Tuesday, June 2, 2020

अनलॉकिंग लॉकडाऊन...


....दहा-पंधरा दिवसांपूर्वी ची गोष्ट...... अकरा-साडे अकराची वेळ असावी....उन्हाचा पारा चढत होता....एका किराणा दुकानात गेलो होतो... सोबतच्या  मित्राला किराणा माल खरेदी करायचा होता...बरीच गर्दी होती दुकानात...मित्राला सोशल डिस्टन्स पळून लाईन मध्ये लागावं लागलं....थोड्या अंतरावर दुकानाच्या बाहेर दोन महिला उभ्या होत्या...त्यातील एक महिला त्या मित्राजवळ जाऊन काहीतरी द्या असं त्याला सांगत होती.....दुकानात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे त्या काहीतरी द्या असं हातवारे करत होत्या...बर्याच वेळानंतर तो मित्र खरेदी करून बाहेर आला...आणि त्या स्त्रियांना एक-दोन किलो तांदूळ, तेल असे बरेच काही सामान दिलं...मी बाहेर उभं राहून हे सर्व पाहत होतो....या मित्रा व्यतिरिक्त कुणीही त्यांच्याकडे लक्ष  दिलं नाही....त्यांच्या मागणीला दाद दिली नाही...उलट त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला....अर्धा-पाऊन  तास तिथे उभा होतो पण कुणी त्यांची मदत करताना दिसलं नाही...त्यांचे ते केविलवाणे / सुकलेले चेहरे, हडकुळी शरीरयष्टी, गौर वर्ण, मळलेले कपडे, पायात जुनाट स्लिपर असं चित्र पाहून मी विचारमग्न झालो...
त्या दृश्यानं मला अस्वस्थ केलं...विचलित केलं...याने दिलेलं दोन-चार दिवस पुरेल...पुढे काय? त्यानंतर मी दोन-तीन वेळेस त्या दुकानात गेलो....प्रत्येक वेळी त्या महिला तिथे दिसल्या....कित्येकांना मागतात....काही जण काही वस्तू घेऊन देतात....कित्येक जण टाळतात त्यांना...कित्येक तास म्हणजे दुकान बंद होईपर्यंत त्या तिथे उन्हा-तान्हात उभ्या राहतात... कुठलंही काम उपलब्ध नसल्याने त्या महिलांना हा मार्ग पत्करावा लागला...पोटाची भूक...दुसरं काय?
रात्री जेव्हा हि लोकं झोपी जात असतील ती उद्याच्या चिंतेत चं...आज निभावलं...उद्या काय? चिंता...चिंता आणि फक्त चिंता...पाचवीला पुजलेली...
त्यात आपला दृष्टीकोन फार चांगला नसतोच....आपल्यापैकी अनेक  त्यांच्याकडे कुत्सित नजरेने पाहणार, हेटाळणी करणार, त्यांच्या पासून दूर पळणार, दुर्लक्षित करणार, टीका-टिप्पणी करणार पण त्यांची हि अवस्था का यावर कधीही विचार करणार नाही कारण आपल्याला त्यांचे प्रश्न, अडचणी समजू शकत नाही... या गर्तेतून त्यांना बाहेर कोण काढणार?  असं चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळते....पण यांच्यासाठी आपल्याकडे अनलॉकिंग नाहीच...
James Baldwin या लेखकाने म्हटलंय...
“Anyone who has ever struggled with poverty knows how extremely expensive it is to be poor.”
वाटलं म्हणून अचानक सगळं बंद ची घोषणा करावी तेवढा सोपा हा देश नाही....मागचा-पुढचा विचार न करता घेतलेले निर्णय कित्येकांच्या आयुष्यात प्रचंड उलथा-पालथ करतात....देशोधडीला लावतात... लॉकडाऊन मुळे काय परिणाम झालाय हे घरात बसून कळणार नाही...मिडिया सुद्धा तळागाळापर्यंत पोचत नाही...आपल्या सोईने ते बातम्या छापतात, प्रसारित करतात... ज्याच्या खिशात पैसा आहे, बँकेत सेविंग आहे, पगार सुरु आहे त्यांना कधीही फरक पडणार नाही, पडला नाही. फरक पडला त्यांना ज्यांच्याकडे ना खिशात पैसा, ना बँकेत सेविंग, ना पगार...
काम करून पोट भरणार्यांचे जे हाल झाले असतील त्यांची कल्पना करता येणार नाही...त्याचं दु:ख हि आपण समजू शकत नाही...गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांना घरात बसावं लागलं...आर्थिक ओघ अचानक आटला....ओघाने अडचणी आल्याच...गरिबांच्या आयुष्यात सेविंग, पोलिसी,  मेडिक्लेम सारखे प्रकार नसतात...हे सगळे श्रीमंतांचे चोसले...

लॉकडाऊन च्या काळात मी जेव्हा हि बाहेर गेलो तेव्हा आसपास ची परिस्थिती पाहत होतो...ग्राउंड लेव्हल ला काय चाललं आहे त्याचा वेध घेत होतो...काही स्वयंसेवी संस्थांनी, धार्मिक संस्थांनी, राजकारणी लोकांनी कित्येकांना डबे पुरविण्याच काम केलय...तरीही ते प्रत्येक घटकापर्यंत पोचू शकले नाहीत हे तेवढंच खरं...यात हि काही लोकं फक्त फोटो सेशन साठी हि उठाठेव करत होते...अडचणी च्या काळात हि प्रसिद्धी चा मोह थोपवता आला  नाही अनेकांना...मदतीचा गवगवा करायचा नसतोच...पण कोण सांगणार त्यांना? लोकांची गरिबी  हि या लोकांच्या पत्थ्यावर पडते...त्यात हि ते स्वहित शोधत असतात...
आपण जो पर्यंत या शेवटच्या घटकापर्यंत पोचत नाही तो पर्यंत शाश्वत विकास म्हणता येणार नाही. तुम्ही कुठल्या हि विचारधारेचे असा....हे दृश्य तुम्ही दुर्लक्षित करू शकत नाही....
या देशातील प्रत्येक घटक जोपर्यंत आर्थिक बाबतीत स्वयंपूर्ण होत नाही तो पर्यंत विकासाच्या गप्पा मारण्यात अर्थ नाही.......
हजारो कोटी खर्चून बुलेट ट्रेन सारखे प्रकल्प आणणार..त्याची प्रसिद्धी करणार ...पण ती कुणासाठी? सामान्य माणूस तो खर्च करू शकतो? मुठभर लोकांसाठी सुविधा निर्माण करून काय करणार? इकडे बहुसंख्य लोकं अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी धडपड करत आहेत पिढ्यान-पिढ्या...त्या आर्थिक गर्तेतून ते अजूनही बाहेर निघाले नाहीत....
डिजिटल इंडिया ची स्वप्ने बघताना Poverty फ्री इंडिया हि प्रत्यक्षात आणायला हवं...मंगळ , चंद्र च्या वार्या   सुटल्या तरी चालतील...पण या मातीत जन्मलेल्या लोकांना सुखानं तर जगू द्यायची व्यवस्था करा...फुकटात देऊ नका पण रोजगाराच्या संधी तर निर्माण केल्या जाऊ शकतात...
त्या त्या भागात रोजगार निर्मिती करण्यासाठी आवश्यक ती सरकारी पाऊलं कधी पडली नाही...ठराविक शहरांचा विकास करण्याच्या नादात त्यांची हि अवस्था वाईट झाली...लोकसंख्या झेपवत नाही शहरांना...सुविधा पुरविल्या जात नाहीत...रोजगारानिमित्त शहरी भागात जाणारे लोकं आणि ओघाने वाढणार्या झोपडपट्ट्या, अतिक्रमणं...प्रश्न अधिक आणि उत्तरं कमी...अशी अवस्था...
लॉकडाऊन च्या निमित्ताने मजुरांचे लोंढे गावाकडे परताना पाहिले...गावाकडेच जर रोजगार निर्मिती झाली तर त्यांना शहरात जाण्याची गरज पडणार नाही...कित्येक गोष्टी टाळता येऊ शकतात...पण सरकारी अनास्था कशी घालवाल हा प्रश्न... जागतिकीकरणानंतर मुख्य प्रवाहातून दूर फेकल्या गेलेल्या कामगारांच्या बाजूने कुणीच लढत नाही... कामगार चळवळी नेस्तनाबूत झाल्यात....आता त्या कुठेही दिसत नाही... असंघटीत क्षेत्रातील लोकांचे अनेक प्रश्न आहेत...त्यांना कुणीही वाली नाही...नेतृत्व नाही त्यामुळे शासन दरबारी त्यांचे प्रश्न पोचत नाही...ज्यांनी पोचवायचा प्रयत्न केला ते नेते होऊन गब्बर झालेत...आणि त्यांनी यांना वार्यावर सोडलं...
मध्यंतरी एका प्रसिद्धी फेम आमदाराच्या मतदार संघात कामानिमित्त जाने झाले...गेल्या १५-२० वर्षांपासून त्या मतदार संघाचं प्रतिनिधित्व करत आहेत ते...पण त्या मतदार संघाची अवस्था वाईट...रस्ते, वीज, पाणी अशा मुलभूत गोष्टींची हि वानवा...मला राहवलं नाही...मी एका व्यक्तीला प्रश्न केला कि तुम्ही कस काय निवडून देता हो या व्यक्तीला....त्याचं उत्तर फार महत्त्वाचं होतं...ते म्हटले...आमदार साहेब बोलावलं तेव्हा येतात...प्रत्येक कार्यक्रमात हजर असतात गरिबापासून श्रीमंतांच्या....लोकं बढाया मारतात...आमच्याकडे आमदार साहेब आले होते लग्नात/कार्यक्रमात...लोकं यातच खुश आहेत...
“गरिबी हटावो” पासून “अच्छे दिन” पर्यंत व्हाया “इंडिया शायनिंग” चा प्रवास झालाय आपला....प्रत्येकानं या दुर्लक्षित वर्गाला स्वप्ने दाखविली...प्रलोभने दिली... त्यांची मते मिळवली...राजकीय फायदा करून घेतला...पण गरिबी हि हटली नाही...आणि अच्छे दिन हि आले नाहीत....खरं म्हणजे त्यांच्या आयुष्याचा कायापालट कधीच झाला नाही... शेवटी “आत्मनिर्भर” व्हा असं सांगून आपण मोकळे...
P.S.
नेल्सन मंडेला यांनी म्हटलंय...
“Poverty is not an act of Charity; it is an act of Justice”

सचिन भगत (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय
शेगाव