Tuesday, December 17, 2019

महिला सशक्तिकरण (Women Empowerment)

महिला सशक्तीकरण...भरपूर लिखाण झालंय...बोलल्या गेलंय...गल्ली-बोळापासून तर संसदेपर्यंत चर्चा...चर्चा आणि चर्चा फक्त. कुठंय महिलासशक्तीकरण हा प्रश्न पडल्याखेरीज राहणार नाही.
स्त्री म्हणजे दुर्बलता ....काहीतरी कमी असं ओबळ-ढोबळ चित्र प्राचीन काळापासून रंगवण्यात आलंय. त्याच्या बाहेर यायला आपण अजूनही तयार नाही. आजकाल स्त्रिया विविध क्षेत्रात काम करत आहेत. चांगल्या पदावर आहेत. पुरुषांपेक्षा कुठेही कमी नाहीत. अशा स्त्रियांचं प्रमाण किती? अगदी नगण्य...ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत.
अधून-मधून महिला आरक्षणाच्या गप्पा होतात...चर्चा झडतात.  पण राजकीय आरक्षण देऊन भागणार आहे? जे काही आहेत त्यात काय दिसून येतंय...अनेक ठिकाणी महिलांचे कारभार त्यांचे पती महाशय पाहतात. महिला फक्त सयाजीराव.
शिकत असताना सिमोन दि बोव्हा चं द सेकंड सेक्स नावाचं पुस्तक वाचनात आलं होतं. फार काही समजलं नाही. पण स्त्री स्वातंत्र्य वगैरे काय तेवढं लक्षात राहिलं. त्या स्त्री आणि पुरुष यांचातला भेदाभेद मस्त मांडलाय.

 Two separate beings, in different circumstances, face to face in freedom and seeking justification of their existence through one another, will always live an adventure full of risk and promise." (p. 248)” Simone de Beauvoir, The Second Sex

Representation of the world, like the world itself, is the work of men; they describe it from their own point of view, which they confuse with absolute truth.” Simone de Beauvoir, The Second Sex

Man is defined as a human being and a woman as a female — whenever she behaves as a human being she is said to imitate the male.” Simone de Beauvoir
तसंच कमला दास याचं आत्मचरित्र माय स्टोरी मध्यंतरी वाचनात आलं. स्त्री स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या असलेल्या कमला दास याचं लिखाण म्हणजे पुरुषी परंपरेला छेद देणारं. सडेतोड...ज्या विषयवार सहजासहजी कुणी बोलत नाहीत त्यावर त्यांनी परखड भाष्य केलंय. जे शब्द चार-चौघात आपण बोलायला अजूनही अडखळतो त्यावर त्यांनी परखड लिहिलंय. एका स्त्रीच्या च्या वेदना म्हणा...स्वातंत्र्याची आस म्हणा किंवा अजून काही.
स्त्री-पुरुष यांच्यातला भेदाभेद आलातरी कुठून? त्याची सुरुवात कुठून...प्रत्येक घरात...प्रत्येक माणसाच्या मनात...जीन्स मध्ये म्हटलं तरी चालेल.
निसर्गाने निर्माण करताना कधीही भेदभाव केला नाही. आपण मात्र प्रत्येक ठिकाणी भिंती निर्माण केल्या.
प्रत्येक गोष्टीची सुरुवात घरापासून होते. कायदा करून, नियम बनवून महिला सशक्तीकरण  होणार नाही. आपण बदललं पाहिजे. बुरसटलेल्या मानसिकतेतून बाहेर यायला हवं.
सबरीमाला मंदिर असो, शनी-शिंगणापूरच शनी मंदिर असो अथवा अनेक अशी मंदिरे जिथे स्त्रियांना प्रवेश निषिद्ध होता त्यावर झालेला वाद आठवत असेल. कुणी सांगितलं हे. पुरुषी संस्कृती...दुसरं काय?
मालिका असो, चित्रपट असो stereotype सुटत नाही. थोडा-बहुत बदल व्हायला लागलाय पण तो पुरेसा नाही.
सातच्या आत ची संस्कृती घट्ट झालीय. आपण बंदिस्त करून ठेवलंय स्त्रियांना एका प्रतिमेत. डूज आणि डोंट फक्त त्यांच्यासाठी. पुरुष मात्र मोकाट. काही केलं तर मर्दानगी चं प्रतिक.
एकदा मुलगी बघण्याच्या ठिकाणी जावं लागलं...सगळीकडच चित्र म्हणजे मुलाकडच्या लोकांनी प्रश्न विचारायचे आणि मुलीने उत्तरे द्यावी.  फक्त मुलीनेच प्रश्नांची उत्तरं द्यावी काय?
प्रश्न काय तर....नाव...शिक्षण...जन्मतारीख....झालं.
मी न राहवून म्हटलंच...बाई तुला काही विचारायचं असेल तर तू पण विचार...काळ बदललाय आता.
सर्व मुलांवर अवलंबून का? मुलींना चोईस का नाही? मुलीचा बाप backfoot वर नेहमीच. असं का? असे अनेक प्रश्न आहेत.  ही प्रथा काही बदलत नाही. कारण बदल आपल्याला आपल्या घरात नकोय. तो इतरांच्या घरात हवाय. जे काय बदलायचं ते इतरांनी बदलाव आपण नाही. ही आपल्यापैकी प्रत्येकाची मानसिकता.
स्त्रियांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायला हवं.चूल आणि मुल यातून सुटका केली पाहिजे. समाज फार विचित्र आहे. एखाद्या माणसाने बायकोला घर-कामात मदत केली तर त्याला वेग-वेगळी विशेषणं लावली जातात. यात घराची मंडळी सर्वात पुढे. म्हणजे जे पुरुष थोडा-बहुत बदल करू इच्छितात त्यांही नाउमेद केलं जातं.
अगदी मोजक्या स्त्रियांना ह्या रूढी-परंपरा झुगारत्या आल्या आहेत. हे प्रमाण वाढायला हवं. त्याशिवाय पर्याय नाही. मुलांना वेगळा न्याय , मुलींना वेगळा न्याय. हे चक्र थांबवण गरजेचं आहे. त्याचं ही आयुष्य आहे. त्यानाही जगू द्यावं त्यांच्या मनाप्रमाणे.
एकदा एका लग्नात नवरदेवा कडील लोकांनी नवरदेवाला उचलून घेतला हार टाकते वेळी, आता त्या मुलीने काय कराव? विचित्र आहे सगळं. गमती-जमती चालतात हो. पण त्या कुठल्या प्रकारच्या असाव्यात? याचं कुठलंही भान नाही.  

त्या “लिपस्टिक अंड र माय बुरखा” मध्ये नाही त्या स्त्रिया स्वातंत्र्याच्या शोधात असतात. जे त्यांचा अधिकार आहे ते त्यांना कधीच मिळत नाही. मग नाईलाजाने त्यांना काहीतरी करावं लागतं.
मालिका, चित्रपट यांची समाज-प्रबोधन करण्याची जबाबदारी असते.  पण कित्येकदा तसं होत नाही. ते अजूनही पारंपारिक चित्रण रंगवतात स्त्रीचं काही बोटावर मोजता येणारे अपवाद वगळले तर.
राजा राम मोहन रॉय चं काय होतं....समाज बदलायचं होता. स्त्रियांवर होणारे अत्याचार थांबवायचे होते. फुलेंनी तेच केलं. त्यामुळे स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली झाली. आज क्रांती ची गरज आहे. कित्येकदा आपले अधिकार मागून मिळत नाही. ते घ्यावे लागतात.
सोशल मेडिया वर स्त्रियांवर अश्लील भाषेत टीका-टिप्पणी करणारे काही कमी नाहीत.  तू गप्प बस...तुला काय कळतंय? असे स्त्रियांना उद्देशून होणारे संवाद रोज चेच. घरोघरी.  म्हणजे सगळं समजणे-उमजणे याचा ठेका फक्त पुरुषांचाच. स्त्री ही काय फक्त उपभोगाची वस्तू नाही हे रुजवणं गरजेचे आहे.  कंगना राणावत बघा....स्पष्ट बोलते...सगळ्या रूढी-परंपरा स्त्रियांनी वेशीवर टांगायल्या हव्यात.  
स्त्रियांवर होणार्या अत्याचारांच्या अनेक घटना देशाच्या कानाकोपर्यात घडत आहेत. पेपरात वाचून, मोर्चे वगैरे काढून तर कधी एखादं twit करून, फेसबुक पोस्ट लिहून आपण निषेध व्यक्त करतो. एवढं करून भागणार नाही. कृती हवी.
सकाळी उठून चहा घेऊन येहे वाक्य जेव्हा थांबेल तेव्हा बदलाची अपेक्षा करूया.


सचिन भगत (9922127385)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय
शेगाव