Friday, October 5, 2018

अनुभव -५


अभियांत्रिकी मध्ये संभाषण कौशल्ये (Communication Skills) म्हणून एक स्वतंत्र विषय आहे. प्रत्येक विद्यापीठात आहे. काही ठिकाणी प्रथम वर्षाला तर काही ठिकाणी तृतीय वर्षाला असाच काय तो फरक. व्यावसायिक क्षेत्रामध्ये टिकायचं असेल तर संभाषण कौशल्ये अवगत केल्याशिवाय पर्याय नाही. फक्त ज्ञान पुरेसं नाही. ते व्यक्त करता यायला हवं. यावर जास्त भर आहे. कंपन्या विद्यार्थ्यांची निवड करताना यालाच जास्त महत्त्व देतात. हा विषय शिकवायचा म्हणजे एक आव्हानच. एकतर विद्यार्थी फार गंभीरतेने घेत नाहीत आणि दुसरं म्हणजे आपण शिकवून तरी काय शिकवणार. मार्गदर्शन करण्यापलीकडे आपल्याकडे काय असते हो? ह्या सर्व गोष्टी स्वतःच कराव्या लागतात. जी काय थेरी असते ती दिसायला सोपी असते पण अनुकरण कठीण. विद्यार्थी बोलते झाले पाहिजेत. असे बरेच प्रयत्न सुरु असतात.
सुरुवातीला ते कसं शिकवायचं हे मलाच शिकावं लागलं. हळू-हळू त्यात बदल करत गेलो. अभियांत्रिकी मध्ये जॉब करत असताना अनेक आव्हानात्मक प्रसंग आलेत. त्यातला एक प्रसंग नेहमी आठवतो. मी एक अभियांत्रिकी महाविद्यालय जॉईन केलं होतं.
सुरुवातीला मला मेकनिकल थर्ड इयर मिळालं शिकवायला. विभागप्रमुखांनी बोलावलं मला. मी त्यांना भेटायला गेलो. टाईम टेबल घेतलं. त्यांच्या परीने ते काय करायला पाहिजे वगैरे मार्गदर्शन करत होते. आपलं हो-ला-हो सुरु होत. तेवढ्यात एक प्राध्यापक त्यांच्या कॅबीन ला आला आणि मला थर्ड इयर ला शिकवायचं नाही असं म्हटला. विद्यार्थी ऐकत नाही. शांत बसत नाहीत. चेहरा पडला होता त्या महाशयाचा. त्यांच्या चर्चेतून असं समजल कि ते प्राध्यापक गोल्ड मेडल होते विद्यापीठात. त्याची ती परिस्थिती पाहून माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. एकतर आपल्याकडे भारदस्त व्यक्तिमत्त्व नाही.  दोन डिविजन. ८० च्या आसपास विद्यार्थी संख्या प्रत्येक क्लास ची. ए मध्ये फक्त मुले. तर बि मध्ये चार-पाच मुली आणि उरलेले सगळे मुलं. त्यामुळे क्लास कंट्रोल कठीणच. त्यांना शिकवणे म्हणजे आव्हान होतं. बर्याच चर्चा ऐकून होतो त्यांच्या.
तो टाईम टेबल घेऊन कॅबीन कडे परत जाताना हातपाय गळून पडले होते. दुसर्या दिवसापासून क्लास घायचा होता. त्या दिवशी रात्री झोप आलीच नाही. यांनी मुद्दाम आपल्याला तो क्लास दिलाय. आपला गेम होणार असं वाटायला लागलं होतं. त्या प्राध्यापकाची परिस्थिती पाहून मलाही धडकी भरली होती. कम्प्युटर, आय.टी. दिली असती तर बर झालं असतं. कारण तिथे मुलींची संख्या जास्त. मुली त्या मानाने शांत असतात. मुली जास्त असल्याने मुलंही फार सुसंस्कृतपणे वागतात. पण तसं काही झालं नाही.
अभियांत्रिकी मधलं ते पहिल लेक्चर कसं विसरणार. नवीनच असल्याने युनिफोर्म नव्हता. मी प्राध्यापक आहे हे त्यांना कसं कळणार. तसंही माझ्याकडे कुणीही पाहिलं तर विद्यार्थीच समजणार.  युनिफोर्म किती महत्त्वाचा आहे ते समजल तेव्हा. बुडत्याला काठीचा आधार.  पण तो ही नव्हता.

दुसर्या दिवशी कॉलेज ला गेलो. काय शिकवायचं, कसं शिकवायचं यावर बराच विचार केला. एकतर या क्षेत्रात नवीन होतो आणि त्यात ही परिस्थिती. बेल होण्याआधीच मी तिसर्या माळ्यावर क्लास रूम बाहेर उभा राहिलो. बेल झाली आणि मी वर्गात शिरलो. हातात डस्टर आणि खडू. समोर जाऊन उभा राहिलो. गोंगाट सुरु होता. विद्यार्थी जोर-जोरात ओरडत होते. डेस्क-बेंच वाजवत होते. काही माझ्याकडे पाहून हसत होते. काय करावं मला सुचेना. कुठून येऊन पडलो इथ असं झालं.  एखादा प्राध्यापक समोर उभा आहे पण मुलं भिक घालत नव्हती.
थोडा विचार केला. खडू घेतला आणि बोर्डवर टोपिक च नाव लिहिलं.  आणि बोलायला सुरुवात केली . जसा-जसा मी बोलत गेलो तसा तसा क्लास शांत होत गेला. शेवटी हजेरी घेऊन क्लास मधून बाहेर पडलो तेव्हा वर्ग अतिशय शांत होता. काय बोललो ते माहित नाही. जी तयारी केली होती त्यातला एक ही शब्द बोललो नाही. नंतर कधीच अडचण आली नाही. दोन-तीन मुलं संध्याकाळी भेटायला आली. ते म्हटले, सर, छान होतं लेक्चर. आमचा क्लास एवढा शांत कधी राहत नाही.  मला थोडं बरं वाटलं. आत्मविश्वास मिळाला. तयारीविना मी कधीच क्लास ला गेलो नाही. आव्हानं असली कि माणसाचा कस लागतो. आपण काहीतरी करतो. नवीन शोधतो. शिकवण्याच्या पद्धती बदलतो. प्रगती आपलीच. खरं तर त्याचं क्लास ने मला आत्मविश्वास दिला. वेग-वेगळ्या प्रकारचे विद्यार्थ्याच शिक्षकांना अनुभव समृद्ध करतात. तसा प्रसंग परत कधी आला नाही. खाजगी क्षेत्रात काम करताना पावलागणिक संघर्ष आहे. कायम स्वतःची कौशल्ये वाढवावी लागतात. वेळेनुसार बदलावं लागतं. ज्यांना जमते ते टिकतात नाहीतर बाहेर फेकले जातात. कौशल्यांना मागणी आहे. डिग्री फक्त नावापुरती असते. व्यावहारिक किंवा व्यावसायिक ठिकाणी त्या डिग्री ची किंमत शून्य.  आपण कुठल्या ठिकाणी किती काळ राहू हे सांगता येत नाही. आपली उपयोगिता संपली कि आपला टोयलेट पेपर व्हायला वेळ लागत नाही.                                                                                                  
                                                                                                                                                               सचिन भगत

व्यक्ती विशेष (उत्तरार्ध)


ज्या ठिकाणी मी जाणार होतो तिथे परिचित कुणीच नव्हतं. पुणे सोडणार होतो. काय होईल, कसं होईल ही चिंताही होती. तिथे गेलो आणि दुसरी व्यक्ती भेटली ज्यांनी मला ३६० डिग्री बदलून टाकलं. ती व्यक्ती म्हणजे डॉ. माधव राऊळ. काय बोलावं यांच्याबद्दल. पंढरपूर मधील माझी सुरुवात आणि शेवट तेच.
डॉ. माधव राऊळ-
उमरग्याचे मुळचे. भारदस्त, महत्त्वाकांक्षी,प्रभावी व्यक्तिमत्त्व. पंढरपूर ला मी पहिल्यांदा गेलो तेव्हाही श्रीमंत सर सोबत होते.  तिथला जॉब पक्का झाला आणि पुणे सोडण्याचा निर्णय झाला.
महाविद्यालयात रुजू झालो. माधव सरांच्या अंडर काम करायचं होतं. तो पहिला दिवस आजही आठवतो. त्यांनी मला बोलावलं आणि समोर बसायला सांगितलं. ते सांगायचे आणि मी लिहित होतो. कश्यासाठी आलोय आणि काय सुरु झालंय. निर्णय तर चुकला नाही ना असा प्रश्न पडला. जसे-जसे दिवस गेलेत तसे गैरसमज गळून पडलेत.
मी घरी येत असताना बस स्टोप ला भेटायला येऊन पैसे हवेत काय असं न विचारता खिष्यात पैसे टाकणारा हा माणूस. त्यांनी जे आपलं मानलं ते नाहीच कुणी करू शकत. माझ्या आनंदात आनंद मानणारा. किती फिरलो असेल त्यांच्यासोबत. सोलापूर, उमरगा, महाड, रायगड , कोकण, पुणे, मुंबई भरपूर. प्रत्येक प्रवास हा अविस्मरणीय. सर असले म्हणजे माहोलच. त्यांच्या पि.एच. डी. कामा-निमित्त पंढरपूर-सोलापूर किती फेर्या झाल्या असतील? मोजमाप नाही.  पार्ट्यांच तर बोलायलाच नको. अगणित. हॉटेलवर, माझ्या रूमवर रंगलेल्या पार्ट्या अन सोबतीला जगजीत सिंग च्या गझल्स. भन्नाट होतं सारं. सरांची मुलगी मनश्री लहान होती तेव्हा. तिच्यासोबत किती वेळ घालवला असेल. अजूनही तिचं नाव आहे माझ्या बाईकवर. आणि राहील.
एक कुटंब म्हटलं तरी चालेल. कधी अंतर दिलं नाही. त्यांनी मला जे प्रेम दिलं ते नाही विसरता येणार. सणवार सारे त्यांचाघरीच.  संध्याकाळचे जेवण कित्येकदा त्यांच्याकडेच. एकदा का जीव टाकला तर ते कधीच सोडत नाही. कधी कधी त्यांच्या या स्वभावाचा फायदा ही घेतात लोकं. मी त्याला अपवाद होतो. त्यांच्याशी असलेल्या जवळीकतेचा मी कधीही गैरफायदा घेतला नाही. कदाचित त्यामुळेच त्यांचा विश्वास असावा. त्यांच्या सगळ्याच गोष्टी मला पटत होत्या  किंवा माझ्या त्यांना पटत होत्या असंही नव्हे. “If you want to build relations, you must respect the differences and this is what we did”.
तिथे असतानाच एम.फिल. नेट आणि पी.एच. डी. नोंदणी हे सारं घडलं. माझ्या एम.फिल चं सर्टिफिकेट माझे गाईड मला न सांगताच विद्यापीठातून घेऊन गेले होते. माधव सर सोबत होतो गाईड ला भेटायला गेलो तेव्हा. पाच हजार रुपये उकळले गाईड ने. त्याने पैसे मागताच सरांनी खिश्यातून पैसे काढले आणि दिलेत.
सर, पि .एच. डी. करा असं ते कित्येकदा म्हणतात. एवढे आर्टिकल लिहिता लिहिता पी.एच. डी. झाली असती. पण काय ना ते शक्य झालंच नाही. तसे माझे पि .एच. डी  चे गाईड म्हणजे भले गृहस्थ. तसले गाईड शोधून सापडणार नाही. ठरवलं असतं तर झालंही असतं. मी पि .एच. डी. मटेरीअल नाही हे माझ्या लक्षात आलं.  मी पंढरपूर सोडलं आणि संपलं सगळं. प्राधान्यक्रम बदलले होते.
गमतीने आम्ही नेहमी म्हणायचो “Our job is to convert donkeys into horses.” ट्रेनिंग चं हेच तर आहे.
ते सुट्ट्या कधीच घेत नाही. त्यांचाच काय तो प्रभाव. आजही मला सुटी घ्यावीशी वाटत नाही.
Fully professional आहे. कॉलेज ला असताना कधीच सूट दिली नाही. वैयक्तिक आणि व्यावसायिक या दोन गोष्टी भिन्न ठेवणारा माणूस. कायम धडपड. फक्त काम आणि काम. खाजगी क्षेत्रात काम करत असताना हेच कमी येतं. सरांचा दांडगा संपर्क आहे लोकांशी. जिथे जाल तिथे भेटणारे आहेत. बर्याच ठिकाणी भटकंती झाली त्यांच्यासोबत.
मी जे काय शिकलो ते यांच्या सान्निध्यात. माझी जडण-घडण तिथेच. ट्रेनिंग त्यांच्याच सान्निध्यात. साधारण दीड वर्ष होतो त्यांच्यासोबत. तो काळ  माझ्या आयुष्यातला सगळ्यात संस्मरणीय. प्रोफेशनलीझम काय ते नकळत शिकलो. अभियांत्रिकी मध्ये जम बसवता आला त्याचं श्रेय त्यांनाच जातं. असं कित्येकांना घडवलंय त्यांनी. ते मानत नाही हा भाग वेगळा. त्यांनी ज्याला ज्याला मदत केली त्यांच्याकडून अपेक्षा केली नाही. मस्त कुटुंब आहे. सामावून घेतात. आताच्या काळात ते कठीणच. सहवास...आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा भाग. सहवास चांगला असेल तर आपली प्रगती होते. या लोकांचा सहवास मिळाला नसता तर मी कुठे असतो? माहित नाही. या लोकांनी आठवणी दिल्यात. जे चांगलं आहे ते घेत जावं. बाकी सोडून द्यावं. जगात कुणी परिपूर्ण नाही.  आता संपर्क फार कमी आहे. पण आठवणी कश्या विसरणार?


व्यक्ती विशेष (पूर्वार्ध)


नेट-सेट हुलकावणी देत होतं. भविष्य अधांतरी होतं. जॉब चा पर्याय म्हणून मी अभियांत्रिकी कडे वळलो. या क्षेत्राबद्दल फार काही माहित नव्हतं. माझ्या काही परिचयातील काहीजण आधीच इकडे जॉब करत होते.  तो पर्याय मलाही खुणावत होता. नेट पास नाही झालो तर काय? हाताशी काहीतरी पाहिजे. आणि अभियांत्रिकीकडे मार्गक्रमण सुरु झालं. इकडे “बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल” अशी परिस्थिती. जे शिकलो त्याचा काहीही संबंध नाही. आणि जे शिकवायचं आहे आहे ते कधीच पाठ्यक्रमात नव्हतं. अश्या परिस्थितीत पाय रोवणे कठीण होतं. पण काय ना काही व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात आणि सगळी प्रक्रिया सोपी होऊन जाते. म्हणजे ते transition सोपं झालं. अश्या दोन व्यक्तींचा मला सहवास लाभला. त्यांना बराच अनुभव होता. त्यांच्या सोबत राहून कित्येक गोष्टी कमी कालावधीत शिकता आल्या आणि स्पर्धेत टिकता आलं. आपण परिपूर्ण नसतोच. आसपास ची लोकं आपल्याला खूप काही शिकवून जातात. ज्या क्षेत्रात कधी काम करण्याची कल्पना ही केली नव्हती त्या  क्षेत्रात प्रवेश करायचा होता.  
माझ्या व्यावसायिक जीवनातील ती पहिली व्यक्ती म्हणजे प्रा. अशोक घुगे.
प्रा. अशोक घुगे:
मुळचे सोलापूर कडचे. नक्की आठवत नाही. विद्यापीठात असताना ओळख झाली ती वाचनालयात. एकाच विषयाचे असल्याने कनेक्टिंग पोइंट होताच. मला सिनिअर. त्यामुळे आम्ही सर च म्हणतो त्यांना. पुढे कधीतरी त्यांच्या सोबत काम करेल असं वाटलं नव्हतं. जबरदस्त माणूस. प्रचंड सकारात्मक दृष्टीकोन असणारा. हाय-बाय वगैरे नेहमीचं असायचं. गरिबीतून संघर्ष करून पुढे आलेला.
मला जॉब हवा होता. शोधाशोध सुरु असायची. एकदा त्यांच्याकडून असं समजल कि ते काम करत असलेल्या महाविद्यालयात एम.ए. इंग्लिश उमेदवार पाहिजे म्हणून. आतापर्यंत बरेच उमेदवार येऊन गेलेत पण ते सारे रिजेक्ट झाले. त्या वेळेस चे डायरेक्टर फार खतरनाक होते असं ऐकिवात होतं त्यांच्याकडून. असलं काय विचारात असतील मुलाखतीत कि बरेच जण रिजेक्ट झाले. माझी उत्सुकता ताणली गेली.  जॉब पाहिजे होता. तिथे मुलाखतीला जायचंच असं ठरलं. तिथे फोन केला. ते म्हटले, “येऊन जा”. श्रीमंत सर सोबत होते. बाईक ने आम्ही त्या महाविद्यालयात पोचलो. डायरेक्टर बिझी होते. वेळ होता. अशोक सरांना सांगितलेलं नव्हतं. तरी पण भेट झालीच. इकडच्या-तिकडच्या गप्पा झाल्या. एका शिपायाने तुम्हाला मध्ये बोलावलं आहे असा निरोप दिला. मी अशोक  सरांना म्हटलं, “सर, बाहेर येईल तर ऑफर लेटर च घेऊन येईल.” त्यांनी स्मितहास्य दिल. अतिआत्मविश्वास आणि मी हे कायमचं समीकरण. त्या अतिविश्वासाने कित्येकदा कामंही झालीत तर कधी दगा ही दिला. तो अतिआत्मविश्वास नको त्या ठिकाणी नडला आयुष्यात आणि त्याची किंमत ही चुकवावी लागली. पण मी तो काही सोडला नाही. तीच माझी आईडेनटीटी (Identity). मूळ स्वभाव तो. त्यात नाही बदल करता येत. मी तसा कधी प्रयत्न ही केला नाही. असो.
मी आतमध्ये प्रवेश केला आणि मुलाखत सुरु झाली. साहेबांचा पहिलाच प्रश्न -दहावीतून मुलं तंत्रनिकेतन ला आली. नवीन आहेत. शिकवा त्यांना ते समोर बसले आहेत असं समजून. मी सुरु झालो ते थांबवेपर्यंत. थोडावेळ ते शांत होते. काहीतरी करत होते. ते संपवून त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि साहेबांचा दुसरा प्रश्न “किती पगार हवाय,”. बोलणी झाली. थोड्या वेळात ऑफर लेटर मिळालं आणि बाहेर पडलो. (संभाषण ईंग्रजी मध्ये होतं. भाषांतर केलंय.)
तिथून पुढचे तीन-चार महिने अशोक सर आणि मी हा अध्याय सुरु झाला. मला त्यातलं फार काही माहिती नव्हतं. अशोक सरांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं.  ते महाविद्यालय उंचावर आहे. नैसर्गिक सान्निध्य लाभलंय. रूम च्या बाहेर डोकावलं कि जंगल..उतार आहे.
त्यांना पुस्तके खरेदी करण्याचा शोक. वाचलेत कि नाही ते माहित नाही. पण रूम ला आलो कि कुठलही पुस्तक घ्यायचं आणि वाचायचं काहीतरी. कधी कधी मी ते पुस्तकं चाळत होतो.
मी बोलायला फटकळ. समोरच्याला काय वाटेल याची कधी चिंता केलीच नाही.  ते नेहमी मला सांगत राहिले. समोरच्याला फक्त दोन-चार चांगल्या शब्दांची गरज असते. आपण तेच करायचं. त्यांच्या भाषेत-Satisfy the ego of others. मला ते फार काही जमलं नाही पण प्रयत्न केला थोडा फार.
त्यांची वक्तृत्व शैली चांगली. मराठी भाषेवर चांगलं प्रभुत्व. साधारण तीन-चार महिने त्यांच्यासोबत होतो. कलीग, रूम मेट. सुटी असली कि सोबत पुण्यात फेरफटका असायचा. चित्रपट, हॉटेलिंग वगैरे कित्येकदा सोबतच. सकाळी उठून माझ्यासाठी चहा करणारा हा माणूस. भविष्याचा गप्पा कित्येकदा व्हायच्या. आमच्यात व्यवहार कधी आला नाही.
पण एक प्रभावी व्यक्तिमत्त्व. सेटल होण्यासाठी त्यांची खूप मदत झाली. तासनतास अनुभवांची देवाण-घेवाण झाली.  आता आमच्यात सारं काही आलबेल होतं असंही नाही. पण त्यांनी कधी ते मनाला लावून घेतलं नाही. मला नाही पटलं तर मी ते सरळ सांगत होतो. त्यांनी ही ऐकून घेतलं. चर्चेतून मार्ग काढण्यावर त्यांचा भर. माझं उलट होतं. तुटेपर्यंत तानल्याशिवाय जमत नव्हतं. पण त्यांनी सांभाळून घेतलं.
पण त्या कालावधीत जी सकारात्मक उर्जा निर्माण झाली ती महत्त्वाची. यश-अपयश यावर कित्येकदा चर्चा झाली.  त्यांची स्वप्ने प्रचंड. स्वप्न पाहायला का पैसे लागतात असं ते म्हणायचे. भन्नाट माणूस आहे हा. टिप-टाप राहणीमान. गळ्यात एक bag अडकवलेली. एखादी गोष्ट समोरच्याला कशी पटवून द्यावी हे त्यांच्याकडून शिकावं. कुठलीही समस्या आली तर निराश न होता चालत राहतो. स्वबळावर केलंय सारं.  नसरापूर च्या मंदिराला भेटी दिल्यात अधून-मधून.
शेवटचा संपर्क कधी झाला आठवत नाही. पण माझ्या भरकटलेल्या आयुष्याला सुरुवातीची दिशा त्यांनीच दिली. त्या महाविद्यालयात माझं मन काही रमलं नाही आणि सुरु झाला दुसरीकडे जाण्याचा प्रवास. चार महिन्यातून मी तेथून एक्झिट केलं कित्येक सार्या आठवणी घेऊन.