Tuesday, December 17, 2019

महिला सशक्तिकरण (Women Empowerment)

महिला सशक्तीकरण...भरपूर लिखाण झालंय...बोलल्या गेलंय...गल्ली-बोळापासून तर संसदेपर्यंत चर्चा...चर्चा आणि चर्चा फक्त. कुठंय महिलासशक्तीकरण हा प्रश्न पडल्याखेरीज राहणार नाही.
स्त्री म्हणजे दुर्बलता ....काहीतरी कमी असं ओबळ-ढोबळ चित्र प्राचीन काळापासून रंगवण्यात आलंय. त्याच्या बाहेर यायला आपण अजूनही तयार नाही. आजकाल स्त्रिया विविध क्षेत्रात काम करत आहेत. चांगल्या पदावर आहेत. पुरुषांपेक्षा कुठेही कमी नाहीत. अशा स्त्रियांचं प्रमाण किती? अगदी नगण्य...ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत.
अधून-मधून महिला आरक्षणाच्या गप्पा होतात...चर्चा झडतात.  पण राजकीय आरक्षण देऊन भागणार आहे? जे काही आहेत त्यात काय दिसून येतंय...अनेक ठिकाणी महिलांचे कारभार त्यांचे पती महाशय पाहतात. महिला फक्त सयाजीराव.
शिकत असताना सिमोन दि बोव्हा चं द सेकंड सेक्स नावाचं पुस्तक वाचनात आलं होतं. फार काही समजलं नाही. पण स्त्री स्वातंत्र्य वगैरे काय तेवढं लक्षात राहिलं. त्या स्त्री आणि पुरुष यांचातला भेदाभेद मस्त मांडलाय.

 Two separate beings, in different circumstances, face to face in freedom and seeking justification of their existence through one another, will always live an adventure full of risk and promise." (p. 248)” Simone de Beauvoir, The Second Sex

Representation of the world, like the world itself, is the work of men; they describe it from their own point of view, which they confuse with absolute truth.” Simone de Beauvoir, The Second Sex

Man is defined as a human being and a woman as a female — whenever she behaves as a human being she is said to imitate the male.” Simone de Beauvoir
तसंच कमला दास याचं आत्मचरित्र माय स्टोरी मध्यंतरी वाचनात आलं. स्त्री स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या असलेल्या कमला दास याचं लिखाण म्हणजे पुरुषी परंपरेला छेद देणारं. सडेतोड...ज्या विषयवार सहजासहजी कुणी बोलत नाहीत त्यावर त्यांनी परखड भाष्य केलंय. जे शब्द चार-चौघात आपण बोलायला अजूनही अडखळतो त्यावर त्यांनी परखड लिहिलंय. एका स्त्रीच्या च्या वेदना म्हणा...स्वातंत्र्याची आस म्हणा किंवा अजून काही.
स्त्री-पुरुष यांच्यातला भेदाभेद आलातरी कुठून? त्याची सुरुवात कुठून...प्रत्येक घरात...प्रत्येक माणसाच्या मनात...जीन्स मध्ये म्हटलं तरी चालेल.
निसर्गाने निर्माण करताना कधीही भेदभाव केला नाही. आपण मात्र प्रत्येक ठिकाणी भिंती निर्माण केल्या.
प्रत्येक गोष्टीची सुरुवात घरापासून होते. कायदा करून, नियम बनवून महिला सशक्तीकरण  होणार नाही. आपण बदललं पाहिजे. बुरसटलेल्या मानसिकतेतून बाहेर यायला हवं.
सबरीमाला मंदिर असो, शनी-शिंगणापूरच शनी मंदिर असो अथवा अनेक अशी मंदिरे जिथे स्त्रियांना प्रवेश निषिद्ध होता त्यावर झालेला वाद आठवत असेल. कुणी सांगितलं हे. पुरुषी संस्कृती...दुसरं काय?
मालिका असो, चित्रपट असो stereotype सुटत नाही. थोडा-बहुत बदल व्हायला लागलाय पण तो पुरेसा नाही.
सातच्या आत ची संस्कृती घट्ट झालीय. आपण बंदिस्त करून ठेवलंय स्त्रियांना एका प्रतिमेत. डूज आणि डोंट फक्त त्यांच्यासाठी. पुरुष मात्र मोकाट. काही केलं तर मर्दानगी चं प्रतिक.
एकदा मुलगी बघण्याच्या ठिकाणी जावं लागलं...सगळीकडच चित्र म्हणजे मुलाकडच्या लोकांनी प्रश्न विचारायचे आणि मुलीने उत्तरे द्यावी.  फक्त मुलीनेच प्रश्नांची उत्तरं द्यावी काय?
प्रश्न काय तर....नाव...शिक्षण...जन्मतारीख....झालं.
मी न राहवून म्हटलंच...बाई तुला काही विचारायचं असेल तर तू पण विचार...काळ बदललाय आता.
सर्व मुलांवर अवलंबून का? मुलींना चोईस का नाही? मुलीचा बाप backfoot वर नेहमीच. असं का? असे अनेक प्रश्न आहेत.  ही प्रथा काही बदलत नाही. कारण बदल आपल्याला आपल्या घरात नकोय. तो इतरांच्या घरात हवाय. जे काय बदलायचं ते इतरांनी बदलाव आपण नाही. ही आपल्यापैकी प्रत्येकाची मानसिकता.
स्त्रियांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायला हवं.चूल आणि मुल यातून सुटका केली पाहिजे. समाज फार विचित्र आहे. एखाद्या माणसाने बायकोला घर-कामात मदत केली तर त्याला वेग-वेगळी विशेषणं लावली जातात. यात घराची मंडळी सर्वात पुढे. म्हणजे जे पुरुष थोडा-बहुत बदल करू इच्छितात त्यांही नाउमेद केलं जातं.
अगदी मोजक्या स्त्रियांना ह्या रूढी-परंपरा झुगारत्या आल्या आहेत. हे प्रमाण वाढायला हवं. त्याशिवाय पर्याय नाही. मुलांना वेगळा न्याय , मुलींना वेगळा न्याय. हे चक्र थांबवण गरजेचं आहे. त्याचं ही आयुष्य आहे. त्यानाही जगू द्यावं त्यांच्या मनाप्रमाणे.
एकदा एका लग्नात नवरदेवा कडील लोकांनी नवरदेवाला उचलून घेतला हार टाकते वेळी, आता त्या मुलीने काय कराव? विचित्र आहे सगळं. गमती-जमती चालतात हो. पण त्या कुठल्या प्रकारच्या असाव्यात? याचं कुठलंही भान नाही.  

त्या “लिपस्टिक अंड र माय बुरखा” मध्ये नाही त्या स्त्रिया स्वातंत्र्याच्या शोधात असतात. जे त्यांचा अधिकार आहे ते त्यांना कधीच मिळत नाही. मग नाईलाजाने त्यांना काहीतरी करावं लागतं.
मालिका, चित्रपट यांची समाज-प्रबोधन करण्याची जबाबदारी असते.  पण कित्येकदा तसं होत नाही. ते अजूनही पारंपारिक चित्रण रंगवतात स्त्रीचं काही बोटावर मोजता येणारे अपवाद वगळले तर.
राजा राम मोहन रॉय चं काय होतं....समाज बदलायचं होता. स्त्रियांवर होणारे अत्याचार थांबवायचे होते. फुलेंनी तेच केलं. त्यामुळे स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली झाली. आज क्रांती ची गरज आहे. कित्येकदा आपले अधिकार मागून मिळत नाही. ते घ्यावे लागतात.
सोशल मेडिया वर स्त्रियांवर अश्लील भाषेत टीका-टिप्पणी करणारे काही कमी नाहीत.  तू गप्प बस...तुला काय कळतंय? असे स्त्रियांना उद्देशून होणारे संवाद रोज चेच. घरोघरी.  म्हणजे सगळं समजणे-उमजणे याचा ठेका फक्त पुरुषांचाच. स्त्री ही काय फक्त उपभोगाची वस्तू नाही हे रुजवणं गरजेचे आहे.  कंगना राणावत बघा....स्पष्ट बोलते...सगळ्या रूढी-परंपरा स्त्रियांनी वेशीवर टांगायल्या हव्यात.  
स्त्रियांवर होणार्या अत्याचारांच्या अनेक घटना देशाच्या कानाकोपर्यात घडत आहेत. पेपरात वाचून, मोर्चे वगैरे काढून तर कधी एखादं twit करून, फेसबुक पोस्ट लिहून आपण निषेध व्यक्त करतो. एवढं करून भागणार नाही. कृती हवी.
सकाळी उठून चहा घेऊन येहे वाक्य जेव्हा थांबेल तेव्हा बदलाची अपेक्षा करूया.


सचिन भगत (9922127385)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय
शेगाव


Thursday, December 12, 2019

घर...


काल नट सम्राट हा चित्रपट पाहत होतो. चौथी-पाचवी वेळ असेल. कितीही वेळा पाहावं मन तृप्त होत नाही. प्रत्येक शब्द, प्रत्येक व्याक्य यांचे अर्थ मला नव्याने गवसतात प्रत्येकवेळी. गवसत जातात.  काल ही तसंच झालं.
तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या प्रतिभेने विस्तारलेले नाटक 'नटसम्राट'. त्यावर आधारित महेश मांजरेकर दिग्दर्शित 'नटसम्राट' हा चित्रपट.
काल त्या नट सम्राट च्या ह्या ओळी आवडल्या. आणि कित्येक वेळ मी त्यावर चिंतन करत राहिलो.
कुणी घर देता का घर ?
एका तुफानाला कुणी घर देता का ?
एक तुफान भिंतीवाचून, छपरावाचून, माणसाच्या
मायेवाचून, देवाच्या दयेवाचून जंगलाजंगलात हिंडतय.
जिथून  कुणी उठवणार नाही अशी एक जागा धुंडतय.
कुणी घर देता का घर ?...


घर...इवलासा  शब्द. पण अक्ख आयुष्य बदलण्याची ताकद ठेवणारा. त्याच्यासाठी संघर्ष तसा प्रत्येकाचा.
स्वप्न...प्रत्येक व्यक्तीचं. गरीबांपासून मध्यमवर्गपर्यंत. आजही कित्येक विद्यार्थी शिक्षण घेत असताना नोकरी लागल्यानंतर घर प्रत्यक्षात आणायचं स्वप्न उराशी बाळगतात. कधी लवकर कधी उशिरा. प्रत्यक्षात येते पण. आपलं स्वतःच घर असावं असा विचार न करणारा व्यक्ती जगाच्या पाठीवर सापडणार नाही.
मी  पण त्यातला एक. पावसाळ्यात रात्री-बेरात्री कोसळणारा पाऊस आणि कुठे कुठे गळतेय त्याचा शोध घेऊन खाली काहीतरी म्हणजे भांडी वगैरे ठेवण्यासाठी उडालेली तारांबळ, हिवाळ्यात कडाक्याची थंडी.  अस्वथ रात्री. त्या प्रत्येक रात्रीने एक स्वप्न तयार केल. लढण्याची प्रेरणा दिली.
घराबाहेर पडलो ते त्या घरासाठी. पण प्रत्येक गोष्ट वाटते तेवढी ही सोपी नाही. नोकरी लागली म्हणजे घर होत नाही. भांडवल उभारणे हा पहिला प्रश्न. त्यात खाजगी नोकरी असेल तर बँका ही टोलावतात. तसंच झालं. सरकारी बँकांचे उंबरठे झिजवून झाले पण काही उपयोग झाला नाही. शेवटी एका फायनान्स कंपनीकडून भांडवल उभं झालं. व्याज तसं जास्तच. आणि मग ई.एम.आय. चं चक्र सुरु झालं. असो.
घर पाहावे बांधून आणि लग्न पाहावे करून अशी एक म्हण प्रचलित आहे. त्याचा प्रत्यय घेतलाय. या दोन्ही गोष्टींवर कितीही खर्च करा समाधान कधीच मिळत नाही. प्रत्येकजण आपल्या ऐपतीपेक्षा जास्त खर्च करतो या दोन्ही गोष्टींवर. लोकं काय म्हणतील, समाज काय म्हणेल असे अनेक प्रश्न असतात मनात.  
घर...स्वतःच असलं काय आणि भाड्याचं असलं काय...काय फरक पडतो? आपण समज करून घेतलेय वेगवेगळे. निवारा हवाय. कुठल्या घरात मिळत मिळतो ते महत्त्वाची नाही. पण आपल्याला तेच महत्त्वाचे झालंय दुर्दैवाने.
मध्यंतरी एक मित्र म्हटला, घर कधी घेणार आहे?
आहे की गावाला. आता अजून कशाला? ते पुरेसं आहे. मी उत्तरलो.
मग इथे भाड्याचा घरात राहणार का आयुष्यभर? त्याने विचारलं.
हो...काय होतं. छान आहे. मी उत्तरलो.
स्वतःच्या घराचं समाधान तुला नाही कळणार? तुला काय माहिती? तो सहज बोलून गेला.
मी म्हटलं, असेलही. पण मला माहित ही करून घ्यायचं नाही.
त्यानं विषय पुढे रेटला नाही. मी ऐकणार नाही हे त्याला माहित होतं. तो तसा हुशार. जिथे संदेश पोचवायचा तिथे त्याने पोचवला. म्हणजे  माझ्या बायकोला मात्र सांगितलं. त्याला घर घ्यायला सांग म्हणून. आता पुढचं काही सांगायची काय गरज नाही. कारण सगळ्यांचे अनुभव सारखेच. कॅसेट सुरु.
या घराणे कित्येकांच्या मनात घर केलंय. ते काही पिच्छा सोडत नाही. म्हणजे कसं सारं ठीक सुरु असताना आपल्याकडे अजून हे नाही ही भावना वृद्धिंगत करणे आणि वर्तमान अस्वस्थ करणे नाही का?
घर...प्रतिष्ठा..स्टेटस चं प्रतिक. मी हे केलंय ते केलंय चा जयघोष.
एकदा एका शहरात गेलो होतो. एक मित्र अचानक भेटला. अनेक वर्षानंतर.
बरं झालं तू भेटला. चल, तुला घर दाखवतो. नवीन घेतलंय. अजून शिफ्ट झालो नाही.
पुढचा अर्धा तास त्या घरात फिरून झालं. बिल्डर ने काय दिलं. आपण additional काय करवून घेतलं. किचन, बाथरूम, toilet (इंडिअन/वेस्टर्न), या दिशेला त्या दिशेला, बेडरूम एरिया चांगला आहे. किती लाखात झालं. कॅश. वगैरे वगैरे पुराण.  मला त्यात फार काही रस नव्हताच. अनेक वर्षांनी भेटलो तर थोड्या गप्पा होतील अशी आशा होती. पण तसं काही झालं नाही. मी ही सोडून दिलं.  हाय-बाय करून निघालो.
किती घरांना घरपण राहिलंय? किती घरांमध्ये मोकळा श्वास घेता येतोय? आज त्या घरापेक्षा नाती टिकवणं, घरपण टिकवणं महत्त्वाचं झालंय. कितीही देखणं घर झालं म्हणून शांती, सुख नाही मिळत.
पूर्वी झोपड्या असायच्या. पण घरपण होतं. सकाळी...संध्याकाळी एकत्र जेवण्याची पद्धत होती. बायका सकाळी उठून सडा-सारवण करायच्या.  हे चित्र हद्दपार झालंय. आता घरं मोठ्ठी होताहेत...जेवढ्या भिंती त्या घरात आहेत त्यापेक्षा जास्त भिंती मनामनात झाल्या आहेत. दिसणारी भिंत पार करता येईल पण मनातल्या न दिसणाऱ्या भिंतींच काय? त्या दिवसेंदिवस वाढत जाणार. जाताना आपलं माणूसपण ही घेऊन जाणार.
कुणीतरी म्हटलंय:
घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती
तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती

आजकाल वेगळ्याच प्रथा पडल्या आहेत. त्यातली एक म्हणजे वेगवेगळ्या जातीचे कुत्रे पाळणे. ‘ग्रेट डेन, लॅब्रेडोर रिट्रीवर, बुलडॉग, जर्मन शेफर्ड, डॉबरमॅन असे अनेक. त्यांच्याशी गप्पा मारणे, संवाद साधने असं दैनंदिन जीवनात अथवा चित्रपटांमध्ये दाखवलं जाते. आसपास लोकं असताना आपला संवाद समाप्त संपलाय. प्रत्येक ठिकाणी असं होतं असंही नाही. काही अपवाद आहेत. घरपण टिकवून आहेत. अजूनही काही घरांमध्ये किमान एक वेळेस सोबत जेवण्याची प्रथा आहे.

एकत्रित कुटुंब पद्धतीतून विभक्त कुटुंब पद्धतीकडे आपण झुकलोय. घराला शोभा येते ती लोकांनी भिंतीनी किंवा कलरिंग ने नव्हे. कुणाला प्रायव्हसी तर कुणाला काय हवंय जे एकत्रित कुटुंब पद्धतीत शक्य नाही. यात कोण चुकीचं हे ठरवणं ही अवघड. कारण प्रत्येक जण आपल्याजागी योग्य. मग नेमकी काय गफलत आहे. चूक कोणाची हा प्रश्न उरतोच.
एकदा एका मित्रासोबत एका शहरात गेलो होतो. त्या शहरात काय काय विशेष म्हणून तो दाखवत राहिला. शेवटी म्हटला चल आता आपण प्लॉट पाहू. अलीकडेच घेतलाय. तो तिथं घेऊन गेला. रोड टच. नवीन वस्ती. मेन रोड लागून. दोन्ही बाजूला रोड. एवढी किंमत. असं ठरलं. तसं ठरलं. गुंतवणूक. भविष्यात राहायचं ठरलं तर बेस्ट लोकेशन अश्या अनेक डिटेल्स मिळाल्यात. माझ्या दृष्टीने हे सुद्धा पुराण. १५-२० मिनिटे तिथे उभे होतो.
येताना मी त्याला गमतीने म्हटलं, प्लॉट दाखवायला घेऊन आला होतास का?
दिलखुलास हसला. कमीना है तू. मुझे पता था तू ऐसा ही कहने वाला था. चांगला मित्र असल्याने गमती-जमती ओघाने आल्याच. 
घर ते घरचं...कुणाची झोपडी असेल, कुणाचं तीन-पत्र्याचं असेल, कुणाचं दगड-मातीचं असेल,  कुणाचं कॉंक्रीट चं असेल, कुणाचं छोटं, कुणाचं भलं मोठ्ठ जसं टू-थ्री बि.एच. के., कुणाची टोलेजंग इमारत, तर कुणाचं गगनचुंबी अपार्टमेंट मधलं एक. वगैरे. घरं तर मोठ्ठी झालीत. पण त्या घरांमध्ये लोकांची कमतरता आहे. भयाण शांतता. किलबिल नाही, गोंगाट नाही. गजबजलेला सहवास नाही. आपल्या आजूबाजूला कोण म्हणजे शेजारी कोण याचा पत्ता नाही. आजकाल मुला-बाळांना ही वेगवेगळ्या रूम्स आहेत अनेक ठिकाणी. सारे बंदिस्त. एकाच छताखाली पण कोसो दूर मनानं. कुणाच्या आयुष्यात काय चाललं आहे याचा मागमूस नाही. सोबत असून नसल्यासारखी.

कुठल्या तरी देशात त्यांनी खेडी निर्माण केली आहेत म्हणे. लोकं येऊन राहतात तिथं काही दिवस पैसे देऊन. काय तर नैसर्गिक सान्निध्य. चुलीवरची भाकर म्हणजे स्वयंपाक.  जे सोडून गेलो आज त्याचा ध्यास.
पूर्वी पोळी मिळणे दुरापस्त होतं. आज भाकर मिळणे दुरापास्त झालंय. कित्येकदा हॉटेल मध्ये गेल्यावर ज्वारी, बाजरी ची भाकर आहे का म्हणून विचारणारे अनेक.
घर असलंच पाहिजे. पण आपला आवाका जपून. वेळ आली की होईलच ना. त्यावर आतापासून कशाला विचार करायचा? वैयक्तिक मत. सारेच सहमत होतील असं नाहीच. घरापेक्षा सध्याच्या घराला घरपण कसं येईल असा विचार करता येईल? सिमेंट च्या भिंती कधी पार करता येतील?  माणसा-माणसांमध्ये निर्माण झालेलं अंतर कधी कापता येईल?

सचिन भगत (9922127385)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय
शेगाव

Wednesday, December 11, 2019

असंच काहीतरी-५


आजकाल फक्त प्रश्न पडतात. एखाद्या प्रश्नाच्या उत्तरामागे धावावं तर नवीन प्रश्न समोर आ वासून उभे असतात. उत्तर कशाचच मिळत नाही. आसपास काय चाललं आहे, काय नाही याचा वेध घेता घेता स्वतःच्या आयुष्यात काय चाललं आहे याचं भान राहत नाही. सगळं काही सुरळीत असल्याचा भास. पण तो फक्त भास. त्याला काही तर्क नसतो. एखादी गोष्ट भंडावून सोडते. पण ते सोडून पुढे निघून जायचं. त्या गोष्टीच्या नादाला लागायचं नाही. आजचा दिवस गेला ना. तसा उद्याचा पण जाईल. फार संकल्प करायचे नाहीत. संकल्प सिद्धीस जात नाहीत. अपेक्षित होत नाही. हा पूर्वानुभव. मग कशाला हवेत नव-नवीन संकल्प. जे समोर आलं त्याला सामोरे जायचं. सर्व काही असून नसल्याचा भास आणि नसून असल्याचा हेच ते चक्र. पसारा वाढवत जातो आपण.हाव...दुसरं काय? पण हिच हाव नवीन प्रश्न घेऊन येते…
व. पु. काळे यांनी वपुर्झा मध्ये म्हटलंय:
“प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही, कधी ना कधी ते पळणार्‍याला गाठतातच,पळवाटा मुक्कामाला पोहचवत नाहीत, मुक्कामाला पोहचवतात ते सरळ रस्तेच...”
आयुष्यातला प्रत्येक निर्णयाची एक किंमत असते. Each decision in life has its own price tag.  ती किंमत आपल्याला कधीच माहित नसते. ती फक्त आपण चुकती करतो. कळत ही नाही कशी. आपण सतत धावत असतो. हे झालं की ते. पसारा वाढला की प्रश्न वाढत जातात. ते सोडवता सोडवता नाकी नऊ.  जगण्याच्या अनेक संकल्पना असतात. प्रत्येकाच्या वेगळ्या. माणूस हा मुळातच बुद्धिवादी प्राणी. म्हणून तो इतरांपेक्षा वेगळा. तो सतत नाविन्याच्या शोधात असतो…
कित्येकदा ओळखीचे चेहरे अनोळखी वाटायला लागतात. अंगवळणी पडलेल्या पाउल वाटा ही दिसेनाश्या होतात. मी कोण, मी कोण आक्रोश सुरु होतो. वाटेतले खाच-खळगे, अगणित समस्या, पण मी थांबत नाही. पायाला कायम भिंगरी. जशी पायाला तशी विचारांना. unstoppable…
गर्दी. जिकडे तिकडे फक्त गर्दी. आसपास माणसांची गर्दी. डोक्यात  प्रश्नांची गर्दी. या गर्दीत आपण कधी हरवून जातो समजत नाही…
खिशातलं पाकीट जाड झालंय. सहजच पाकीट उघडलं तर जुन्या-पुराण्या किराण्याची मालाची यादी, बिल, एटीएम च्या पावत्या, थोडे-बहुत पैसे यापलीकडे काहीच नाही. पाकिटात पण गर्दी झाली होती अनावश्यक गोष्टींची. जुन्या-पुराण्या पावत्या-बिल. एक-एक करून फेकून दिल. आता पाकीट हलकं झालं होतं. शेवटी एटीएम, क्रेडीट कार्ड तेवढं उरलं फक्त. का सांभाळून ठेवलं एवढं सारं माहित नाही. उपयोगाचं नसून सुद्धा. हेच ओझं घेऊन आपला प्रवास सुरु राहतो…
कॉलेज च्या वेळेला कॉलेज ला गेलो. मी आल्याची सही केली ती सही माझ्यापेक्षा महत्त्वाची आहे. पायर्या चढून कॅबीन उघडून मध्ये शिरलो. दरवाजा बंद केला. हिवाळ्यात डास खूप असतात. त्यामुळं दरवाजा तसा नेहमी बंदच.  टेबल वर लक्ष गेलं तर टेबल पूर्ण व्यापलेला.  एक कंप्युटर, मोउस, सीपीयू,  laptop आणि चार्जर, हार्ड डिस्क, यूपीएस, दोन-तीन नेट केबल,तीन-चार पेन ड्राईव्ह, मोबाईलचं चार्जर, हेडफोन, डायरी, चार-पाच पुस्तकं, दोन-चार पेन, डस्टर, चार-पाच खडू, स्टेपलर, पंचिंग मशिन, इपीएबिएकस  extension फोन, पाण्याची बॉटल एवढं सारं. जशी डोक्यात विचारांची गर्दी झालीय तशीच टेबल वर पण. किती सार्या अनावश्यक गोष्टींनी गर्दी केलीय डोक्यात. म्हटलं तर डस्ट बिन. पण ती डस्ट बिन कधी रिकामी केली जात नाही. काय होणार. दुर्गंध. आपल्या आचारात-विचारात सगळीकडे…
काही कमी करता येईल का असा विचार करता करता खुर्चीत बुड टेकवलं तेवढ्यात फोन वाजला. आणि हे बाजूला राहिलं, सुरु झाली दुनियादारी. जगण्यासाठीचा संघर्ष. कधीही न संपणारा. मला काय वाटतंय, काय हवंय त्यापेक्षा लोकांना काय वाटते, काय हवंय ते पूर्ण करण्याचा प्रवास. या प्रवासात मी विसरलोय स्वतःला. जे लोकं दाखवतात तेच पाहतो. त्यांना जे आवडते तेच बोलतो, तेच करतो. माझ्या विचारांना, कल्पनांना तिलांजली दिलीय…
क्षणभंगुर आहे सगळं. या जगात शाश्वत असं काहीच नाही. मग तरी पकडून ठेवण्याचा का अट्टहास?
गर्दीची सवय झालीय. पण या गर्दीत मी कुठंय? माहित नाही. या गर्दीचा एक भाग न दिसणारा.
“समय बलवान होता है. और ये समय ही तो है जो भी चलने को मजबूर करता है. आज नाही तो कल इसी चक्र मे हम फसे हुये है.”

आजकाल फोन वाजत नाही. वाजलाच तर आपल्यासाठी नाही एवढं मात्र नक्की. प्रत्येकाचा फोन करण्याचा एक अजेंडा असतो. काहीतरी काम असते. ते संभाषण म्हणजे बिजनेस. कित्येक फोन मी उचलत नाही. त्या truecaller ने बरंच केलंय. नंबर सेव्ह नसला तरी कुणाचा आहे ते समजते. अचानक आलेले फोन मी उचलत नाही. माझ्या आयुष्यात काय चाललंय वगैरे कुणाला काही देणं-घेणं नाही. तरी कुणाला काय अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न. कामानिमित्त संभाषण.  ज्या संभाषणाचा हेतू मुळात व्यापार आहे त्यात आत्मीयता संबंध आलेत कुठून? मग न उचललेला बरा. काम असलं म्हणजेच फोन. हे मनाला फार पटत नाही. काय करणार?...
कुठंतरी एक वाक्य वाचनात आलेलं...लेखकाचं नाव आठवत नाही: “असूनही जी दिसत नाही,पण मनाला जाणवते,ती भावना.जे नजरेला दिसतं,तो व्यवहार.” व्यवहार...म्हणजे यश आलं की पैसा येतो आणि पैसा आला की आसपास गर्दी होत जाते. नको नको ते, दूर-दूरचे संबध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात काहीपण करून. कधी वाहवा...खुशमस्करी करून. आपल्याला ही ते आवडतं कारण आपला शब्द प्रमाण...जे बोलतो ते सत्य. या प्रक्रियेत आपण स्वतःला विसरून जातो. अस्तित्वात नसलेली प्रतिमा तयार करून घेतो स्वतःची. सत्य कधी समोर येतच नाही. आसपास ची गर्दी तसं होऊ देत नाही. कारण प्रत्येकाचा एक अजेंडा. साला हा व्यवहार कधी समजला नाही. म्हणून फसगत झालीय…

अनेकदा शांततेच्या अपेक्षेने माणूस घरी जातो. घरी गेल्यावर मात्र तुम्हाला काही समजत नाही, हे करा, ते करा, हे असं , ते तसं,  हे आणावं लागेल वगैरे अनेक सूचना असतात. बरं...ठीक आहे एवढा काय तो आपला प्रतिसाद.  तो चहा घश्याखाली उतरत नाही, झिंग येत नाही तोवर पुढचा प्रवास ठरलेला असतो. आणि घाई-घाईत कपडे बदलून पुन्हा आपण धावायला सुरुवात करतो.  हरवलेल्यांना शोधणं सोपं नक्कीच नाही…
सोनेरी भविष्याची स्वप्ने रंगवत रंगवत आपण जगत राहतो. ती स्वप्ने कधी हवेत विरून जातात कळत नाही. आपण ती शोधत राहतो. पण मिळत कधीच नाही. अथांग समुद्राची खोली जशी मोजता येत नाही तसंच आयुष्याचं ही गणित कधी कळत नाही…
“So it comes to this; one doesn’t need rest. Why bother about sleep if one isn’t sleepy? That stands to reason, doesn’t it? Wait a minute, there’s a snag somewhere; something disagreeable. Why, now, should it be disagreeable? …Ah, I see; it’s life without a break.”
― Jean-Paul Sartre, No Exit
चक्रव्यूह जो कधी भेदता येत नाही. मुद्दा असा की या चक्रव्युहात आपण स्वतः शिरतो परत कधीही बाहेर न येण्यासाठी. आणि आपल्याला घेऊनच तो संपतो.
शेवटी-
वि.स. खांडेकर (अमृतवेल)-
" भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळुन बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. मानवाचं मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचुन बांधुन ठेवता येत नाही. त्याला भविष्याच्या गरुडपंखांच वरदानही लाभलं आहे. एखादं स्वप्न पहाणं, ते फुलविणं, ते सत्यसृष्टीत उतरावं म्हणुन धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवानं ते स्वप्न भंग पावलं तरी त्याच्या तुकड्यावरुन रक्ताळलेल्या पायांनी दुस-या स्वप्नामागनं धावणं हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो यामुळं!! "

सचिन भगत (9922127385)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय
शेगाव

Monday, November 25, 2019

नैतिकता हरवत चाललेली पत्रकारिता (Journalism)


मी शिकत असताना पत्रकारीते बद्दल प्रचंड आकर्षण होतं. या आकर्षणापायी मी २०११-१२ ला रानडे ला प्रवेश घेतला. एक वर्षाचा डिप्लोमा. नेमकी पत्रकारिता काय हे जाणून घ्यायचं होतं. मला माहीत नसलेल्या अनेक गोष्टी त्या वर्षभरात कळल्या. बातमी म्हणजे काय? ती कशी लिहावी...पहिल्या उतार्यात काय असलं पाहिजे...संशोधन.... Truth & accuracy, Impartiality, Independence....फिचर (Feature), कोलम (Column) सारख्या संकल्पना ... प्रिंटींग ते सर्क्युलेशन पर्यंत चा प्रवास वगैरे अनेक गोष्टी.
त्यातलं एक  Yello Journalism....खरं तर आजकाल हेच सुरुय. कुठलंही संशोधन नाही. मनोकल्पित बातम्या सर्रास दाखवल्या जात आहेत. खरं-खोटं ची खातरजमा नाही.
बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने पत्रकारदिन साजरा करणार्‍या किती जणांना जांभेकर समजले हा कळीचा मुद्दा.
आपल्या लेखणीतून सत्ताधार्यांना घाम फोडणारे पत्रकार पाहिलेय.  अनेक नावाजलेले पत्रकार (Journalists) या देशाने पाहिलेय. प्रल्हाद केशव अत्रे पासून अनेक.

आज मात्र पत्रकारिता हा उद्योग (Business) झालाय.  मोठं-मोठे वर्तमान पत्र, चॅनेल कुणाच्या मालकीचे आहेत हे पाहिल्यावर लक्षात येईल. ते कुणाचा अजेंडा चालवतात वगैरे ते ही कळेल.
आपण भोळी-भाबडी मानसं जे वाचतो, पाहतो त्यावर विश्वास ठेवतो. आपल्या कधी कळत नाही की त्या मालकांना जे दाखवायचे आहे ते दाखवतात. कुठली बातमी दाखवायची, कुठली नाही हे सारं ते ठरवतात. खरं-की खोटं या भानगडीत आपण पडत नाही. वाचलेलं , पाहिलेलं खरं असेलच याची आता शाश्वती राहिली  नाही.
अलीकडचे पत्रकार पहिले की त्यांची कीव येतेय. कुठला अभ्यास नाही, संशोधन नाही. माईक हातात धरला की तत..मम करून वेळ मारून न्यायचा प्रकार सुरु झालाय. त्यात भर पडली ती सोशल नेट्वर्किंग ची. नेमकं खरं काय हे कधीच समजत नाही. आताची सगळ्यात मोठी बातमी...आणि बातमी काय ...अमुक-तमुक यांच्या भेटीला गेले, हॉटेल/घरा मधून बाहेर पडले.  बरं की घरात येऊ देत नाही तुम्हाला. अन्यथा तुम्ही तर आमके महाशय किती वेळ संडासात गेले? ते बाहेर पडल्यानंतर कसा वास येत आहे याची ही बातमी केली असती. अरे काहीतरी लाज बाळगा. पत्रकारिता काय ते तर समजून घ्या.
ज्ञानाच्या, अभ्यासाच्या नावानं बोंब आहे. चाटुगिरी आतातरी बंद करा. तो ABP चा एक महाशय तर असं काही बोलतो की त्याला सर्वज्ञात आहे. अरे तुझी लायकी सगळ्यांना ठाऊक आहे. इतकं पण चाटू नये की ज्यामुळे आपली ओळख चं नष्ट होईल.
कशाची बातमी करावी याचं काहीतरी तारतम्य असायला हवं. लोकांचे असंख्य प्रश्न असताना त्यांना वाचा फोडण्या ऐवजी त्या तैमुर न शी केली, सु केली याचं वार्तांकन. कुठे घसरलात रे गाढवानो. गाढव च.
पूर्वी चर्चेत नामवंत लोकं असायची. त्यांच्या चर्चा ऐकाव्या वाटायच्या. सध्या त्या चर्चेतली लोकं पाहिली की असं वाटतं त्यांच्या कुटुंबाच्या लोकांना ही तो आश्चर्याचा धक्का बसत असेल हे महाशय एवढे ज्ञानी म्हणून.
आरडाओरडा केली म्हणजे आपण म्हणतो ते खरं होतं का कुठं? सत्य ते सत्य. मग ते तुम्ही कसंही सांगा ते बदलत नाही. असे आरडाओरडा करणाऱ्या पत्रकारांची कीव येते.  दलाल पत्रकार प्रचंड वाढले आहेत. भुरटे पत्रकार म्हणता येईल यांना.
लोकशाहीचा चौथा खांब (Fourth Pillar of Democracy) वगैरे बोलायच्या गोष्टी झाल्याय. हा खांब डळमळीत झालाय. पाकीट पुरवलं, त्यांना साजेसे निर्णय घेतले की आपला हेतू साध्य. हेच आज काल चे राजकारणी करताय. ब्रेकिंग न्यूज (Breaking News) सेन्सेशनल चं असली पाहिजे का? या बांडगूळ पत्रकांना आधी न्यूज (News) म्हणजे काय, नंतर ब्रेकिंग न्यूज चा अर्थ समजून सांगायला पाहिजे.
अलीकडचा शब्द म्हणजे सूत्र...नेमकं काय? सूत्राच्या नावाखाली आपल्याला हवं ते दाखवता येतं, खपवता येतं एवढंच.  सूत्र (Source) समजायचं असेल ना तर तुम्ही जसे जन्माला आलात ते सूत्र. तिथं logic आहे. त्या anchors बद्दल तर बोलायलाच नको. तोंड दिलंय म्हणून काहीपण बरळत सुटतात.
पत्रकारितेच्या मूळ तत्त्वांना हरताळ फासला गेलाय.  माध्यम स्वातंत्र्याच्या नावाखाली काय काय खपवलं जातंय.
आज किती माध्यम (Media) तटस्थ (Impartial) आहेत? जे काही आहेत त्यांचे काय हाल आहेत. यावरून माध्यम म्हणजे लोकांचा आवाज वगैरे किती झोल आहे हे लक्षात येईल. सत्ताधार्यांच्या मर्जीतले संपादक (Editors) सगळीकडे दिसून येतील. त्यामुळे तटस्थ वगैरे या फंदात आपण पडायलाच नको.

निवडणुकीच्या दरम्यान चे पोल आठवतात ना...२२० पार वगैरे.  मग कुठून रसद पुरवली गेली असणार हे उघड आहे. प्रत्यक्ष चित्र वेगळंच होतं. माझा आणि तुझा वाले हवेत उडत गेले. त्यांच्या त्या tagline आणि ते काय करतात याचा कुठलाही संबंध नाही.
त्यातल्या काही...
•“उघडा डोळे बघा निट”
•अचूक बातमी ठाम मत
•एक पाऊल पाऊल पुढे
•चला, जग जिंकूया
•सबसे तेज
•मजबूत इरादे, बढते कदम
•खबर...बनते भारत की
•खबर हर किमत पर
•सच जो आप जाणना चाहते है
•हकीकत जैसी खबर वैसी
•आपको रखे आगे
किती जण ते अमलांत आणतात हा संशोधनाचा विषय.
मेडिया वातावरण निर्मिती करत असतो. कुणाच्या तरी सांगण्यावरून perception तयार करत असतो. किती दिवस लोकांना मूर्ख बनवणार? लोकांनी ठरवलं तर लपण्यासाठी सुद्धा जागा उरणार नाही या भटक्या पिलावळ जमातीला.
आता सगळेच पत्रकार तसे झालेत असं नाही. बोटावर मोजण्या इतके नैतिकता बाळगून आहेत अजून. प्रवाहाच्या बाहेर फेकले गेले तरी नैतिकता त्यांनी सोडली नाही. म्हणून अस्सल पत्रकारिता अजून जिवंत आहे.
टीव्ही सुरु करताना कुठलं न्यूज चॅनेल (News Channel) लावावं हाच मोठा प्रश्न आहे. कंटाळून मागच्या हप्त्यात काही न्यूज चॅनेल Deactivate केली free to air असली तरी.  
“Get the truth and print it.”
John S. Knight

आताच चित्र गंभीर आहे. ते कधी बदलेल माहित नाही. सत्ताधार्यांना प्रश्न विचारणारे, मंत्र्यांना राजीनामा देण्यास भाग पाडणारे, त्यांना सळो की पळो करून सोडणारे पत्रकार, संपादक यांचा अस्त झाला. पुन्हा कधीतरी उदय होईल. सारं चित्र पालटेल.  या आशेवर थांबतो.

RIP Journalism…

सचिन भगत (9922127385)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय,
शेगाव