकेत कॅन्टीन किंवा मेन बिल्डींग च्या मागे कुणासोबत तरी बसलेले दिसायचे. तो हि एक प्रकारचा अभ्यासच होता. काहींची प्रेमप्रकरणं विध्यापिठात माहित असायची. त्याचं ते एका डब्यात खाणे...जवळ बसून अभ्यास करणं....सोबत चहाला जाने...नि रात्रीला तिला सोडायला होस्टेल पर्यन जाने सगळं काही व्यवस्थित चालायचं. कधी कधी ते विचित्र वाटायचं तर कधी या सगळ्या गोष्टींचा हेवा वाटायचं.

सकाळी जयकर आलो कि वृत्तपत्र वाचल्याशिवाय मन लागत नव्हतं. म्हणून काही वेळानंतर चहाला गेलो कि वृत्तपत्र घेऊन यायचो. वाचायला लागलो कि आजूबाजूचे त्यात डोकावायला सुरु करायचे. ते म्हणजेच फुकटे पेपर वाचक. आपण वाचण्याआधीच ते एक दोन पण काढून घ्यायचे नि आपल वाचन संपण्याची वाट पाहायचे. तिथले फुकटे पेपर वाचकांचा मला फार राग यायचा. मी कधी कुणाकडून वृत्तपत्र घेऊन वाचलं नाही. काही दिवसानंतर मी कुणालाच वृत्तपत्र देत नव्हतो. जयकर अंगवळणी पडलं होतं. तिथेच बसून कित्येक लोकांचं भविष्य उज्ज्वल झालं. पण मला काही जयकर पावलं नाही. सलग दोन-तीन वर्ष जयकर मध्ये बसून हातात काहीच नाही आलं. सगळं मिळालं ते जयकर बाहेर राहुनच. मग एकदा जयकर सोडलं ते सोडलच. पण त्या जयकर ने खूप मित्र दिलेत. खूप आठवणी दिल्यात. भांडण पण खूप झाली. तो माझा अपरीपक्क्वपण असेल कदाचित.

एक दोन वर्षानंतर मात्र जगणं बदललं. तासनतास अनिकेत कॅन्टीन ला बसून वेळ घालवायचा नि चहा ढोसलत राहायचे. आमचे मित्र हि बरोबर पाहिजे त्या गोष्टी घेऊन यायचे. मग गोल्ड्प्लेक पासून गुडंगगरम पर्यंत.....सगळे प्रकार उपलब्ध. सोबतीला चर्चा असायच्या . चर्चा नाही वादविवाद. त्यात किती वेळ घालवला ते सांगता येणार नाही पण त्या अनिकेत कॅन्टीन ने खूप मित्र दिलेत किंवा त्या प्रक्रियेत खूप मित्र झालेत. कित्येक लोकांनी माझ्यावर टीका केल्यात. पण त्या मी दुर्लक्ष करत गेलो. मला कधी कळलंच नाही कि मी कसा भरकटत गेलो. गेलो ते कधी रुळावर आलोचं नाही. तो अपयशाचा काळ कधी विसरता नाही येणार. पण काही मित्रांनी खूप साथ दिली. जयकर मध्ये कधी मन लागलं नाही नंतर. हळू-हळू जयकर सोडलं ते सोडलच. खर तर जयकर सोडायला नको होतं पण संयम नव्हता माझ्याकडे.

आत्ता ते सगळं आठवतंय. विद्यापीठान खूप शिकवलं ते हि नकळतपणे. विद्यापीठात प्रवेश केला तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं. एक साध आयुष्य होतं. बाहेर पडताना मात्र आयुष्य बदलेलं होतं. जगण्याच्या संकल्पना बदलल्या होत्या. जग खूप मोठं आहे नि संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही हे हि समजलं होतं. अभ्यासापलीकडच आयुष्य शिकायला मिळालं. भलेही विद्यापीठात यश मिळालं नसेल पण जी शिकवण तिथं नकळत मिळाली जी जगण्यास पुरेशी होती