Monday, December 8, 2014

पुणे विद्यापीठ- भाग ७ (अविस्मरणीय गेट-टुगेदर)


सुरुवात कुठून करावी हे कधीच कळत नाही. काहीतरी डोक्यात येतं आणि लिखाण सुरु होतं. आयुष्यात अनेक प्रसंग आलेत. नेमकं कुठल्या प्रसंगावर लिहावं हेच कळत नव्हतं. तेव्हा एका प्रसंगाची आठवण झाली. पुणे विद्यापीठात होतो. पहिल्या वर्षाची परीक्षा संपली होती. आमच्या वर्गात एकजूट कधीच नव्हती. प्रत्येकाचं तोंड वेगळ्या दिशेला. सगळे एकत्र यायचे म्हणून आम्ही गेट टुगेदर करायचं ठरवलं. मी, रव्या, सुभाष, मनोज, जित्या, संदीप आणि आन्या असे सगळे मिळून मनोज महेर च्या रूमवर जायचं ठरलं. रूम विद्यापीठाच्या जवळचं होती. नॉन वेज आणि ड्रिंक असा मेनू. पैसे गोळा करून रात्री आम्ही तिथं पोचलो. आवश्यक सगळं खरेदी केलं. मग सुरु झाली पार्टी. मनोज, आन्या आणि जित्या काही ड्रिंक घेणारे नव्हते. मी, कदम, रव्या आणि संदीप मनसोक्त प्यायलो. माझा तो पहिलाच प्रसंग. त्यामुळे किती घ्यावी काही कळल नाही. त्यातून च YOU KNOW, MY MIND IS MOVING हे वाक्य आलं. नंतर ते वाक्य फार प्रचलित झालं आमच्यात.

एकच मिनिट थांबा, मला तिला फोन करायचा आहे, प्रॉमिस केलंय मी तिला. असा म्हणणारा तो सुभाष. आता ती कोण कधी त्याने स्पष्ट सांगितलं नाही. आम्हाला माहित असूनही खेचण्याचे उद्योग मात्र सुरु राहायचे. त्याचं आणि माझं कधी जमत नव्हतं . कारण त्याला जी मुलगी आवडत होती तिच्यावर मी पण लाईन मारतो असं त्याला वाटत होतं. त्याने धमक्या देऊन पाहिल्या खूप वेळा. तिचं लग्न झाल्यावर मात्र तो बदलला. त्याचं ते प्रेम सगळ्यांना माहित होतं. प्रत्यक्षात आलं नाही तो भाग वेगळा. अर्थातच एकतर्फी असल्याने पराभव निश्चित होता. पाच नंबरच्या वसतिगृहात राहत असताना मात्र आम्ही कधी नव्हे ते चांगले बोलत होतो. खूप वेळेस सोबत पार्ट्या केल्यात. तो नेहमी मला सच्या म्हणायचा. सच्या साल्या हे नेहमी त्याच्या तोंडी असायचं. आम्ही पण काही त्याच्या नावाचा अपभ्रंश करायचं थोडी सोडलं होतं.

रव्या हे एक वेगळ व्यक्तिमत्त्व. शांत राहील तो रव्या कसला. पार्टी मध्ये त्याचा पाय काही ठिकाणावर राहत नव्हता. वारंवार जमिनीवर आदळत होता. माझा भगत चा भग्या त्यानेच केलं. साल्याने नंतर सरळ नाव कधी घेतलंच नाही.

गेट टुगेदर मध्ये सगळ्या पोरींचा इतिहास समोर येत गेला. कोण काय करत आणि कुणासोबत फिरतं , कुणाला कोण आवडते, रात्री फोनवर कोण कुणाशी बोलतो अशा सगळ्या खमंग चर्चा. दोन-तीन तास हे सगळं सुरु होतं. खाण्याचा काही प्रश्नच नव्हता.

जे काही खाल्लं ते काही वेळाने सगळं बाहेर पडलं. तो रव्या मात्र अरे भग्या मेला कि जिवंत आहे म्हणून ओरडत राहिला आणि खाण्याचा आनंद घेत राहिला. खऱ्या अर्थाने सगळ्यांचा mind move झाला होता.

तरी पण मनाने आम्ही काही एकत्र आलो नाही. ते शक्य झालं ते एम ए झाल्यानंतर. नंतर कुठलाही वाद उरला नाही. कारण वाद असण्याचं कारण म्हणजे मुली. आता त्याचं विद्यापीठात नाही म्हटल्यावर सगळं कसं शांत होत. त्यामुळे वादविवाद आपोआप संपले होते. नंतर कदम माझा चांगला मित्र झाला. सगळं विसरून आम्ही ध्येयाकडे वाटचाल करत होतो.

आन्या बद्दल किती लिहावं. तो आमच्यासाठी क्रीटीसीझम मधला डेरीडा. खऱ्या अर्थाने आधुनिक.  आधी लिव इन रिलेशनशिप आणि नंतर रजिस्टर लग्न असा तो त्याचा प्रवास. एके काळी माझ्या शिवाय कधी जेवत नव्हता. नेहमी माझ्या आसपास असणारा मित्र. गरजेच्या वेळी नेहमी धावून येत होता. वादविवाद होत राहिलेत पण आमच्या संबंधात कधी दुरावा आला नाही. अपयश च्या वेळी मानसिक आधार देणारा तोच. त्याच्या रूमवर ची खिचडी कशी विसरणार. घरून आला कि डब्बा आणायला कधी विसरायचं नाही तो. आम्ही तर त्याची वाटच पाहत होतो. एकदा तर रात्री दोन वाजता आम्ही त्याच्या घरी जाण्यासठी पुण्यातून निघालो. बारामतीत पोहोचेपर्यंत सकाळ झाली होती. तिथून पन्नास किलोमीटर अजून प्रवास होता. काय मजा आली होती त्या प्रवासात. थंडी चे दिवस आणि गाडी चालायची म्हणजे सोपं नव्हतं. बऱ त्याला गाडीही चालवता येत नव्हती. त्याच्या घरी पोहचे पर्यंत मात्र माझी वाट लागली होती.

संदीप म्हणजे एक अस्सल व्यक्तिमत्त्व. मुलींच्या प्रेमात रडणारा. जी आवडत नव्हती तिला बहिण म्हणणारा. त्याला किती वेळा प्रेम झालं ते नाही सांगता येणार. पण त्याच्या शेवटच्या प्रेमाच्या वेळी मी साक्षीदार. तिच्या सोबत राहून तो फार बदलून गेला होता. तिच्यासोबत कुठ कुठ फिरला असेल त्यालाच माहित. तिचं लग्न ठरलं तेव्हा तर खऱ्या अर्थाने मजनू झाला होता. खरंच झाला होता कि नाटक करत होता ते त्यालाच माहित. तिच्या लग्नाला आम्ही पुण्यातून थेट नाशिक गाठलेलं. खिशात फक्त तीकीटापुरते पैसे. तिथे गेल्यावर एका जुनिअर कडून पाचशे रुपये घेतलेले परत येण्यासाठी. प्रवासात चहा पिण्यासाठी हि पैसे नव्हते. भूक लागली होती पण जेवण च गेलं नाही आणि आम्ही परत आलो.  एकदा त्याची आणि माझी मुंबईत भेट झाली. पूर्वीचे दिवस कधीच संपले होते. नवीन आयुष्य सुरु झालं होतं.

यात नंतर आमच्यात सामील झाला तो अजिंक्य. तसं आम्ही त्याला आज्या म्हणतो. तो एक वेगळाच माणूस. कुणालाही आपलेसे करून घेण्याच त्याचा स्वभाव.एकदा त्याच्या जवळ गेलं कि तो कधीही दूर होत नाही. त्याचे अनेक किस्से रंगवून सांगण्यात काही लोकांचे दिवस गेलेत. मुळात त्याच्याबद्दल फार गैरसमज असायचे इतरांचे. पण तसं काहीच नव्हतं. तो एक चांगला गृहस्थ. कुणाशीही कधीही वैमनस्य त्याने ठेवलं नाही. इतर काय म्हणतात ते तो दुर्लक्ष करतो. आणि त्याला वाटेल तसं जगतो. मानसं कशी जोडावी हे त्याच्यापासूनच मला थोडं शिकायला मिळालं. मला जमलं नाही तो भाग वेगळा. पुण्यात गेलो कि त्याला नेहमी भेटतो. विद्यापीठात फेरफटका मारून आम्ही जुन्या आठवणींमध्ये रमून जातो. जातीने ब्राम्हण असला तरी सर्वसमावेशक. जातीचा त्याला कधी अभिमान नाही. आमचा तो विद्यापीठाबाहेर चा कट्टा कायम असायचा. पण त्याला पोरींचा फार नाद. दिसायला देखणा असल्याने ते साहजिक होतं. त्याचा अभ्यास म्हणजे परीक्षेच्या आधी. जयकर मध्ये फार वेळ कधी न बसू शकणारा तो. काही दिवसांपूर्वी पुण्यात गेलो तेव्हा भेटला. अजूनही तसाच. भरपूर वेळ आम्ही सोबत घालवला. कित्येक विषयांवर चर्चा झाली. आपलेपण काय असते हे तेव्हा खऱ्या अर्थाने कळाल.  

आता मी काय फार धुतल्या तांदळाचा होतो अस नाही. माझेही अनेक उद्योग सुरु असायचे. हि झाली कि ती. पण अयशस्वी.

आता  सगळे वेगवेगळ्या मार्गाला लागलेत. ध्येय एकच होतं. नेट पास व्हायचं. नंतर ते प्रत्यक्षात आलंही. रव्या गावाकडेच ४० किमी अंतरावर कॉलेज ला आहे. आन्या आय आय टी मध्ये पी एच डी करतोय. कदम कोकणात आहे. एकदा महाड ला गेलो होतो तेव्हा त्याला भेटलो. नंतर काही भेटण्याचा योग आला नाही. संदीप नाशिक ला आहे. जित्याचा काही पत्ता नाही. सगळे विवाहबद्ध झालेत. दुर्दैवाने कुणाच्याही लग्नाला जाता आले नाही. विद्यार्थी अवस्था संपली कि मोकळेपणा ने जगता येत नाही. वाढत्या जबाबदार्यांमुळे प्रत्येकजण बंदिस्त होतो. कधीतरी संपर्क होतो. पण तो हि कामानिमित्त.
ते दिवस म्हणजे भारलेले क्षण. असे ते विद्यापीठातले दिवस. काटेरी वाटेवर चा प्रवास परंतु सुवर्ण भविष्याची स्वप्ने पाहताना प्रत्येकाने ते हि स्वीकारलं. चढ-उतार येत राहिलेत पण न डगमगता प्रत्येकजण पुढे चालत राहिला. या कालावधीत या सगळ्या मित्रांनी जीवनाला वेगळा अर्थ दिला. आठवणीत ठेवण्यासारखे क्षण दिलेत. सुरुवात कशी पण असो परंतु शेवट मात्र चांगला झाला. कुणाच्याही मनात कुणाबद्दल गैरसमज नव्हता. आणि तेच महत्त्वाचं आहे.

कधी वेळ मिळालाच पुन्हा एकदा गेट टुगेदर करूयात.

Miss you all. Miss every moment that we spent together. For all the members of the First Ever GET TOGETHER…
(काही मर्यादांमुळे सगळ्या गोष्टी लिहू शकलो नाही.....त्या समजून घ्याव्यात.)


















Thursday, November 27, 2014

अन्नुत्तरीत प्रश्न-रिकामटेकड्या गप्पा

Laptop घेतल्यापासून कित्येक चित्रपट मी गोळा करून ठेवलेत. कधीही चित्रपट पूर्ण न पाहणे हा माझा छंद. दोन तीन तासांचा चित्रपट एका तासामध्ये पाहायचा. काल रात्री झोप लागत नव्हती म्हणून फोल्डर मध्ये कोणता चित्रपट पाहायचा हे शोधत होतो. त्यात Stanley ka Dibba हा एक चित्रपट होता पण मी कधी पहिला नाही. साधारण दोन-तीन वर्षानंतर पूर्ण चित्रपट पहिला. पुणे सोडल्यापासून कुठल्या थीएटर मध्ये जाऊन चित्रपट पहायची इच्छा झाली नाही. चित्रपट पाहून झाल्यावर मन अस्वथ झालं. नकळत कसा भूतकाळात गेलो आणि बालपण आठवायला लागलं. हा लेख म्हणजे Stanley ka Dibba पाहिल्यानंतर ची प्रेरणा. एका चांगल्या कलाकृतीला एवढे दिवस नजरेआड केल्या गेल्याचं वाईट वाटल.

१९९०-ते २००० काळ. म्हणजे बालपण. शाळेत जाताना कधी कधी डब्बा घेऊन जात होतो. सगळे एकत्र येऊन डब्बा खाणे हे ओघाने आलेच. माझ्या डब्यात नेहमी भाकरी असायची. श्रीमंती घरातली पोरं पोळ्या सोडून काही खायची नाहीत. तो फरक स्पष्टपणे जाणवायचा. म्हणून दुपारच्या सुट्टीत घरी येऊन जेवत होतो. त्या वयात काय कळणार. पोळ्या मिळायच्या त्या फक्त सणासुदीला. मी आईला किती वेळ सांगायचो कि मला पोळ्या पाहिजेत पण कधी मिळाल्या नाहीत. अशा अनेक गोष्टी आहेत. ज्या गोष्टी लहान असताना आवडायच्या पण मिळाल्या नाहीत, आज त्या सगळ्या गोष्टींचा तिरस्कार आहे. आज सगळ्या गोष्टी आवाक्यात असताना मला कुठल्याच गोष्टीत इंटरेस्ट नाही.
लोक सरकारला कितीही अकार्यक्षम म्हणत असले तरी गरिबांना स्वस्त धन्य दुकानातून धान्य स्वस्तात देण्याचं श्रेय हि त्यांचं. गुणवत्ता कमी जास्त असेल. नाहीतर गरिबांना ह्या गोष्टी कधी मिळाल्या नसत्या.

मध्यंतरी दिल्ली ला जाण्याचा योग आला. मोठ्या हॉटेल ला कार्यक्रम होता. सलग तीन दिवस होतो तिथे. साधारण दोन-अडीच हजार लोक. फाइव स्टार हॉटेल म्हणजे सगळ्या गोष्टी मुबलक उपलब्ध. मी फक्त निरीक्षण करत होतो. दिसायला श्रीमंत असलेली लोकं खरंच किती गरीब असतात हे जेवणाच्या वेळी दिसून यायचं. जस त्यांना कधी मिळालाच नाही अशी त्यांची वर्तणूक.

आजही गरिबांना पुरेसं अन्न मिळत नाही. कित्येकांना उपाशी पोटी झोपावं लागत असेल याची तर कल्पनाच नाही. पुणे विद्यापीठात आज हि कित्येक मुले मेस बंद असली कि काहीतरी खाऊन वेळ निभावून नेतात. कारण बाहेर जाऊन खाण्याची ऐपत नाही. तेवढा पैसा नाही. भविष्याची स्वप्नं घेऊन येणारा प्रत्येक जण फक्त आशेवर सगळ्या गोष्टी निभाऊन नेतो. लोकं magi शौक म्हणून खातात पण आमच्यासाठी ते जेवणापेक्षा कमी नव्हतं. खिचडी बनवून खाणे हा पण त्यातलाच एक प्रकार. जर स्वस्त धान्य दुकाने बंद केली तर आजही कित्येक लोक उपाशी झोपतील. सरकारने सगळ द्यावं या मताचा हि मी नाही. फक्त मेक इन इंडिया ची घोषणा देऊन विकास होणार नाही किंवा स्वच्छ भारत अभियान चालवून देश स्वच्छ होणार नाही किंवा त्याही पुढे जाऊन जन धन योजना सुरु करून लोकांकडे पैसा येईल असंही नाही. सगळं डिजिटल झालं म्हणजे विकास झाला हा समज हि त्याच पातळीवरचा. ६०-७० टक्के मतदान झालं म्हणजे चमत्कार झाला हा आपला भाबळा समज. पण ३०-४० टक्के लोक मतदान करत नाही त्याचं काय? मग कशी काय आपली लोकशाही रुजली? आजही वास्तव काय आहे.

मुठभर श्रीमंत लोकांना गरिबी काय असते हे कळणार नाही. चांगल्या एसी रुममध्ये बसून गरिबांबद्दल पुस्तके, लेख लिहिणारे भारतात कमी नाहीत. पेट्रोल, नैसर्गिक वायू कोण वापरत? त्यावर सवलती चालतात सगळ्यांना. गरिबांकडे ना गॅस आहे ना गाड्या. आज नोकरी करणारे हि त्याचा फायदा घेतात. खर तर त्यांना सवलती द्यायलाच नको. बऱ आम्हाला ते नको असे स्वाभिमानी लोक आहेत तरी कुठे भारतात. शेतकरी लयास जात असताना सरकार मात्र शांत आहे. इंडिया शायनिंग चं बागुलबुवा करून तात्पुरत चांगलं वाटेलही. पण भविष्याचं काय?  सगळेच प्रश्न अन्नुत्तरीत आहेत. सरकार कुठलंही असो सामान्य लोकांच्या जीवनात काही बदल होत नाहीत.


शिक्षण क्षेत्राचे तर कधीच बारा वाजलेत. राजकारण्यांनी प्रचंड कमाई केली शिक्षणसंस्था उभारून. डीएड म्हणजे नौकरी हे समीकरण काळाच्या ओघात नष्ट झालं. पैसा आहे तर नौकरी. एका जागेचा भाव वीस-पंचवीस लाखांवर जाऊन ठेपला आहे. गुणवत्ता असूनही दारोदार भटकणारे विद्यार्थी काही कमी नाहीत. आवश्यक सगळ्या पात्रता असूनही आर्थिक व्यवहारांमुळे विद्यार्थी नोकरी पासून वंचित राहतात. कोण बदलणार हे सगळं. आपण बदलायचं तर सगळ्या परिस्थितीला सामोरे जाण्याची हिम्मत आहे कुठं आपल्यात. पोटासाठी चाललेली हि धडपड व्यक्तीला काय करायला लावेल कुणास ठाऊक. परवा एका मॉल मध्ये गेलो होतो. बाहेर एक मुलगा पाम्फलेट वाटत होता. मी ते घेतलही. त्याला सहज विचारलं कि काय शिक्षण झालंय तुझं. तो म्हटला एमबीए. काय वाईट अवस्था आहे. यात दोष कुणाचा? शिक्षण पद्धतीचा कि विद्यार्थ्यांचा. अन्नुत्तरीत आहे सगळं.

                                                                   Sachin Bhagat

Monday, July 28, 2014

अव्यक्त त्या भावना, अव्यक्त ते प्रेम आणि अशांत माझं मन.......



काल माझ्या एका मित्राचा फोन आला. मी जेवण करत होतो. मी नंतर फोन करतो असं म्हटलं. तो म्हटला, नक्की कर, मला महत्त्वाचं बोलायचं आहे. त्याला काय सांगायचं या विचार करत मी घाईघाईने जेवण संपवलं आणि घराबाहेर पडलो. त्याला फोन केला आणि आमचं बोलणं सुरु झालं. पुढे मी फक्त ऐकण्याचं काम केलं. तो जे काही बोलला ते त्याच्याच शब्दांत...
मला एक वर्ष झालं पुण्यात येऊन. पुणे विद्यापीठात एम.एस.सी. ला प्रवेश मिळाल्याने मी खूप आनंदात होतो. विभाग पण छान वाटत होतो. सगळं व्यवस्थित सुरु होतं. मी भविष्याची स्वप्ने रंगवायला सुरुवात केली होती. सहसा मी मुलांमध्ये मिसळत नव्हतो. आपण इथं का आलो आहे याची मला पूर्ण जाणीव होती. म्हणून सकाळी लवकर उठून सरळ ग्रंथालयाकडे माझी पावले वळत होती. विभागात लेक्चर संपल्यावर पुन्हा जयकर. असा माझा दिनक्रम होतं. पण कुणास ठाऊक होतं कि शांततेत चाललेल्या माझ्या जीवनात वादळ येईल म्हणून. ती शांतता हि मला आवडायला लागली होती. मी मितभाषी असल्याने फार मित्र नव्हते. कॅन्टीन कधी तासभर बसलो नाही कि निसर्गरम्य एलीस गार्डन मध्ये कधी गेलो नाही. कधी मन लागत नसलं तर एकटाच चतुश्रुंगी च्या टेकडीवर तासनतास बसून राहायचो. किती छान वाटत होतं ते. संध्याकाळ झाली कि पुणे किती सुंदर दिसायचं. सगळं शहर उजळून निघायचं. तर कधी त्या कातरवेळी माझ्या जीवनात हि तो प्रकाश लवकरच येईल याचा आभास देऊन जायचा. तो उजेड मला आशेचा किरण वाटत होता. मी वेगवेगळे अर्थ काढत असायचो. नकळत बाजूला बसलेल्या जोडप्यांकडे लक्ष जायचे. लोकं किती मग्न असतात त्यांच्या कामात. आपल्या बाजूला कोण आहे याचं हि भान त्यांना राहत नाही. इथे कुणीच कुणाची तमा बाळगत नाही. माझ्या शहरात तर असं कधी पाहायला मिळालं नाही.  नकळत माझं शहर आणि पुणे याची तुलना हि व्हायची. पुण्यात विद्यापीठात शिकत असल्याचा अभिमान वाटायचा. तो घरी गेलो कि पुण्यातल हे मित्रांना सांगायची मजा काही औरच.   सगळं कसं मजेत चाललं होतं. 


विभागात जाऊन मला दहा-पंधरा दिवस झाले असतील. माझ्या वर्गातील एक मुलगी नेहमी माझ्याकडे पाहत रहायची. मी तिकडे दुर्लक्ष करत गेलो. याआधी कधी कुण्या मुलीशी बोललो नाही कि कुणी मैत्रीण हि नाही. बरं मी कुण्या मुलीशी पण बोलत नव्हतो. विद्यापीठात घोळक्याने राहणाऱ्या मुला-मुलींमध्ये हि मी कधी गेलो नाही. मग हि माझ्याकडे का पाहते असते?  मुलगी खूप सुंदर. त्यामुळं माझाच काहीतरी गैरसमज होतो असं वाटलं. दिवसामागून दिवस जात राहिलेत. अजूनही ती माझ्याकडेच पाहत होती. मग याला गैरसमज तरी कसा समजू. कधी वाटलं तिला जाऊन विचारावं. पण ती हिम्मत कधी झालीच नाही. हळू-हळू मुलांमध्ये याची चर्चा सुरु झाली. ती सुंदर असल्याने खूप मुले तिच्या मागे होती. एक-दोन जणांनी तिला प्रपोज हि केलं. ती सरळ नाही म्हटली त्यांना. ती माझ्याकडे पाहते याची चर्चा पूर्ण विभागात झाली. हळू-हळू हे प्रकरण काही तिच्या गावाच्या विद्यार्थ्यांनी तिच्या आई-वडिलांपर्यंत पोचवलं. मला यातलं काहीच माहित नव्हतं.  एके दिवशी त्या मुलीचे नातेवाईक विद्यापीठात आलेत. मी अनिकेत कॅन्टीन कडे जात होतो. त्यांनी मला मध्येच गाठलं. माझ्या वर्गातील काही मुलंही त्यांच्यासोबत होती.   आमच्या मुलीचा नाद सोड नाहीतर महागात पडेल असं बरंच काही बोललेत ते. मी त्यांना खूप सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी माझं ऐकून घेतलं नाही. माझ्याबाजुने कुणीच नव्हतं. आयुष्यात पहिल्यांदा मित्र असायला पाहिजे याची जाणीव झाली. काही वेळानंतर ते निघून गेलेत. पण मी फार घाबरलो होतो. आजपर्यंत मी कुणाच्या घेण्यादेण्यात हि नव्हतो. माझं कुणाशी भांडण झाल्याचंही मला आठवत नाही. मी तसाच रूम ला गेलो तर ते पुन्हा कधी विभागात न येण्यासाठीच.

नोव्हेंबर महिना होता तो. सेमिस्टर ची परीक्षा जवळ आली होती. घराबाहेर पहिल्यांदा बाहेर पडलो होतो. जगाचा अनुभव नव्हता. फार कुणात कधी मिसळलो नाही. सामाजिक ज्ञान कधी आलं नाही त्यामुळे. मी स्वतः मध्येच गुरफटलो होतो. प्रश्न होता त्या मुलीचा. हळू-हळू मलाही ती आवडायला लागली होती. दिवसरात्र तिचाच विचार करत होतो. दिवसभर रूम ला पडून असायचो. अभ्यासात मन लागत नव्हतं. माझी मानसिक स्थिती ढासळत गेली. तिच्याशी मी कधीच बोललो नाही आजगायात. याला प्रेम म्हणावं कि आकर्षण. सुरुवातीला वाटलं हे आकर्षण चं आहे. पण मग इतर भरपूर मुली असताना मी तिचाच का विचार करतो.
या विचारप्रक्रियेत मी अभ्यास कधी सोडून दिला ते कळलंच नाही. परीक्षा जवळ आली होती. मी परीक्षेला गेलोच नाही. परीक्षा तर सोडा मी नंतर कधी विभागात गेलोच नाही. मी परीक्षेला गेलो नाही म्हणून तिने पण परीक्षा दिली नाही. निकाल लागला तेव्हा कळाल कि तिचे पण सगळे विषय बाकी आहेत म्हणून. दोघेही फेल. तिने परीक्षा माझ्यामुळेच दिली नाही हे मात्र नक्की होतं. तिचं हि माझ्यावर प्रेम आहे हे ठाऊक झालं होतं. पण तिला सांगणे कधी जमलं नाही. एक वर्ष निघून गेलं आता. मी दुसरे सेमिस्टर ची परीक्षा पण नाही दिली. एक वर्ष ड्रोप केलंय. पुन्हा प्रवेश घेतला आता पहिल्या वर्षाला. घरी सांगायची हिम्मत नव्हती म्हणून मामा ला फोन करून सगळं सांगितलं.

मामा वडिलांना भेटायला गेला. वडील बांधकाम काम करतात. दिवसाला २००-३०० रुपये मिळतात. मामा भेटायला सरळ त्यांच्या कामाच्या ठिकाणी गेला. त्यांना घेऊन एका हॉटेल ला गेला आणि चहा सांगितला. सगळा प्रसंग सांगितला. वडील रडायला लागले. त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. दिवसभर राब राब राबून बाप पैसे पाठवतो. ओवरटाईम करतो कारण मला दर महिन्याला पैसे पाठवावे लागतात. बापाचं अवसान गळालं होतं. मामानं कसाबसा धीर दिला. काय चाललं असेल त्याच्या मनात. काम करताना प्रत्येक क्षण माझा विचार करत असेल. मुलगा शिकतोय तर किती अपेक्षा असतील. अंग मेहनतीचं काम असून पण कधी खाडा टाकला नाही बापानं मी पुण्यात आल्यापासून. मी सांगू तरी काय सांगू त्यांना. कसं समजावू त्यांना. तो कि किती खचला असेल. पण बाप तो बाप. त्याने काळजावर दगड ठेवून हे पचवलं असेल. संध्याकाळी फोन केल्यावर बाप काहीच बोलला नाही त्याबद्दल. फक्त अभ्यास कर म्हटला. जे झालं ते विसरून कामाला लाग.
मला माझीच लाज वाटत होती. मी काय करून बसलो हे. आता पुन्हा नव्याने सुरुवात. आयुष्यातलं एक वर्ष वाया घालवलं मी. कुणासाठी आणि कशासाठी. बापच्या कष्टाच्या पैश्याचं मी चीज नाही केलं. त्यांनी पाठवलेल्या प्रत्येक नाण्यात त्यांची मेहनत होती. माझ्याकडे किती अपेक्षेने पाहतात ते. आईला काही काळात नाही. ती बिचारी साधीभोळी. तिला याचा गंध हि नाही. मला यातून बाहेर पडायचं आहे.
असं त्याने खूप काही सांगितलं. मला काय बोलावं कळत नव्हतं. तो असं काही करेल मला कधी वाटलं नाही.  रात्री मला कितीवेळ झोप नाही लागली. मला एवढं वाटलं तर त्याच्या वडिलांना किती वाईट वाटलं असेल. कसं सावरलं असेल त्या माणसाने स्वतःला. असे नानातऱ्हेचे विचार माझ्या मनात घोळत होते. या प्रसंगाचा विचार करता मला कधी झोप लागली ते कळलंच नाही. सकाळी उठलो ते कॉलेज ला जाण्यासाठीच.
प्रेम कि आकर्षण कि अजून काही. मला कळायला मार्ग नाही. त्याला समजवायला माझ्याकडे शब्द नाहीत.
प्रेम होतं तर तिला सांगायला तर पाहिजे होतं. कुणाचा दोष असेल यात. त्या मुलीचा कि याचा. एक वर्ष वाया गेल्याने त्याची काय स्थिती असेल. त्याचं मन कुठं असेल. अशी अनेक मुलं पुण्यात स्वप्न घेऊन जातात. कुणाची स्वप्ने प्रत्यक्षात येतात कुणाची अधांतरी राहतात.



Wednesday, July 23, 2014

पुणे टू शेगाव व्हाया पंढरपूर...


५ ऑगस्ट २००६ ला मी पुण्यात गेलो. सगळं काही नवीन होतं. कुणीही ओळखीचं नव्हतं. मला अजूनही आठवतो तो पहिला दिवस. करमत नव्हतं म्हणून मी शिवाजी पुतळ्याजवळ कित्येक तास घालवले. आपण इथं कशाला आलोय म्हणून विचार हि आला मनात. कारण मन जळगाव मध्ये गुंतलेलं होतं. तिथल्या आठवणी पाठ सोडेना. सुरुवातीचे काही दिवस फार कंटाळवाणे होते. हळू हळू मात्र पुणे उलगडत गेलं आणि मी तिथं रमत गेलो.  एम.ए. ची दोन वर्षे पाहता पाहता निघून गेली. त्यानंतर एम.फिल. आणि पत्रकारिता हि पूर्ण केलं.

पुण्यात पाच-सहा वर्षे झाली होती. जॉब सुरु होता पण मन लागत नव्हतं. त्यामुळे पुणे सोडायचं तर होतं पण योग्य संधी ची वाट पाहत होतो. वेगवेगळ्या ठिकाणी जॉब साठी अर्ज करणं सुरु होतं. यातच पंढरपूर हून एके दिवशी कॉल आला मुलाखतीचा. २९ नोव्हेंबर २०११ ला मी तिथं गेलो. मुलाखत संपवून जॉब चं फायनल झालं होतं. प्रश्न होता मी कधी रुजू होतो ते. अचानक पुणे सोडणं कठीण होतं. परंतु माझ्यासमोर पर्याय नव्हता. त्याला कारण हि तसच होतं. पुणे विद्यापीठात मी असंख्य स्वप्नं रंगवली होती. त्यापैकी कुठलंच प्रत्यक्षात येत नव्हतं. पाहिलेल्या सगळ्या स्वप्नांचा माझ्या समोर चुराडा झाला होता. त्यामुळे एकेकाळी चांगलं वाटणारं विद्यापीठ असह्य झालं होतं. नजरेसमोर स्वप्नांचा पाचोळा होत असताना तिथं राहणं शक्य नव्हतंच. सगळी स्वप्ने हवेत विरून गेली होती. ती प्रत्यक्षात येणारंच नाही असं मला वाटायला लागलं होतं.
 
२६ डिसेंबर २०११ ला मी पंढरपूर ला रुजू झालो. तिथं कुणी ओळखीचं नव्हतं. सगळं नवीन होतं. तिथं जेमतेम दीड वर्ष थांबलो. या कालावधीत खूप गोष्टी घडल्या. पंढरपूर मध्ये मला खूप गोष्टी मिळाल्या. नेट उत्तीर्ण होणे, एम.फिल पूर्ण, आणि पि.एच.डी. ला प्रवेश सगळं पंढरपूर ला असताना घडलं. विठ्ठलाची कृपा म्हणावयास हरकत नाही. पण तिथं हि नकोसं झालं नंतर. दूर असल्याने घरी येणे व्हायचं नाही. सुट्ट्या फार कमी मिळायच्या. म्हणून इतरत्र जॉब शोधायला सुरुवात केली. आणि त्यातूनच शेगाव ला येणे शक्य झालं. सगळ्या प्रक्रिया झाल्यानंतर मी पंढरपूर सोडलं. आणि शेगाव ला रुजू झालो. मी जिथं जिथं गेलो तिथं मला जिवाभावाची मानसं मिळाली. काहींच्या कुटुंबाचा भाग झालो. त्यांनी मला स्वीकारलं माझ्या गुण-दोषांसहीत. म्हणून पंढरपूर सोडताना त्रास झाला. खरं तर मी जे काही शिकलो त्याचं सगळं श्रेय या लोकांकडेच जातं. अभियांत्रिकी काय ते पंढरपूर ला समजलं खऱ्या अर्थाने. त्यापूर्वी माझा काही फार अनुभव नव्हता. संधी मिळत गेली आणि मी शिकत गेलो. काही लोकांचा सहवास आपल्याला भरपूर काही शिकवून जातो.

एक वर्ष पूर्ण झालं शेगाव ला येऊन. आता बऱ्यापैकी रुळलोय इथं. भलेही पंढरपूर सारखी कंपनी नसेल पण कामाचं समाधान आहे. घरी जाने येणे होते.  बरीच मित्रमंडळी आसपास आहेत त्यामुळे भेटीगाठी होत असतात. इथे काम आपल्या परीने करण्याचे स्वातंत्र आहे. कुणाचा त्रास नाही. कित्येक दिवसांपासून चाललेली भटकंती आता थांबली आहे. पुढे काय होईल माहित नाही. कारण जेव्हा जेव्हा मला इथं आपण रुळलो असं जाणवायला लागलं तेव्हा तिथून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरु झाली. हा माझा अनुभव आहे. आता काय होते तेच पाहायचे आहे.

अधून मधून जळगाव ला जात असतो. त्याच ठिकाणी खरी माझी सुरुवात झाली. त्याच शहरानं मला स्वप्ने दिलीत. जीवन जगण्याची नवी उमेद दिली. माझ्या विस्कळीत झालेल्या जीवनाला एक दिशा दिली. एक आशेचा किरण माझ्या मनात निर्माण केला. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग दाखवला. आणि मला जगण्याचं प्रेम निर्माण झालं. त्याचं शहरानं मला काही जीवाभावाचे मित्र-मैत्रिणी दिलेत. एम. जे. चं ते मुलाचं वसतिगृह आणि तेथील रूम नंबर १२. अनेक चर्चा, वादविवाद यांच्यासाठी प्रसिद्ध. त्याचं रूम मध्ये मी चांगल्या भविष्याची स्वप्ने पाहिली. काही प्रत्यक्षात आली तर काही काळाच्या ओघात नष्ट झाली.


माझ्या मनात स्वप्नरूपी अंकुर रुजवणारया त्या शहराला माझा मानाचा मुजरा.

Monday, June 30, 2014

AT THE TWENTY NINE...



पाहता पाहता आयुष्यातले एकोणतीस वर्ष निघून गेलेत. यातली बरीच वर्ष स्वतःच्या अस्तित्वासाठी खर्च झाली. आता ते अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष सुरु आहे. एखादी गोष्ट मिळवायची. त्यासाठी वाटेल ते करावं आणि मिळाल्यानंतर ते टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करावा. सगळं आयुष्य यातच निघून जाईल कदाचित. जीवन जगण्याची संकल्पना काहीतरी वेगळी होती सुरुवातीपासून. पण या भौतिकवादी जगात जिथं सगळं काही पैश्यासाठी सुरु आहे, मन रमत नाही. स्वतःसाठी थोडी भ्रांत हवी. विचार करावयाला वेळ हवा. नेमकं मी काय करतोय याची चाचपणी तर झाली पाहिजे. यातलं काहीच होत नाही. प्रत्येक क्षण काहीतरी मिळवण्याच्या मागे धावत असतो. ती हाव च नको आहे. सामान्य माणूस यापलीकडे करू तरी काय शकतो. परिस्थिती च अशी निर्माण होत जाते कि आपण गोष्टींमागे धावायला लागतो मग इच्छा असो व नसो. तेच शेवटी जीवन होऊन बसते.

समजायला लागल्यापासून बरीच वर्ष उलटली. आत्मिक समाधानासाठी आतुर असलेलं माझं मन आता भरकटलं आहे. मनातल्या त्या संकल्पना हि नष्ट झाल्यात. मनालाही आता व्यवहारवाद योग्य वाटू लागलाय ज्याच्या कधी मागमूस हि नव्हता, ज्याचा मी कधी पाठलाग हि केला नाही, जी संकल्पना हि माझ्या मनाला कधी पटली नाही. आज त्याच आधारावर जीवन जगणं सुरु झालंय. हव्या असलेल्या गोष्टींचा पाठलाग करता करता काय मिळालं तर तो व्यवहारवाद. जग व्यवहारवादावर चालत असेलही पण ते माझं उद्दिष्ट नव्हतं. आयुष्य कमी झालं एका वर्षाने आणि येणाऱ्या अडचणीही कमी झाल्यात. असलं आयुष्य खूप पाहिजे या विचाराचा मी नाही.


एक वेळ होती कि वाढदिवस असला कि खूप संदेश, फोन यायचे. रात्री बारा वाजता जवळच्या लोकांचे फोन तर ठरलेले. आज ना कुणाचा एस. एम. एस. आला ना कुणाचा फोन. ते फार चांगलं झालं. कारण औपचरिकता मला कधी पटली नाही. तिसाव्या वर्षाची सुरुवात झाली. येणाऱ्या वर्षात आव्हानं हि भरपूर आहेत. त्यात मी कितपत यशस्वी होतो ते येणारा काळच ठरवेल. अर्ध आयुष्य संपलं असंही म्हणता येईल. किती वर्ष जगणार हे काही आपल्या हातात नाही. खूप गोष्टी करायच्या आहेत. ते मिळवताना कदाचित आयुष्य जगता येणार नाही मनासारखं. स्वतःच्या आनंदापेक्षा इतरांचा आनंद महत्त्वाचा आहे. आयुष्य थांबल्यासारखं झालं आहे. नवीन गोष्टी होत नाहीत आजकाल. वाचन जवळपास संपल्यात जमा आहे. खूप प्रयत्न करून पाहिला पण एका पानापलीकडे वाचू शकलो नाही. रोज तेच तेच सुरु आहे. नाविन्याचा अभाव जाणवायला लागलाय. 

Saturday, May 24, 2014

पुणे विद्यापीठातील काही आठवणी...६


पुणे विद्यापीठात नवीन होतो तेव्हा. जयकर ला अभ्यासाला जायचं नेहमीचं झालं. मी कमवा आणि शिका योजनेत असताना सकाळी जयकर ला जाता येत नव्हतं. सकाळी काम करून मग सगळं सुरु व्हायचं. मला काम मिळालं ते फिजिक्स विभागात. काम काय तर तो परिसर स्वच्छ करायचा. सकाळी काम करत असताना कित्येक वर्ग मित्र मैत्रिणी हाय बाय करायच्या. सुरुवातीला खूप लाज वाटत होती झाडू मारायची. नंतर ते अंगवळणी पडलं. कमवा आणि शिका एक आदर्श आहे पुणे विद्यापीठात. लोकांचा दृष्टीकोन पण चांगला होता. त्यावेळेस चे विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक यांनी हि योजना एका चांगल्या पातळीवर नेऊन ठेवली. काम न करता पैसे घेणारे विद्यार्थी हि पाहिलेत. चाटुगिरी करणारे तर फार पुढे गेलेत. 

त्याचं झालं असं कि ६ ते ९ काम करून नंतर जयकर ला जाने सुरु झाले. तरी सकाळी जागा सांभाळून ठेवत होतो. आमचा बराच ग्रुप झाला होता. दिवसामागून दिवस जात राहिलेत. जयकर मध्ये माझी एक मैत्रीण नेहमी माझ्या सोबत असायची. वयाचा दोष म्हणा कि अजून काही. मला ती आवडायला लागली. ती जवळ असली कि कधी अभ्यासात मन लागलं नाही. मला कळत होतं कि मी ईथे कशासाठी आलो आहे पण मन मानत नव्हतं. मग एकदा ठरवलं कि तिला सांगून टाकायचं. दोन-तीन महिने झाले होते फक्त मला विद्यापीठात जाऊन. एके दिवशी दुपारी मी एका कागदावर लिहील कि तू मला फार आवडतेस...लग्न करशील का. तिच्या जवळ जाऊन तिला तो कागद दिला. अचानक असा कागद दिल्याने तिला आश्चर्य वाटलं. काय आहे म्हटली. मी म्हटलं तू वाच नि सांग मला. मी तेव्हा वरती बसत होतो. थोड्या वेळाने मला तिने बोलावलं नि चहाला जाऊ म्हटली. आतून मी घाबरलो होतो. तिच्या नजरेला नजर काही मला देतं येईना. मग तीच म्हटली कि मी विचार केला पण उत्तर देऊ शकत नाही. तिने ना होकार दिला ना नकार. बघू म्हटली पुढे. पुढे काही झालंच नाही. ती मला आवडते असं म्हणता म्हणता मला अश्या कित्येक आवडल्या. मी पण तिला कधी काय विचारलं नाही.
त्यानंतर मात्र आम्ही खूप चांगले मित्र झालो. तिनं प्रत्येक वेळी मला मदत केली. मी वाईट हि खूप वागलो तिच्याशी. आता तिचा नि माझा संपर्क नाही. प्रत्येक अडचणीत तिने मला साथ दिली. आम्ही दोघे भिन्न आर्थिक परिस्थितीचे. ती चांगल्या श्रीमंत घराची तर माझी दोन वेळेस च्या जेवणाची समस्या. आयुष्यात कुणाला तरी पहिल्यांदा प्रपोज केलं ते पण जयकर ग्रंथालयात. जिथं सगळे अभ्यासाला जातात. पण हा दुसराच अभ्यास झाला. हे मीच केलं असं नाही. जयकर मध्येच कित्येक प्रेम प्रकरणं सुरु झालेली आम्ही पाहिली. किती काळापर्यंत टिकली तो भाग अलाहिदा. पण मला जयकर कधीच पावलं नाही. तिथं बसून ना नेट पास झालो ना इतर काही झालं. आता माझं तिच्यावर खूप प्रेम होतं असं मी म्हणणार नाही कारण नंतर मला कित्येक मुली आवडल्या नि कित्येक वेळी प्रेमात पडलो. Love does not happen once in life. It happens many times in life. माझं एक पक्क मत आहे....प्रेम वगैरे काही नसते ...असते ते फक्त शारीरिक आकर्षण....प्रेम हा शब्द फक्त एक mask आहे.....LOVE IS ONLY A MASK…..IT ALWAYS ASKS FOR THE UNION OF TWO BODIES….LOVE DOES NOT EXIST IN SUCH CASES (EXCEPTION...PARENTS AND CHILDREN).

एकदा आमच्या विभागातल्या विद्यार्थ्यांनी टी शर्ट बनवायचे ठरवले. मग त्यासाठी त्यांना एक चांगलं वाक्य हवं होतं आम्हाला. खूप विद्यार्थ्यांनी वेगवेगळे वाक्य सांगितली पण आम्हाला ती काही आवडली नाही. शेवटी मी एक वाक्य सांगितलं ...LIBRARY IS ALSO THE PLACE WHERE LOVE BEGINS. माझ्या काही मित्रांनी सपोर्ट केलं मला. पण मुली ऐकायला तयार नव्हत्या. माझ्या या वाक्यावर खूप वाद-विवाद झालेत. हे सुरु असताना माझा एक मित्र मुलींना उद्देशून म्हटला कि तुम्ही असे कपडे घालतात कि आम्हाला तुमच्याकडे पाहण्याची पण लाज वाटते मग या वाक्याने काय होणार आहे. बस मग काय. भन्नाट शिव्या दिल्या त्यांनी आम्हाला. ते वाक्य मी कुठंतरी वाचलेलं होतं. म्हणून सांगितलं. पण त्यावर वाद होईल असं वाटलं नव्हतं. काही मुलींनी तर आमच्याशी बोलणेच सोडून दिलं होतं काही दिवस. 

वाद आणि मी एक घट्ट समीकरण. विभागात प्रवेश घेतल्यापासून तर विद्यापीठ सोडेपर्यंत कुठल्या ना कुठल्या प्रकरणात मी अडकत राहिलो. काही मित्रांनी मला खूप साथ दिली त्यामुळे कशातच अडकलो नाही. मला नको तिथं हस्तक्षेप करण्याचा फार हौस. यातूनच एकदा राज्यशास्राच्या विद्यार्थ्यांशी वाद ओढवून घेतला. त्यातले कित्येक जन नंतर माझे खूप चांगले मित्र झालेत. झालं गेलं आम्ही विसरून गेलो. तेव्हा त्यांनी म्हणे मला मारायचं ठरवलं होतं. पण ते काही माझापर्यंत आले नाहीत. ती माझी आणखी एक चूक. मला त्या प्रकरणात पडायची काही गरज नव्हती. पण रहेमानी किडा कुठं शांत बसू देतो. ते असं होतं कि आमची एक जुनिअर मुलगी राज्यशास्राच्या एका मुलाबरोबर फिरायला लागली होती आणि तेच मला खटकलं होतं. मी त्यात पुढाकार घेतला आणि आम्ही काही मित्रांनी तिला ते समजावून सांगितलं. तिने त्याच्यासोबत चे संबंध तोडलेत. (काय होतं त्याचं याबद्दल मी अजूनही अनभिज्ञ आहे). पुढे माझा एक मित्र तिच्या प्रेमात पडला. तिनेही होकार दिला. त्याचं सगळं व्यवस्थित सुरु आहे. या प्रकरणावरून माझ्यावर भरपूर टीका झाली. हेल्थ सेंटर च्या प्रकरनासारखा इथेही माझा काही संबंध नव्हता. पण अडकलो मीच. लोकांनी खूप तोंडसुख घेतलं माझ्यावर. 

मी पुण्यात आयुष्य घडवायला गेलो होतो. पण नकळत मी या सगळ्या प्रकरणात गुंतत गेलो. विद्यापीठ एक मायाजाल आहे. तिथे आपलं जीवनच बदलून जाते. मी झपाट्याने बदलत गेलो. मला त्या मार्गाने जायचं नव्हतं. ते माझं उद्दिष्ट हि नव्हतं. माझा खूप वेळ वाया गेला यात. त्याची किंमत हि मी चुकवली. त्या आधी माझं जीवन मर्यादित होतं. सहसा कुठल्याही भानगडीत मी पडत नव्हतो. मी स्वप्नांचा पाठलाग करत होतो. स्वप्नांवर जगण्यात मला आनंद वाटत होता. कित्येक वाईट प्रसंग मी फक्त आशेवर निभावून नेलेत. पण काय झालं कुणास ठाऊक. पुण्यात गेल्यानंतर माझी स्वप्नेच हरवली. कधी हरवली मला कधी कळाल नाही. वर्तमान खराब होता. तो बदलायचा म्हणून मी पुण्यात गेलो. कदाचित या नको त्या प्रकरणांमध्ये गुंतलो नसतो तर लवकर यश मिळालं असतं. पण आयुष्यात जर तर ला काही महत्त्व नाही. म्हणून जे झालं ते योग्य होत असं म्हणून मी पुढे चालत राहतो. कारण जीवनात एकदा केलेली चूक दुरुस्त करता येत नाही. ती फक्त टाळता येते. आणि आज फक्त चुका टाळण्याचा प्रयत्न करतोय.

पुणे विद्यापीठातील काही आठवणी...५



एम.फिल करत होतो त्यावेळेस ची गोष्ट. संध्याकाळी गाईड चा फोन आला कि उद्या भेटायला ये म्हणून. मी होकार दिला. तेव्हा माझ्याकडे बाईक होती. उद्या जायचं कसं प्रश्न माझ्यासमोर होता कारण माझ्याकडे जेमतेम ५०-६० रुपये होते. रात्री मी काही मित्रांना पैसे मागितले पण त्यांच्याकडे नव्हते. सकाळी आठ वाजेला मी विद्यापीठातून निघालो. असलेले पैसे पेट्रोल साठी वापरले. शिरूर ला जायचं होत. जवळपास ६०-७० किलोमीटर. जाण्याचा प्रश्न नव्हता. पण यायच कसं? विचार करत करत शिरूर ला गेलो. गाईड ला भेटलो. जेमतेम १०-१५ मिनिट्स च काम होत. पण भेटन गरजेचं होतं. तिथून थोडं पुढे आल्यानंतर गाडी बंद पडली. ते होणारच होत. आता काय करायचं. तिथं ओळखीचं तर कुणी नव्हतं. सकाळपासून चहा पण घेतला नव्हता. तेवढेही पैसे नव्हते. गाडी एका बाजूला लावली आणि मी मित्रांना फोन करायला सुरुवात केली. दहा-पंधरा मित्रांना फोन लावले असतील. कुणाकडून च काही जमेना. 

माझा एक नाशिक च मित्र आहे. तो एका कॉलेज ला जॉब करत होता. शेवटी मी त्याला फोन करून सत्य परिस्थिती सांगितली. मला हवे होते फक्त दोनशे रुपये. साडे दहा वाजले होते. त्याला मी बँक अकाऊंट नंबर पाठवला आणि एका एटीएम जवळ जाऊन थांबलो. तो अर्धा तास म्हटला होता. मग मला थोडं बरं वाटलं. आणि त्याच्या फोन ची वाट पाहत थांबलो. एक तास झाला तरी त्याचा काही फोन येईना म्हणून मीच त्याला फोन केला. तर तो म्हटला कि मी एका विद्यार्थ्याला बँकेत पाठवलं आहे. असे दोन तास निघून गेले. दुसरा कुठला पर्याय पण नव्हता. दोनशे रुपयासाठी काय काय करावं लागलं.

त्याचं झालं असं कि मी त्याला महाराष्ट्र बँकेचा नंबर दिला तर त्याने त्या विद्यार्थ्याला एसबीआय मध्ये पाठवलं होत. बँके वाले म्हणत होते कि अकाऊंट नंबर चुकीचा आहे म्हणून. परत फोन करून सगळं व्यवस्थित झालं. साडेतीन तास मी तिथे बसून होतो. दोन वाजले होते. पैसे काढून सरळ गाडी ढकलत पेट्रोल पंपावर नेली. दीडशे रुपयांचे पेट्रोल टाकले नि पन्नास रुपये मला ठेवले. भूक लागली होती. सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं. तो एकमेव प्रसंग जेव्हा माझ्या गाडीतलं पेट्रोल संपलं. त्यानंतर ते आजपर्यंत तशी परिस्थिती आली नाही. 

शिरूर सोडलं ते थेट मध्ये एका हॉटेल ला थांबलो. थोडं खाऊन पुण्याकडे निघालो. संध्याकाळ झाली होती मी विद्यापीठात आलो तेव्हा. असं झालं होतं हे मी काही कुणाला सांगितलं नाही. 
कधी कधी स्वतःचा राग पण येत होता. माहित असून असं करायचं म्हणजे अवघड च आहे. पण मी आशावादी आहे. मी जर जातोय तर वापस कसातरी येईलच. काहीतरी होईल. म्हणून मी निघालो होतो. कितीही कठीण प्रसंग असला तरी मार्ग निघतोच. थोडा त्रास झाला. दहा पंधरा फोन करावे लागले आणि तीन चार तास वाट पहावी लागली. 

स्वतःहून अडचणी वाढवून घ्यायला फार आवडतं मला. नंतर पण गाईड ला भेटायला जाऊ शकलो असतो. पण गाईड नावाचा प्राणी फार विचित्र. बोलावून पण येत नाही म्हटल्यावर इगो दुखावला असता आणि वाट लावली असती माझी. तशी हि लावलीच पण एम.फिल पूर्ण झालं. काय संशोधन केलं मी देव जाने. पोटात काही नाही काय घंटा संशोधन होणार आहे. Research is not possible unless your basic needs are fulfilled. पण कोण वाचते ते. सगळे असंच करतात. 

थेसिस चं आयुष्य तरी काय तर एक ग्रंथालयात, दुसरा गाईड कडे आणि तिसरी प्रत आपल्याकडे. संपलं आपलं संशोधन. वर्षाकाठी कित्येक एम.फिल, पी. एच डी होतात. कुठं आहे त्याचं संशोधन. कुठला बदल पाहायला मिळाला आपल्याला. काहीच नाही. सगळं शून्य. पैसे दिले कि सगळं होत. आता तर गाईड हि पैसे मागत आहेत. पुण्यात तर परिस्थिती वाईट. काही गाईड ला तर फक्त मुली पाहिजेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली. मुलांना उभे पण करत नाहीत ते. संशोधनाच्या नावाखाली लुट सुरु आहे. विद्यापीठ विद्यावेतन देते त्यासाठी. पण बाकी काय तर शून्य. विद्यार्थी पण काय करणार. त्यांना ऐकून घ्याव लागते सगळं. मग कसा समर्थ भारत होणार. तो फक्त स्वप्नातच राहील. पुणे विद्यापीठान राबवलेल्या समर्थ भारत अभियानातून काय निष्पन्न झालं ते सगळ्यांना माहित आहे. काही लोक समर्थ झाले असतील तो भाग वेगळा. त्यावर न बोललेलं बर.

मला पैश्याचं नियोजन कधीच जमलं नाही. अजूनही जमत नाही. सेव्हिंग नावाचा प्रकार नाही आयुष्यात. कितीवेळा सेव्हिंग करण्याचा प्रयत्न केला पण अपयश. आता तर प्रयत्न हि करणे सोडून दिले. फक्त प्रत्येक क्षण जगायचं ठरवलंय. भौतिकवादी जगातून बाहेर पडण्याचा प्रयत्न सुरु आहे. आयुष्यात असे अनेक प्रसंग आलेत. त्याचा मी आनंद घेतो. I always feel that this is what I am born for. I am born to struggle….I am born to survive in spite of sudden ups and downs in life. 

-सचिन भगत

Wednesday, May 21, 2014

असंच काहीतरी ...३

खूप दिवसांनी काहीतरी लिहायला घेतलंय. म्हटलं तर कुठलाही विषय माझ्याकडे नाही. तरीपण काहीतरी कागदावर उतरवण्याचा प्रयत्न केला. शिकत असताना आपण खूप स्वप्न रंगवली. तासनतास चर्चा झाल्यात. पण त्यापैकी कुठल्याही स्वप्नावर आपण आजगायत काम सुरु केलेलं नाही. कारणे अनेक असतील. ती तर नेहमी असतात. पण असं मर्यादित जीवन अपेक्षित नव्हत केल कधी. आपण आपलं जीवन बंदिस्त केलंय एका परिघात. त्यातून बाहेर पडण्याची गरज आहे आता. किती दिवस मी आणि माझं कुटुंब या संकल्पनेत जगणार आहोत आपण. हे तर कधी ठरवलं नव्हतं आपण.

मी स्वप्नं पाहणं सोडून दिलंय आता. वास्तवात जगण्याची सवय करून घेतलीय. स्वप्नांवरनाहीजगता येत हे पण कळून चुकलंय आता. बारा वर्षाच्या बाहेरच्या जगात खूप काही अनुभवलं. आताकुठलाही अनुभव घ्यायची इच्छा उरली नाही. जीवन पण कस असतं. किती स्वप्नं दाखवतं पण प्रत्यक्षात काहीच येत नाही. मृगजळ आहे सगळं. आता त्यामागे लागण्यात अर्थ नाही म्हणून काहीतरी विधायक करावं म्हणतोय. काय ते निश्चित नाही. पण विचार केल्यावर काहीतरी निघेन. आयुष्य थांबल्यासारखं झालंय आजकाल. प्रत्येक दिवस येतो नि जातो. आजकाल फक्त महिना कधी संपतो नि पगार कधी हातात पडतो एवढच काय ते सुरु आहे. पगार आणि आपण. एक अदृध नातं निर्माण झालंय. पैसा आपल्याकडे येतो कि आपण पैश्यामागे धावतो काहीच कळत नाही. हेच का ते आयुष्य ज्याची आपण वाट पाहत होतो कित्येक वर्षांपासून. माझ्याकडे उत्तर निश्चितच नाही. अन कुनाकडे असेल असंही नाही. असलंच तर कुणी स्वीकारेल हि शाश्वती नाही.

आसपास सगळं बदललं आहे. अनुभवांनी कधी पाठलाग सोडला नाही. भटकत असताना व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या वाक्याचा पुरेपूर अनुभव आला. जग बदलत गेलं. आसपास चे सगळे बदललेत पण मी मात्र अजूनही हि तसाच आहे. मूळ स्वभावात फार काही बदल झाला नाही. आतातर होणे पण नाही. मी खूप काही करेन असं मला नेहमी वाटायचं. सारं काही फक्त वाटलंच. प्रत्यक्षात येण्याआधीच सगळं अचानक नाहीसं झाल. कि मी नाहीसं केलं. माहित नाही.

जीवन जगणं सोपं झालंय भूतकाळाच्या तुलनेत. म्हणून प्रश्न संपलेत, अडचणी संपल्यात असंही नाही. पण ती मजा नाही येत जगण्यात. सगळं तेच तेच होऊन बसलय. लोकांचे प्रश्न ठरलेले अन आपली उत्तरे हि ठरलेली. नवीन असं काही घडत नाही. घडवण्याची ती उर्मी हि नष्ट झाली. दोन वेळेस च्या जेवणाचा प्रश्न मिटला कि व्यक्ती काही करत नाही. तसंच काही माझं झालंय. कदाचित माझी मानसिकता बदलली असेल काळाच्या ओघात. शून्यातून सगळं निर्माण करताना होणारी कसरत कुणाच्या वाटेला येऊ नये.

आता शांतता हवी आहे. पण ती मिळेना शी झाली. कधीकधी हे सगळं सोडून दूर जावं म्हणतो. नको त्या अपेक्षा, नको तो संसार, अन नको ते मानवी जीवन जे फक्त पावलागणिक त्रास देतं. या सगळ्यापासून सुटका करावीशी वाटते. पण पुन्हा प्रश्न तोच अन उत्तर हि तेच. नुसतं वाटून उपयोग नाही. खरं तर उपयोगासाठी करायचं नसतंच काही. मग काय चाललंय हे. फक्त लिखाण कि मनातलं द्वंद कि अजून काही. का मनाची अस्थिरता. शेवटी मनाची घालमेल का होत असते नेहमी? आपण स्वतःला का शोधत असतो नेहमी?

जीवन न उलगडणारं कोडं आहे. ते उलगडण्याचा निरर्थक प्रयत्न सुरु आहे. नेमकं आपल्याला काय हवं आहे. काही कळत नाही. पण काहीतरी हवं आहे. म्हणून हि सगळी खटाटोप सुरु आहे. आपण नेहमी उत्तरांच्या शोधात असतो. सोप्या गोष्टी हि कठीण करतो. सगळं आसपास असून पण नसल्यासारखं जाणवतं नेहमी. हे माझ्या बाबतीत कि प्रत्येकाच्या च. कुणासठाऊक काय चाललंय ते. लहान असताना लवकर मोठं व्हावसं वाटतं. मोठं झाल्यावर मात्र लहानपण च चांगलं होत हि जाणीव त्रस्त करते नेहमी. आपण नेहमी धावत असतो कशाच्या तरी मागे. मिळालं तरी धावणं मात्र थांबत नाही. मग आपण धावतोच कशाला सगळं माहित असून. निष्फळ आहे सगळं. तरी त्यात अर्थ शोधण्याचा प्रयत्न सुरु असतो आपला.

आपल्याला वाटतं आपण स्वतंत्र आहोत. पण नाही. आपण स्वतंत्र नाहीच. आपण गुलाम आहोत. आपण तेच करतो जे इतरांना हवं असतं. आपण तसचं वागतो जे समाजाला अपेक्षित असतं. या पलीकडे आपण जात नाही. सगळे हेच करतात. मग कुठलं स्वातंत्र्य आहे आपल्याला. तरी आपण स्वतंत्र असल्याचा आविर्भाव आणतो नेहमी. कोणकुणाला फसवतं. आपण आपल्याला कि कुणी आपल्याला.भरकटत राहतो आपण अशा अनेक प्रश्नांभोवती. उत्त्तर नाही मिळालं तरी जगणं सुरूच असते. ते थांबतच नाही.अन आपण हि थांबत नाही. आपण शोध घेत असतो एका गोष्टीचा जी आपल्याला समाधान देईल. पण असं काही सापडतच नाही. तरी शोध मात्र सुरु असतोच अविरत. स्वतःला शोधताना आपण हरवून बसतो जे आपल्याकडे आहे. मग जे हरवलं त्याचाही शोध सुरु होतो. हे चक्र सुरु असतं सातत्याने.आपण मागे वळून कधी पाहत नाही. वर्तमानात काय आहे त्याकडे हि कधी लक्ष नसते आपलं. आपण नेहमी भविष्याचा विचार करत राहतो अन वर्तमान गमावून बसतो. अन हे कधी लक्षात येतच नाही. वेळपण कुठ असतो आपल्याकडे काय होतंय त्याचा विचार करायला. सगळं काही सुटेल पण माणसाची मिळवण्याची हाव काही केल्या सुटत नाही.आहे त्यात समाधान मानण्याची आपली नैसर्गिक प्रवृत्ती. ती फक्त दाखवण्यासाठी. खरं तर आपण समाधानी कधी नसतोच.

वसतिगृहातील पण काय आयुष्य होत साल. कायम दगदग. खोलीनंबर बारा मध्ये घडलेल्या घटना, चर्चा, एका डब्यामध्ये दोन लोकांच जेवण.आबा च्या मेस चे प्रकरणं थेट डॉक्टर गडे कडे नेण्यापर्यंत ची मजल.जॉनी चे भांडण लावण्याचे उद्योग. भोई ते लिखाण अन त्यातले आपण खलनायक. असं बरच काही. तरीपण कसलाही ताण नाही घेतला. स्वीकारत गेलो ते हे सगळं बदलणार म्हणून. ते बदललं हि. पण भूतकाळ विसरता येतच नाही कितीही प्रयत्न केला तरी. एनेसेस चंते शिबीर. तिथल्या त्या आठवणी नाहीच विसरता येणार. दोन रुपयाचा तो भाभीचा चहा. रोज पाणी सोडायचा ते काम तुम्ही सगळ्यांनी शिकून घेतलं आणि मी नसताना पार पाडलं हि. अन ते तयार झालेलं समीकरण कायम घट्ट होत गेल अनेक अडचणींमधून.  

जळगावने शिक्षनापलीकडचं आयुष्य दिल. वेळ मिळाला कि चित्रपट मग तो चेतना असो कि अजय चा एखादा. मला पुण्याला जायचं नव्हतं. मला तर प्रवेश परीक्षा पण द्यायची नव्हती पण कुणीतरी कि उत्तीर्ण हो आणि जाऊ नको. यशस्वी तर होऊन दाखव. मग सगळं झालं अन पुण्याला जायचा मोह आवरला नाही. माझ्या मागे जॉन्या पण आला. मला तो मोठा आधार.अधून मधून तू आश्चर्याचे धक्के देतं राहिलास. कधी माझ्या वाढदिवसाला तर कधी भेटायला येत राहिलास. मग आपण पुण्याच्या आसपास केलेली भटकंती अवर्णनिय. फ्लिपकार्टा नं पाठवलेलं ते पुस्तक मध्यरात्री बनवून खाल्लेली खिचडी ना तुला विसरता येणार ना मला. माझा स्वभाव फार चांगला नसतानाही तुम्ही लोकांनी ज्याप्रकारे जुळवून घेतलं किंवा अजूनही घेताय ते शब्दांपलीकडे आहे. आणि म्हणूनही कित्येक लोक आयुष्यात आलेत आणि गेलेत. पण कुणाशी भावनिक नातं कधी निर्माण झालं नाही.
जळगाव या शहरानं खूप काही दिलं. तिथेच सगळी स्वप्ने पाहिली. एमजे चं वसतिगृह लक्षात राहील ते त्या स्वप्नांसाठी. मागेपुढे ते सगळं प्रत्यक्षात आलंही पण जीवनाला एक वेगळ वळण देऊन गेलं.

अश्या अनेक घटना न थांबता सांगता येतील. पण माझ्याकडे तेवढे शब्द नाहीत. तेवढा वेळ हि नाही. जगण्यासाठी धडपड सुरु आहे. ती हि संपेल कधीतरी. मग शांतपणे बसून हे सगळं आठवून वेळ घालवावा लागेल. म्हणून थांबतो. पण लिखाण  थांबणार नाहीत. अधून मधून ते सुरूच राहील मग मी कितीही मग्न का असेना कामात. लिहायला सुरुवात केली तेव्हा काहीच नव्हतं डोक्यात पण सुरुवात केल्यानंतर आपोआप येत गेल. विषय नव्हता माझ्याकडे. पण विषय नसताना लिहिण्याचा प्रयत्न केला.

सचिन भगत

एका मित्राला पाठवलेले पत्र.....

पुणे सोडून पंढरपूर ला गेलो. जिथं कुणी ओळखीचं नव्हतं. सुदैवाने काही चांगले लोक भेटलेत. म्हणून पंढरपूर सोडल्यानंतर एका मित्राला पत्र पाठवलं. जग जरी तंत्रज्ञानाने बदलले असले तरी मला आवडतो तो पत्र व्यवहार. मनातल्या गोष्टी कागदावर उतरवण्यात जी मजा आहे ती बोलण्यात नाही. मी लिहिलेलं पत्र ते असं: (नावाचा उल्लेख मुद्दाम टाळला आहे)


नमस्कार,



कित्येक दिवसांपासून पत्र लिहिण्याचा विचार मनात घोळत होता. काल रात्री आपलं बोलणं झालं. सगळं डोक्यात होतंच फक्त शब्दात आणायचं होतं. मग काय रात्री तीन वाजेपर्यंत पत्र तयार. मध्यंतरी सरांना पत्र लिहून पाठवलं. दोन्ही गोष्टी भिन्न आहेत म्हणून हे स्वतंत्र पत्र. खरं तर कुणाला पत्र लिहाव असे लोक फार कमी असतात. सगळ्याच गोष्टी शब्दात व्यक्त होतात च असं हि नाही. तरी हि हा पत्र प्रपंच. तो पण मराठीत. पंढरपूर मध्ये सर अन तुम्ही सोडले तर कुणी जवळचं नव्हतंच. खूप गोष्टी सांगायच्या राहून गेल्यात. का अन कशामुळे नाही कळल कधी. म्हणून सरांना अन तुम्हाला पत्र लिहावं वाटलं. तरी हि मनात जे आहे ते बाहेर येतच नाही. ती माझी कमजोरी म्हणा कि अजून काही. कुणास ठाऊक? 

जवळपास तीन-चार महिने आपण सोबत होतो. भरपूर गोष्टींवर चर्चा झाल्यात. काही नाती निर्माण कराव्या लागत नाहीत. ती होत जातात. नकळत. सर अन तुम्ही त्यातलेच एक. नकळत झालेली भेट हि पुढे कधी वाढत गेली ते कळलचं नाही कधी. ज्या दिवशी मी पंढरपूर सोडलं तो क्षण मी कधीही विसरू शकत नाही. सरांना मी कॉलेज वर सोडलं, पण निघताना जी मनाची घालमेल झाली ती शब्दात नाही उतरवता येत. पूर्ण प्रवास याच विचारात गेला. नकळत सगळ्या गोष्टी मला आठवत गेल्या. ते दहा-बारा तास विचारचक्र सुरु होतं. सगळे चांगले वाईट अनुभव डोळ्यासमोर येऊन गेलेत. घरी पोहोचल्यानंतर कुठं ते बंद झालं. मला यायचं नव्हत. कॉलेज फार चांगल होत असं हि नव्हत. पण तुमच्या सगळ्यांमुळे पंढरपूर सोडायचं नव्हतं. काही गोष्टी आपल्या हातात नसतातच. We are puppets in the hands of God. What else? आजपर्यंत ज्या ज्या गोष्टी मला हव्या होत्या त्या वेळेवर कधी मिळाल्या नाहीच. वेळ गेल्यानंतर ते सगळं माझ्याकडे येत गेलं. पण काय उपयोग. प्रत्येक गोष्टीला उशीर झाला. अजूनही तेच होतंय. तरी मी हार मानलेली नाही. त्यातच आनंद शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. एक निर्णय चुकला कि सगळं चुकत जात. माझ्या बाबतीत हि तेच झाल. माझा निर्णय पक्का होता म्हटलं तर तो बौद्धीक होता. पण मन मात्र मानायला तयार नव्हतच. ते मला नेहमी भूतकाळात घेऊन जात. तो प्रवास जड अंतकरणाने च झाला. भावनिक ऋणानुबंध. दुसरं काय. ते सहजासहजी होत नाहीच. 

कुणी आपलं म्हनाव असं शोधून मिळत नसतच कधी. तरी त्या बाबतीत मी नशीबवान म्हणायाल हवं. मी जिथं जिथं गेलो, तिथं तिथं मला आपली मानसं मिळालीच. तुमच्या सोबत घालवलेले ते क्षण कसे विसरू. पैसे नसताना खाल्लेली अंडा भुर्जी हि विसरता येणार नाही. पैसे असल्यानंतर शुभम. किती तो विरोधाभास. पण क्षण जगणं शिकलो. भूतकाळाचा गंध नाही अन भविष्याचा विचार नाही. तेच योग्य होतं. तुमचंते दिल-खुलास व्यक्तिमत्त्व नाहीच विसरता येणार कधी. क्षणार्धात आपलं स करून घेणारं, नाही विसरू शकत. मला पंढरपूर सोडायचं नव्हतच. पण ती वेळेची गरज होती. माझ्यासारख्या सामान्य व्यक्ती ला काही करता येत नव्हत. माझा निर्णय योग्य होताच. अन तो योग्य ठरला हि. सुदैवाने इथ सगळं आहे. पण तुमच्या सारखी मानसं नाहीत. पैसा तर कुठे हि मिळतो. माझ्यासाठी पैसा कमावणं कधी कठीन नव्हतचं. पण माणसाचं काय? ते काय पैश्याने मिळतात? नाहीच ना? बस तीच कमतरता आहे इथ. बाकी काहीच नाही. 

तुमच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण लक्षात राहील. मग तो रायगड दौरा अन तिथलं शून्य नियोजन असो, कि ते तुमचं ते औरंगाबादच प्रकरण, “Why take risk” कि “why to take risk “ यावर ची चर्चा, वेळेवर चंद्रभागेकाठी सुचलेल्या कविता, अन बरंच काही अजून हि तसच टवटवीत आहे आणि राहीन. ऐश्वर्या हॉटेल वर सरांसोबत झालेल्या मैफिली तर अवर्नानियचं. ज्या गोष्टी मी सरांसोबत बोलू शकत नव्हतो ते तुमच्या सोबत शेअर केलं. कारण सरांचं व्यक्तिमत्त्व वेगळ आहे. त्या गोष्टी मी त्यांच्या सोबत बोलू शकत नव्हतोच.त्यात आपण खूप दिवस सोबत राहिलो. मला आलेल्या कित्येक अडचणी तुम्ही अन सरांनी दूर केल्यात. का केल्यात त्याचा मी विचार नाही करत. नाही तरी वेळेवर मदत करणारी लोकं मिळतात कुठ. तसा मी फार लहान आहे तरी तुम्ही फार जुळवून घेतलं. म्हणूच च तुम्हा दोघांचं महत्त्व माझ्या दृष्टीने फार मोठं आहे. ते नाही मला मला शब्दात सांगता येणार. 

तुमचं ते साहित्यिक बोलणं मला नेहमीच आवडलं. म्हटलं तर हेवा पण वाटला. कारण ते सहजासहजी येत नाहीच हे मी चांगल जाणून आहे. ती रूम जिथं आपण राहिलो ती कित्येक घटनांची साक्षीदार आहे आणि राहील. खूप चांगले वाईट अनुभव आलेत. पण त्या रूम मध्ये प्रवेश केल्यापासून सगळं बदलत गेलं. म्हणून त्या निर्जीव वस्तू बद्दल पण आत्मीयता आहे. सर, तुम्ही, अन ती रूम यापलीकडे पंढरपूर नाहीच. पंढरपूर माझ्यासाठी संपलं. सुरुवात अन शेवट एकच. मला रूम स्वच्छ ठेवणं कधी जमल नाही. तुम्ही ते फार आनंदाने केलंत. रूम ची अवस्था काय होत असे ते वेगळ सांगण्याची गरज नाहीच. तसं मला समजुन घेण फार कठीण आहे आणि होतं. पण का कुणास ठाऊक सर अन तुम्ही ते कस केलत. कित्येक वेळा रूमवर झालेल्या पार्ट्या हि नाही विसरता नाही येणार. माझं तसं कुणी नव्हतंच तिथं. सरांनी एक कुटुंब अन मित्र अश्या दोन्ही गोष्टी दिल्यात. त्यात च मला खूप आनंद आहे. आयुष्यात भरपूर लोक येतात अन जातात. पण बोटावर मोजण्या इतकीच लक्षात राहतात. 

अजूनही तुम्हा लोकांना खूप मिस करतो. सोबत पार्टी करण्यायोग्य लोक आढळत नाहीत. तसल्या गप्पा होत नाहीत. म्हटलं तर लोक रसिक नाहीत. जे आपण केलं ते मनापासून केलं. ३०,९०, १२०, सोबत धुराडा इतरांसोबत शक्य नाहीच. कित्येक रात्री अश्या आनंदात गेल्यात. आज त्या रात्रींची आठवण येते. ते क्षण नेहमी आठवतात. मी आलो ते फक्त वेळ जाऊ देण्यासाठी. माझी कुठली महत्त्वाकांक्षा नव्हतीच. त्यामुळे पंढरपूर ला थांबणं शक्यच नव्हत. पण इतक्या लवकर सोडेन असं डोक्यात नव्हतं. माझी काही स्वप्नेही नव्हती तिथ. पण एवढ्या कमी वेळात खूप शिकायला मिळालं. तुम्हा सगळ्या लोकांचा सहवास मिळाला. नकळत शिकत गेलो. आज तेच कामाला येतंय.
शेगाव ला आलो. सुदैवाने चांगल कॉलेज मिळालं. म्हटलं तर अजून एक जुगार यशस्वी ठरला. एक कॉलेज सोडून दुसरीकडे जाण्यात धोका असतोच. मी तो पत्करला. निर्णय योग्य ठरला. नशिबाची साथ म्हटलं तरी हरकत नाही. 

प्रत्येक क्षण आनंदाने घालवण्याचा प्रयत्न करतोय. म्हटलं तर तेच आपल्या हातात आहे. पण पंढरपूर कायम लक्षात राहील. जेव्हा जेव्हा पंढरपूरचा विषय येईल तेव्हा तेव्हा तुम्हा लोकांचा चेहरा समोर येईल. बाकी ना पंढरपूर मध्ये काही लक्षात ठेवण्याजोग आहे ना त्या कॉलेज मध्ये. ते कॉलेज म्हणजे गेमाडपंथियांचा अन हाजी हाजी करणारयाचा भरणा. या व्यतिरिक्त काही लक्षात राहील असं काही नाहीचं. पण त्यामुळे आपली भेट झाली म्हणून ते महत्त्वाचं. अन्यथा काहीच नाही. वेळोवेळी आपण केलेलं सहकार्य नक्कीच लक्षात राहील. आभार मी मानणार नाही, कारण आभार परक्यांचे मानायचे असतात. 

आयुष्य हे वेगळच आहे. पुन्हा कधीतरी भेटू. “माणूस आशेवर जगतो, मग ती आशा कितीही निराधार असो, माणूस स्वप्नांवर जगतो मग ती स्वप्ने कितीही असंभाव्य असोत. “(ययाती ) मनुष्याचं जीवन म्हणजे एका आशेकडून दुसऱ्या आशेकडे चाललेला प्रवास. तेच आपण करतोय. 

पंढरपूर सोडून पंधरवाडा उलटून गेला पण तिथल्या आठवणी काही पाठ सोडेनात. कमी कालावधीत आपली झालेली मानसं 

… चंद्रभागेच वाळवंट … तिथे आमच्या मित्रांनी केलेल्या कविता अन आमचं ते उस्फुर्त प्रोत्साहन आणि दाद याचा तो संगम

… रात्री उशिरापर्यंत चाललेल्या पार्ट्या रंगणाऱ्या गप्पा बाजूला रिकाम्या बाटल्यांची रांगखोलीत पसरलेला धूर अन 

त्याच्या साथीला जगजित सिंग यांच्या गजल्स ती वातावरण निर्मिती तर अप्रतिम … सगळीकडे अस्तवस्थ पडलेले कपडे 

… तरी सकाळी लवकर उठून उशीर होऊ नये म्हणून कॉलेज ला जाण्याची लगबग … त्यात आंघोळीला थंड पाणी … निस्तेज 
झालेलं डोकं लगेच ठिकाणावर यायचं … सुट्टी असली कि सोलापूर चे दौरे … त्यांची हि एक वेगळीच कथा म्हटलं स्वतंत्र 

पुस्तक लिहिता येईल त्यावर … माझे ते ५० १ मानसं sam नं काही सोडली नाहीत मध्येच मेडीटेशन च प्रकरण खूप 

हसवून गेल … पी एच डी करतोय म्हणून मोठ्या गप्पा करणं पण प्रत्यक्षात काम शुन्य एक वर्ष होऊन पण … दीड -दोन 

वर्ष कसे निघून गेलेत नाही कळले … पुन्हा कधीतरी भेटूयात अन त्या आठवणींना उजाळा देऊयात …. आयुष्य फार मोठ


 आहे 

खूप दिवसानंतर मराठी मध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला. खूप काही लिहायचं राहून गेलं. फक्त संदर्भ दिलेत. भावनांना शब्दात पकडण्याच कौशल्य माझाकडे नाही. तुमच्यासारखं बोलणं अन लिहिणं हि नाही जमणार. तरी हा एक प्रयत्न. त्यामुळे पत्रातील उणीवा आपण समजून घ्याल हा विश्वास. हि फक्त सुरुवात. हा पत्रप्रपंच असाच सुरु राहीन हि अपेक्षा.

धन्यवाद. 

आपला, 
सचिन भगत