Saturday, May 24, 2014

पुणे विद्यापीठातील काही आठवणी...६


पुणे विद्यापीठात नवीन होतो तेव्हा. जयकर ला अभ्यासाला जायचं नेहमीचं झालं. मी कमवा आणि शिका योजनेत असताना सकाळी जयकर ला जाता येत नव्हतं. सकाळी काम करून मग सगळं सुरु व्हायचं. मला काम मिळालं ते फिजिक्स विभागात. काम काय तर तो परिसर स्वच्छ करायचा. सकाळी काम करत असताना कित्येक वर्ग मित्र मैत्रिणी हाय बाय करायच्या. सुरुवातीला खूप लाज वाटत होती झाडू मारायची. नंतर ते अंगवळणी पडलं. कमवा आणि शिका एक आदर्श आहे पुणे विद्यापीठात. लोकांचा दृष्टीकोन पण चांगला होता. त्यावेळेस चे विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक यांनी हि योजना एका चांगल्या पातळीवर नेऊन ठेवली. काम न करता पैसे घेणारे विद्यार्थी हि पाहिलेत. चाटुगिरी करणारे तर फार पुढे गेलेत. 

त्याचं झालं असं कि ६ ते ९ काम करून नंतर जयकर ला जाने सुरु झाले. तरी सकाळी जागा सांभाळून ठेवत होतो. आमचा बराच ग्रुप झाला होता. दिवसामागून दिवस जात राहिलेत. जयकर मध्ये माझी एक मैत्रीण नेहमी माझ्या सोबत असायची. वयाचा दोष म्हणा कि अजून काही. मला ती आवडायला लागली. ती जवळ असली कि कधी अभ्यासात मन लागलं नाही. मला कळत होतं कि मी ईथे कशासाठी आलो आहे पण मन मानत नव्हतं. मग एकदा ठरवलं कि तिला सांगून टाकायचं. दोन-तीन महिने झाले होते फक्त मला विद्यापीठात जाऊन. एके दिवशी दुपारी मी एका कागदावर लिहील कि तू मला फार आवडतेस...लग्न करशील का. तिच्या जवळ जाऊन तिला तो कागद दिला. अचानक असा कागद दिल्याने तिला आश्चर्य वाटलं. काय आहे म्हटली. मी म्हटलं तू वाच नि सांग मला. मी तेव्हा वरती बसत होतो. थोड्या वेळाने मला तिने बोलावलं नि चहाला जाऊ म्हटली. आतून मी घाबरलो होतो. तिच्या नजरेला नजर काही मला देतं येईना. मग तीच म्हटली कि मी विचार केला पण उत्तर देऊ शकत नाही. तिने ना होकार दिला ना नकार. बघू म्हटली पुढे. पुढे काही झालंच नाही. ती मला आवडते असं म्हणता म्हणता मला अश्या कित्येक आवडल्या. मी पण तिला कधी काय विचारलं नाही.
त्यानंतर मात्र आम्ही खूप चांगले मित्र झालो. तिनं प्रत्येक वेळी मला मदत केली. मी वाईट हि खूप वागलो तिच्याशी. आता तिचा नि माझा संपर्क नाही. प्रत्येक अडचणीत तिने मला साथ दिली. आम्ही दोघे भिन्न आर्थिक परिस्थितीचे. ती चांगल्या श्रीमंत घराची तर माझी दोन वेळेस च्या जेवणाची समस्या. आयुष्यात कुणाला तरी पहिल्यांदा प्रपोज केलं ते पण जयकर ग्रंथालयात. जिथं सगळे अभ्यासाला जातात. पण हा दुसराच अभ्यास झाला. हे मीच केलं असं नाही. जयकर मध्येच कित्येक प्रेम प्रकरणं सुरु झालेली आम्ही पाहिली. किती काळापर्यंत टिकली तो भाग अलाहिदा. पण मला जयकर कधीच पावलं नाही. तिथं बसून ना नेट पास झालो ना इतर काही झालं. आता माझं तिच्यावर खूप प्रेम होतं असं मी म्हणणार नाही कारण नंतर मला कित्येक मुली आवडल्या नि कित्येक वेळी प्रेमात पडलो. Love does not happen once in life. It happens many times in life. माझं एक पक्क मत आहे....प्रेम वगैरे काही नसते ...असते ते फक्त शारीरिक आकर्षण....प्रेम हा शब्द फक्त एक mask आहे.....LOVE IS ONLY A MASK…..IT ALWAYS ASKS FOR THE UNION OF TWO BODIES….LOVE DOES NOT EXIST IN SUCH CASES (EXCEPTION...PARENTS AND CHILDREN).

एकदा आमच्या विभागातल्या विद्यार्थ्यांनी टी शर्ट बनवायचे ठरवले. मग त्यासाठी त्यांना एक चांगलं वाक्य हवं होतं आम्हाला. खूप विद्यार्थ्यांनी वेगवेगळे वाक्य सांगितली पण आम्हाला ती काही आवडली नाही. शेवटी मी एक वाक्य सांगितलं ...LIBRARY IS ALSO THE PLACE WHERE LOVE BEGINS. माझ्या काही मित्रांनी सपोर्ट केलं मला. पण मुली ऐकायला तयार नव्हत्या. माझ्या या वाक्यावर खूप वाद-विवाद झालेत. हे सुरु असताना माझा एक मित्र मुलींना उद्देशून म्हटला कि तुम्ही असे कपडे घालतात कि आम्हाला तुमच्याकडे पाहण्याची पण लाज वाटते मग या वाक्याने काय होणार आहे. बस मग काय. भन्नाट शिव्या दिल्या त्यांनी आम्हाला. ते वाक्य मी कुठंतरी वाचलेलं होतं. म्हणून सांगितलं. पण त्यावर वाद होईल असं वाटलं नव्हतं. काही मुलींनी तर आमच्याशी बोलणेच सोडून दिलं होतं काही दिवस. 

वाद आणि मी एक घट्ट समीकरण. विभागात प्रवेश घेतल्यापासून तर विद्यापीठ सोडेपर्यंत कुठल्या ना कुठल्या प्रकरणात मी अडकत राहिलो. काही मित्रांनी मला खूप साथ दिली त्यामुळे कशातच अडकलो नाही. मला नको तिथं हस्तक्षेप करण्याचा फार हौस. यातूनच एकदा राज्यशास्राच्या विद्यार्थ्यांशी वाद ओढवून घेतला. त्यातले कित्येक जन नंतर माझे खूप चांगले मित्र झालेत. झालं गेलं आम्ही विसरून गेलो. तेव्हा त्यांनी म्हणे मला मारायचं ठरवलं होतं. पण ते काही माझापर्यंत आले नाहीत. ती माझी आणखी एक चूक. मला त्या प्रकरणात पडायची काही गरज नव्हती. पण रहेमानी किडा कुठं शांत बसू देतो. ते असं होतं कि आमची एक जुनिअर मुलगी राज्यशास्राच्या एका मुलाबरोबर फिरायला लागली होती आणि तेच मला खटकलं होतं. मी त्यात पुढाकार घेतला आणि आम्ही काही मित्रांनी तिला ते समजावून सांगितलं. तिने त्याच्यासोबत चे संबंध तोडलेत. (काय होतं त्याचं याबद्दल मी अजूनही अनभिज्ञ आहे). पुढे माझा एक मित्र तिच्या प्रेमात पडला. तिनेही होकार दिला. त्याचं सगळं व्यवस्थित सुरु आहे. या प्रकरणावरून माझ्यावर भरपूर टीका झाली. हेल्थ सेंटर च्या प्रकरनासारखा इथेही माझा काही संबंध नव्हता. पण अडकलो मीच. लोकांनी खूप तोंडसुख घेतलं माझ्यावर. 

मी पुण्यात आयुष्य घडवायला गेलो होतो. पण नकळत मी या सगळ्या प्रकरणात गुंतत गेलो. विद्यापीठ एक मायाजाल आहे. तिथे आपलं जीवनच बदलून जाते. मी झपाट्याने बदलत गेलो. मला त्या मार्गाने जायचं नव्हतं. ते माझं उद्दिष्ट हि नव्हतं. माझा खूप वेळ वाया गेला यात. त्याची किंमत हि मी चुकवली. त्या आधी माझं जीवन मर्यादित होतं. सहसा कुठल्याही भानगडीत मी पडत नव्हतो. मी स्वप्नांचा पाठलाग करत होतो. स्वप्नांवर जगण्यात मला आनंद वाटत होता. कित्येक वाईट प्रसंग मी फक्त आशेवर निभावून नेलेत. पण काय झालं कुणास ठाऊक. पुण्यात गेल्यानंतर माझी स्वप्नेच हरवली. कधी हरवली मला कधी कळाल नाही. वर्तमान खराब होता. तो बदलायचा म्हणून मी पुण्यात गेलो. कदाचित या नको त्या प्रकरणांमध्ये गुंतलो नसतो तर लवकर यश मिळालं असतं. पण आयुष्यात जर तर ला काही महत्त्व नाही. म्हणून जे झालं ते योग्य होत असं म्हणून मी पुढे चालत राहतो. कारण जीवनात एकदा केलेली चूक दुरुस्त करता येत नाही. ती फक्त टाळता येते. आणि आज फक्त चुका टाळण्याचा प्रयत्न करतोय.

पुणे विद्यापीठातील काही आठवणी...५



एम.फिल करत होतो त्यावेळेस ची गोष्ट. संध्याकाळी गाईड चा फोन आला कि उद्या भेटायला ये म्हणून. मी होकार दिला. तेव्हा माझ्याकडे बाईक होती. उद्या जायचं कसं प्रश्न माझ्यासमोर होता कारण माझ्याकडे जेमतेम ५०-६० रुपये होते. रात्री मी काही मित्रांना पैसे मागितले पण त्यांच्याकडे नव्हते. सकाळी आठ वाजेला मी विद्यापीठातून निघालो. असलेले पैसे पेट्रोल साठी वापरले. शिरूर ला जायचं होत. जवळपास ६०-७० किलोमीटर. जाण्याचा प्रश्न नव्हता. पण यायच कसं? विचार करत करत शिरूर ला गेलो. गाईड ला भेटलो. जेमतेम १०-१५ मिनिट्स च काम होत. पण भेटन गरजेचं होतं. तिथून थोडं पुढे आल्यानंतर गाडी बंद पडली. ते होणारच होत. आता काय करायचं. तिथं ओळखीचं तर कुणी नव्हतं. सकाळपासून चहा पण घेतला नव्हता. तेवढेही पैसे नव्हते. गाडी एका बाजूला लावली आणि मी मित्रांना फोन करायला सुरुवात केली. दहा-पंधरा मित्रांना फोन लावले असतील. कुणाकडून च काही जमेना. 

माझा एक नाशिक च मित्र आहे. तो एका कॉलेज ला जॉब करत होता. शेवटी मी त्याला फोन करून सत्य परिस्थिती सांगितली. मला हवे होते फक्त दोनशे रुपये. साडे दहा वाजले होते. त्याला मी बँक अकाऊंट नंबर पाठवला आणि एका एटीएम जवळ जाऊन थांबलो. तो अर्धा तास म्हटला होता. मग मला थोडं बरं वाटलं. आणि त्याच्या फोन ची वाट पाहत थांबलो. एक तास झाला तरी त्याचा काही फोन येईना म्हणून मीच त्याला फोन केला. तर तो म्हटला कि मी एका विद्यार्थ्याला बँकेत पाठवलं आहे. असे दोन तास निघून गेले. दुसरा कुठला पर्याय पण नव्हता. दोनशे रुपयासाठी काय काय करावं लागलं.

त्याचं झालं असं कि मी त्याला महाराष्ट्र बँकेचा नंबर दिला तर त्याने त्या विद्यार्थ्याला एसबीआय मध्ये पाठवलं होत. बँके वाले म्हणत होते कि अकाऊंट नंबर चुकीचा आहे म्हणून. परत फोन करून सगळं व्यवस्थित झालं. साडेतीन तास मी तिथे बसून होतो. दोन वाजले होते. पैसे काढून सरळ गाडी ढकलत पेट्रोल पंपावर नेली. दीडशे रुपयांचे पेट्रोल टाकले नि पन्नास रुपये मला ठेवले. भूक लागली होती. सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं. तो एकमेव प्रसंग जेव्हा माझ्या गाडीतलं पेट्रोल संपलं. त्यानंतर ते आजपर्यंत तशी परिस्थिती आली नाही. 

शिरूर सोडलं ते थेट मध्ये एका हॉटेल ला थांबलो. थोडं खाऊन पुण्याकडे निघालो. संध्याकाळ झाली होती मी विद्यापीठात आलो तेव्हा. असं झालं होतं हे मी काही कुणाला सांगितलं नाही. 
कधी कधी स्वतःचा राग पण येत होता. माहित असून असं करायचं म्हणजे अवघड च आहे. पण मी आशावादी आहे. मी जर जातोय तर वापस कसातरी येईलच. काहीतरी होईल. म्हणून मी निघालो होतो. कितीही कठीण प्रसंग असला तरी मार्ग निघतोच. थोडा त्रास झाला. दहा पंधरा फोन करावे लागले आणि तीन चार तास वाट पहावी लागली. 

स्वतःहून अडचणी वाढवून घ्यायला फार आवडतं मला. नंतर पण गाईड ला भेटायला जाऊ शकलो असतो. पण गाईड नावाचा प्राणी फार विचित्र. बोलावून पण येत नाही म्हटल्यावर इगो दुखावला असता आणि वाट लावली असती माझी. तशी हि लावलीच पण एम.फिल पूर्ण झालं. काय संशोधन केलं मी देव जाने. पोटात काही नाही काय घंटा संशोधन होणार आहे. Research is not possible unless your basic needs are fulfilled. पण कोण वाचते ते. सगळे असंच करतात. 

थेसिस चं आयुष्य तरी काय तर एक ग्रंथालयात, दुसरा गाईड कडे आणि तिसरी प्रत आपल्याकडे. संपलं आपलं संशोधन. वर्षाकाठी कित्येक एम.फिल, पी. एच डी होतात. कुठं आहे त्याचं संशोधन. कुठला बदल पाहायला मिळाला आपल्याला. काहीच नाही. सगळं शून्य. पैसे दिले कि सगळं होत. आता तर गाईड हि पैसे मागत आहेत. पुण्यात तर परिस्थिती वाईट. काही गाईड ला तर फक्त मुली पाहिजेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली. मुलांना उभे पण करत नाहीत ते. संशोधनाच्या नावाखाली लुट सुरु आहे. विद्यापीठ विद्यावेतन देते त्यासाठी. पण बाकी काय तर शून्य. विद्यार्थी पण काय करणार. त्यांना ऐकून घ्याव लागते सगळं. मग कसा समर्थ भारत होणार. तो फक्त स्वप्नातच राहील. पुणे विद्यापीठान राबवलेल्या समर्थ भारत अभियानातून काय निष्पन्न झालं ते सगळ्यांना माहित आहे. काही लोक समर्थ झाले असतील तो भाग वेगळा. त्यावर न बोललेलं बर.

मला पैश्याचं नियोजन कधीच जमलं नाही. अजूनही जमत नाही. सेव्हिंग नावाचा प्रकार नाही आयुष्यात. कितीवेळा सेव्हिंग करण्याचा प्रयत्न केला पण अपयश. आता तर प्रयत्न हि करणे सोडून दिले. फक्त प्रत्येक क्षण जगायचं ठरवलंय. भौतिकवादी जगातून बाहेर पडण्याचा प्रयत्न सुरु आहे. आयुष्यात असे अनेक प्रसंग आलेत. त्याचा मी आनंद घेतो. I always feel that this is what I am born for. I am born to struggle….I am born to survive in spite of sudden ups and downs in life. 

-सचिन भगत