Sunday, November 24, 2019

2५ नोव्हेंबर निमित्त...


आज २५ नोव्हेंबर...म्हणजे त्याचा वाढदिवस.आयुष्यात  एका वर्षाची भर पडली. नवीन वर्षात पदार्पण करताना मागे वळून पाहिलं तर आठवणींचा भांडार आहे.  गेल्या अनेक वर्षात तो अनेकदा मला गवसला असं वाटत राहिलं...पण जेव्हा जेव्हा तो गवसला असं वाटलं तेव्हा तेव्हा अजून खूप काही राहिल्याची भावना वृद्धिंगत होत गेली. यानिमित्ताने त्याला उलगडण्याचा प्रयत्न करतोय...शक्य नसलं तरी.
लिखाण, वाचन, चर्चा त्याचे आवडते क्षेत्र. तसं लिखाण तो फार पूर्वीपासून कमी अधिक प्रमाणात करत आलाय. माझ्या लिखाणाचा तो सेन्सॉर बोर्ड. आधी तो पाहणार, वाचणार. बदल सुचवणार.  मग पोस्ट. म्हणजे पहिला वाचक. माझ्या लिखाणाची प्रेरणा. म्हणजे तो लिहितो म्हणून मी लिहायला लागलो ओढून-ताढून. एवढंच.
त्या एम. .एस. मध्ये तो पहिल्यांदा भेटला. मग त्या एम. . एस. पासून पुण्यापर्यंत व्हाया जळगाव. आम्हीं संपर्कात. सातत्याने सोबत. तो आणि मी एक घट्ट समिकरण. खरं म्हणे आज कुठल्या कलर चि under wear घातली तिथपर्यंत माहिती. दोन लोकांमध्ये भांडणे लावून भांडण सुरु असताना पुस्तकात डोकावणारा हा. म्हणजे आगलाव्या.
तो नेमका कसा आहे... मला उलगडलेला कि अजुनही उलडलेलं एक कोडं. तो बोलत नाही. ऐकुन घेतो. समोरचा चुकीचा असला तरीही त्याला जाणीव होऊ देणारा. इथे आमचं कित्येकदा खटकतं. किती काळ असा जगणार आहेस? स्पष्ट सांगत जा. गुळमुळीत उत्तर देऊन तो मला टोलवतो. मला आहे तसा स्विकारणारा तो पहिला व्यक्ती. माझ्यात त्याने बदल अपेक्षित केले नाहीत. कधीतरी एखादं मत व्यक्त केलं असेल परंतु ते झालंच पाहिजे असा तगादा त्याने कधी लावला नाही. मी मात्र त्याला आहे तसा स्विकारत नाही. Dos and don’ts सांगत असतो. तो ते फार मनावर घेत नाही. ऐकून सोडून देतो.
समज गैरसमज आमच्यात ही. नाही असं नाही. पण तो ही कधी त्याबद्दल बोलत नाही आणि मी पण नाही. तिथं सोडून पुढे.
निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यापासून राष्ट्रपती राजवट लागेपर्यत रोज आज काय झालं त्यावर कित्येक चर्चा पार पडल्या. त्या संघर्ष यात्रा करणाऱ्या महिला निवडणुकीत पडल्या म्हणून विरोधकांपेक्षा  पतिदेव ला  जास्त आनंद झाला असेल असा शोध लावून त्यावर एकमत असणारे आम्ही. तसं अनेक बाबतीत एकमत ही. जसं की संधी एकदाच येते. (कोणती ते विचारू नये.), प्रेम म्हणजे व्यवहार वगैरे. दिवसभरात एक-दोन फोन ठरलेले.
व्हेव करून अंडे... एवढंच रोज चुकता फेसबुक ला पाठवतो.
बोल बेटे...
कुछ नही, ऐसेही तेरी याद आयी...
रे फेक मत साले...

हा रोजचा संवाद.
१९९९ ते २०१९.. तब्बल वीस वर्ष. ओळखी पासून वर्गमित्र  ते मैत्री आणि त्या पलीकडचा हा प्रवास. चढ-उतार, खाच-खळग्यांनी भरलेला.  सोबत भ्रमंती ही कित्येकदा.
तो बहुरूपी आहे... बहू आयामी आहे... व्यासंगी आहे. त्याचे असंख्य चेहरे आहेत. तो प्रत्येकाला वेगळ्या रूपात भेटतो. तो आरश्यात जेव्हाही पाहत असेल तेव्हा मी म्हणजे जादूगार असं त्याला वाटत असावं. आमच्या चर्चा कायम सुरु असतात...नेहमी वेगवेगळे विषय.... समाजकारण, राजकारण. कुठलाही विषय असो. बॉलीवूड ते  हॉलीवूड व्हाया मराठी, तमिळ. बालपण ते वृद्धावस्था. स्त्री-पुरुष संबंध/समस्या. प्राथमिक शिक्षण ते उच्च शिक्षण. आरोग्य. शारीरिक गरजापासून  ते बौद्धिक गरजांपर्यंत. नट-नट्या म्हणजे  नर्गिस ते अँजेलिना जोली पर्यंत. म्हणजे काही पण. भुकेचे अनेक अर्थ शोधणारा.त्याला शब्दात पकडता येत नाही. तसं ते अशक्यच. Chatting वगैरे आम्ही करत नाही. बोलायचं तर फोन करतो.
कित्येक वेळा शाब्दिक जुगलबंदी...एकमेकांना शिव्या...सर्व. तसं शिव्यांनी आम्ही समृध्द. पायाच्या  नखांपासून ते डोक्याच्या केसांपर्यंत तोंडपाठ. काही निर्माण केलेल्या ही. ग्रामीण भागातील असल्याने तेवढा फायदा. सलग तास-दीड तास आम्ही एकमेकांना शिव्या घातल्याय कित्येकदा.
आयुष्यात घडलेया प्रत्येक प्रसंगाचा, एक  कप चहा च्या  समस्यांपासून दोन वेळेस च्या  जेवणा पर्यंत च्या प्रवासाचा साक्षीदार. ज्याला मी संपूर्ण माहीत आहे. उमगलेला आहे असा. काही नाती मागून मिळत नाहीत ती निर्माण होत जातात. तसंच काहीतरी समजा.
सोशल नेटवर्किंग वर राजकारण संबंधी पोस्ट टाकणारे आम्ही. ती वैयक्तिक बाब. त्याचा उदो-उदो नको. नाहीतर आजकाल भक्त, पुरोगामी वगैरे संकल्पनांचा जोरात वापर सुरुय. आपल्याला कुठलंही लेबल नको. जे योग्य ते योग्य. यावर ठाम.
त्याच्याबद्दल  काय लिहू? माझ्यात नसलेला प्रत्येक  समाजमान्य गुण त्याच्यात. आणि प्रचलित प्रथेनुसार विरुध्द ते सारे माझ्यात. एका नाण्याच्या दोन बाजू. कदाचित त्यामुळे हे सारं घडलं असेल. सांगण्या सारखे अनेक प्रसंग. एक दुसऱ्यांना कितीही शिव्या घातल्या  तरी एका ताटात जेवण्याची क्षमता कला अवगत.
तसं तो आणि मी विरोधाभास आहे. तो अपेक्षित करत नाही कुणाकडून काही. मी मात्र अपेक्षित च्या  पुढे जाऊन घेऊन घेतो.
जळगाव पासून पुण्यापर्यंत. जर त्याचा विषय निघाला असेल तर मी ओघाने येत असतोच. तो म्हणजे चांगला. मी म्हणजे टीकेचा धनी.
ते पण अंगवळणी पडलंय. माझ्या मनातला जे वाटेल चांगलं वाईट याचा विचार करता मनाला पटेल ते मी करत गेलो, जगत गेलो. तो मात्र तसा नाही. इतरांना अपेक्षित गोष्टी करत गेला, करतोय. स्वतःच्या ईच्छा अपेक्षा सोडून. दुर्दैवाने यामुळेच त्याला गृहीत धरल्या जाते. मी पण तेच करत आलोय. त्याच्यावर प्रत्येक गोष्ट लादत आलोय. पण तो बोलत नाही. याला कधी बोलावं वाटत नाही. मला पडलेला प्रश्न.
तो अजब रसायन आहे. कुणाला सहजासहजी कळणार नाही. तो कळू देणार नाही पण ज्याला कुणाला तो कळेल तेव्हा कदाचित वेळ निघून गेलेली असेल.
या वीस वर्षात त्याला मी जवळून पाहिलं आहे. तरी कित्येक गोष्टी उलगडता आल्या नाहीत. मी त्याला कधी समजण्याचा प्रयत्न केला नाहीं. त्याला रागावलेले मी क़्वचित पाहिलंय. तरी आठवत नाही.
नॉनव्हेज चा दर्दी... रसिक.  वादग्रस्त मुद्द्यांवर बोलणे तसं  आम्ही टाळतोच.
एकदा मी त्याला पत्र लिहिलं. अपयशाचा काळ होता. संपता संपेना. संपूर्ण पत्र नकारार्थी विचारांनी भरलेलं. त्याचं उत्तर आलं काही दिवसांनी. भलं मोठ्ठ उत्तर. त्यात दडलेला कवी दिसला. काही ओळी त्याच्या लेखणीतून उतरल्या...तो पत्राचा शेवट होता...त्या ओळी अशा:
फिनिक्स शोधताना...
मी ऐकून होतो.
नष्ट होऊनही घेतो
राखेतून उभारी.
मी म्हटलं काहीतरीच...
पण खरं सांगतो.
तुझे जीवन पाहताना....
गवसला फिनिक्स.
म्हणूनच फिनिक्स वर अविश्वास नाही...
तुझाच दोस्त.
…………………
30/11/11 
11.40pm.
एका औपचारिक पत्रातली त्याच्या काही ओळी...
प्रेमाचा गुन्हा!
प्रेमाच्या राज्यात
प्रेम करणं हा गुन्हा नाही
पण ज्याच्यावर ते जडतं
त्याच्यापासून लपवणं
हा मात्र गुन्हा आहे.
हा गुन्हा सुद्धा कसा?
तर त्यात गुन्हेगार स्वतःच फसतो,
गडबडतो, गोंधळतो,
गुन्हा कबूल करत नाही.
पण त्याचा चेहरा बोलत जातो.
प्रेमाच्या न्यायालयात
या गुन्ह्याला शिक्षा एकच
जन्मभर तडपण्याची!
तो विनोदी आहे. एका पत्रात मैत्रीबद्दल त्याने लिहून पाठवलेलं......
हमारी दोस्ती
It cannot break
It will break only when
We will be no more.
But it will continue in the heaven.
And there, in the palace of Indra,
We will see (enjoy) the dance of Urvashi, Rambha and Menaka…
मी जळगाव सोडल्यानंतर ते तो पुण्यात येईपर्यंत सातत्याने पत्र व्यवहार व्हायचा. त्यात खंड पडला नाही. मी पुण्यात कशासाठी गेलोय याची नेहमी जाणिव करून देत गेला. कधी आधार म्हणून, कधी प्रेरणा म्हणून तर कधी विनोदी शैलीत तो पत्र लिहित होता. एका पत्रात त्याच्या या ओळी मला प्रचंड भावल्या...
तू अनुभवलेल्या चटक्यांना
एक दिवस शांती मिळेल
तुझ्या पाणावलेल्या डोळ्यांनी
पाहिलेल्या स्वप्नांना
एक दिवस मुक्ती मिळेल
तुझी वजन करण्याची भाषा ही
एक दिवस सत्यात अवतरेल
तो दिवस असेल .....
मला जेव्हा जेव्हा गरज भासली तेव्हा तो आसपास च होता. त्याच्या असण्याने असंख्य गोष्टी शक्य झाल्या. प्रवास सुकर झाला. आजकाल भेटी-गाठी होत नाहीत...तो कुठं...मी कुठं. पण संपर्क कायम आहे.
तो विनोदी आहे. खोडकर आहे. गंभीर आहे. प्रगल्भ आहे. आज्ञाधारी आहे. सद्गृहस्थ आहे.  तो सर्वच आहे. पण नेमकं कोण याचा थांगपत्ता लागत नाही. तो प्रत्येक गोष्टीत चांगलं शोधत जातो. त्यामुळे लोकं जोडली गेली, जोडली जातात. आपलं कसं जोडण्यापेक्षा तोडण्यावर जास्त भर. त्यामुळे कुणी सहसा जोडले गेल नाहीत. आणि जे काही जोडले गेले तेही  बरेच गळून पडलेत काळाच्या ओघात. त्याने मला कित्येकदा सांगितल...जिभेवर नियंत्रण ठेव. तसा त्याचा फायदा कधी झाला नाही. मग त्याने तो विषय सोडून दिला.
तो त्याच्या समस्यांसंदर्भात कधी सांगत नाही. कित्येक गोष्टी स्वतः जवळ ठेवतो. अंतर्मुख आहे त्या बाबतीत. अनेक वर्षांचा कालावधी गेल्यानंतर सांगतो पण ते अर्ध सत्य. खोदून-खोदून विचारलं तेव्हा.
तर असा या आमचा मित्र. आमचा यासाठी की तो कित्येकांचा आहे. त्याने माझ्यासारखी सीमा अधोरेखित केली नाही. त्याचा आज वाढदिवस. म्हणून हे शब्दरूपी लिखाण. येत्या काळात त्याला अपेक्षित गोष्टी घडतील ही अपेक्षा. कारण त्या आतापर्यंत घडायला हव्या होत्या. किती लिहू आणि काय? तो न संपणारा विषय आहे. तेवढ्या खोलात मी जाऊ शकत नाही. ती माझी मर्यादा. जेवढा एक व्यक्ती म्हणून गवसला तेवढा शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केलाय.
नाव लिहायची गरज नाही. कारण...
नाम तो सूना ही होगा....


टीप- ती बॅग विसरू नको. त्या बॅग मधील  निखळ प्रेम  पहायचं आहे.  कधी बघितलं नाही रे म्हणून हा अट्टहास. वाट पाहतोय...आणि तो मोबाईल, पुस्तक विसरू नको. एवढं लिहिलंच आहे तर औपचारिकता म्हणून वाढदिवसाच्या बॅगभर...सॉरी... ढिगभर शुभेच्छा.

तुझाच...
सचिन भगत (9922127385)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय,
शेगाव