Wednesday, December 2, 2015

निरर्थक पण अर्थपूर्ण शहाणपणा...

वाकड्यात शिरायला फार हौस. नेहमी वेगळ काही करायचं. एखाद्या कातरवेळी नदीकिनारी बसून पाण्याचा तो प्रवाह पाहायचा. त्यातलं ते जीवंतपण अनुभवायचं. इच्छा झालीच तर पाण्यात एखादी डुबकी मारून सगळी पाप वाहून गेल्यागत श्वास सोडायचा.
बाजू नसताना चौकोन बनवायचा कसा? दुभंगलेल्या बिंदुना जोडायचा कसं? चौकोन होण्यापूर्वीच बिंदू वेगळे झालेत. प्रत्येक बिंदूने आपली दिशा बदलली.
पूर्वी काहीपण बोललो तरी कुणाला फरक पडत नव्हता. पण काय ना प्राध्यापक हा शब्द नावाआधी लागला आणि प्रश्न निर्माण व्हायला लागलेत. मग त्यातून सुरु झाला दूर जाण्याचा प्रवास. मान सन्मान या गोष्टी मोठ्या व्हायला लागल्यात. फेसबुक वर ची टिप्पणी हि अयोग्य वाटायला लागली. कारण आपण निष्पाप आहोत, सुसंस्कृत आहोत हे जगाला दाखवायचं असते.  चांगली प्रतिमा तयार करायची असते. अशी प्रतिमा जी कधी नसतेच. वरून कितीही कपडे चढवले तरी आत काय असते ते सगळ्यांना माहित असतेच. सगळे एकच माळेचे मनी. तरीपण मी नाही त्यातला ची धडपड काही थांबत नाही. इतरांचं प्रेम टिंगल टवाळी चा विषय. म्हणून हनुमान पासून गुबगुब पर्यंत विशेषणे शोधून झालीत.
प्रेमात काय काय नाही करत लोकं. स्वतःला फार तत्त्वनिष्ठ समजणारे लोक शरण गेलेत. नुसते शरण च गेले नाहीत तर त्यात वाहून गेलेत  आणि अस्तित्व गमावून बसलेत. ती नाही तर कोणीच नाही इथपर्यंत मजल. कुणी सोन्याची चेन भेट म्हणून दिली तर कुणी महागडा मोबाईल फोन घेऊन दिला. अशा ऑफर्स जोरात आहेत. लव यु, मिस यु सारख्या संदेशांनी इनबॉक्स फूल होताहेत. रोज सकाळी उठल्यानंतर गुड मॉर्निंग करणारे हि पाहिलेत. कधी मित्रांना केल नाही पण तिला फोन मात्र नक्की. एवढं सगळं करून नैतिकतेचे आव आणायचे. मग प्रश्न येतो तो आजवरच्या टीका-टिप्पणी चा. कदाचित झालं गेलं गंगेला मिळालं असंही म्हणता येईल. पण गंगा कुठं पवित्र राहिलीय आता. गंगा तर कधीच मैली झाली. जिथं सगळंच कलुषित झालं तिथं गंगेला पुन्हा तेच वैभव प्राप्त करून देणं अवघडच ना.
एक चौकोन बनवायचा होता. बिंदूंची जुळवाजुळव सुरु होती. तीन बिंदुंच्या सहाय्याने चौकोन बनवायला निघालो होतो पण काय झालं कुणास ठाऊक. आधी स्पष्ट दिसणारे बिंदू अस्पष्ट दिसायला लागलेत. तीनही बिंदू जवळ च होते. चौकोन बनवण्याची अपेक्षा प्रत्यक्षात येणार अस वाटत होतं एका बिंदूची कमतरता असूनही. पण सगळे बिंदू एखाद्या वाऱ्याच्या आघाताने/वेगाने दूर फेकल्या गेलेत ते पुन्हा कधी हि जवळ न येण्यासाठीच. आता ते बिंदू जवळ येणार हि नाहीत एवढं अंतर वाढलंय. प्रत्येक बिंदू ने एक आडोसा/आधार घेतलाय कसलातरी स्वतःच तथाकथित अस्तित्व टिकवण्यासाठी. अस्तित्व जे कधीच नव्हते. अस्तित्व म्हणजे नेमकं काय? निर्माण केलेलं कि निर्माण झालेलं?  आणि अस्तित्व नसलंच तर जगता नाही येत? मानलं तर सगळं आहे नाहीतर काहीच नाही. मग नेमकं करायचं काय? कुणीतरी म्हटलंय माणूस आशेवर जगतो. पण नाही माणूस आशेवर जगत नाही तर अपेक्षेवर जगतो. आशा नेहमी निराशेकडे घेऊन जाते आणि अपेक्षा अपेक्षाभंगाकडे. आणि आपण हि जातोच कसलाही विचार न करता. पण आपण तर तिथेच असतो....हो ना?
माणूस बदलला कि संवाद बदलतो. किती ढोंग करतो न आपण.  पण त्या चौकोनापेक्षा वर्तुळ परवडलं न. आपलं जीवन नाही का त्या वर्तुळासारख झालंय. फिरून झालं कि आपण येतो आपल्या मूळ जागी. अर्धा ग्लास रिकामा कि भरलेला यावरून कुठं दृष्टीकोन समजतो का? राहणीमान बदललं म्हणून विचार बदलतात का? बी पॉझीटीव्ह म्हटल्याने खरंच आपण पॉझीटीव्ह होतो का? नाहीच होत....मग हि धडपड कशासाठी? काटेरी झाडांना कुंपणाची गरज काय? बाकी काय तर शून्य....सुरुवात हि तिथेच आणि शेवट हि तिथेच...
थोडक्यात पण महत्त्वाचे: कुणीही वैयक्तिक घेऊ नये. सगळं काल्पनिक आहे. साधर्म्य असल्यास योगायोग समजावा.

सचिन भगत