Friday, December 4, 2015

पुणे विद्यापीठातील आठवणी भाग-८

पुण्यात येऊन दोन-तीन  वर्षे झाली होती. पुढे काय करावे हे कळत नव्हतं. नेट/सेट काही पास होईना. एमफिल ला प्रवेश मिळाला.  अभ्यास सुरूच होता. त्यावेळेस मी पत्रकारिता सुद्धा करत होतो. नवीन बाईक घेतलेली होती. त्यामुळं विद्यापीठाबाहेर चं पुणे अनुभवणं सुरु होतंपुणे परिसर तसा पाहण्यालायकआसपास भरपूर निसर्गरम्य ठिकाणं, किल्ले, मंदिरे आहेत. एम ला असताना काही फिरता आलं नाही. आणि आता तर रिकामा होतो. विद्यावेतन मिळत होतं एम फिल चं. पैश्याचा प्रश्न मिटला होता. संशोधन करण्यासाठी विद्यावेतन दिलं जातं. संशोधन काय ते मला अजूनही कळलेलं नाही. तरी पण मी ते केलं. खरं तर फक्त विद्यावेतन आणि राहण्यासाठी साठी एम फिल ला प्रवेश घेतला जातो. यावर कुणाचंही दुमत असणार नाहीमित्र मंडळी हि वाढली होती. विभागाव्यतिरिक्त मित्र मिळाले होते.  

असंच एकदा तोरणा गडावर जायचं ठरलं. रविवार ला सकाळी आम्ही सगळे (नामदेव सर, चोथवे सर, शिवाजी सर, सुनील सर ) विद्यापीठाच्या बाहेर पडलो.  मी आणि चोथवे सर इंग्रजी विभागाचे तर इतर सगळे राज्यशास्त्राचे.  कुठं आणि कसं जायचं हे ठरलं होतं. पुण्याबाहेर आल्यानंतर तोरणा च्या दिशेने आम्ही सगळे निघालो होतो. दोन-तीन गाड्या होत्या. मध्ये एका ठिकाणी चहा घेतला. त्यावेळी पवार सर म्हटले तुम्ही मागे बसा, मी गाडी चालवतो. मी म्हटलं हरकत नाही. पवार सर तसे नवखे. नुकतीच गाडी शिकले होते. मी हि बिनधास्त बसलो . आणि आमचा प्रवास सुरु झाला. इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु होत्या. टिंगल टवाळ्या तर नेहमीच्याच.  राजकारण, समाजकारण, विद्यापीठ अशे कित्येक विषय चर्चेत येत होते.

पुढे एका वळणाला पवार सरांना गाडी वळवता आली नाही आणि आम्ही दोघेही गाडीवरून पडलो. नाल्यावर पूल होता. मी मागेच उडी मारली. पवार सर पुढे जाऊन पडले तर गाडी पुलावरून खाली पाण्यात.  बोलण्याच्या ओघात आणि कळण्याच्या आत नेमकं काय झालं ते क्षणभर कळलंच नाही. मी पवार सरांकडे गेलो आणि तुम्हाला जास्त लागल नाही नाही असं विचारत होतो. मी काय विचारतो आहे यावर त्यांच लक्षच नव्हतं. ते गाडीकडे पाहत होते. सचिन गाडी नवीन आहे. काही झालं तर नसेल ? असे अनेक प्रश्नांची त्यांनी सरबत्ती केली. मी म्हटलं ते जाऊ द्या हो. तुम्ही ठीक आहात का ते सांगा आधी. त्यांना फार टेन्शन आलं होत. गाडीचं काय झालं असेल आता. गाडी पाण्यात पडलेली होती. वर काढायची कशी त्यावर विचार करत होतो. इतर मित्रांना फोन करतो तर लागत नव्हता. कव्हरेज चं नव्हतं. समोरून येणाऱ्या  एका  व्यक्तीला थांबवलं. त्याच्या मदतीने गाडी वर काढली. आणि त्याच्याच मोबाईल वरून फोन लावला. सुदैवाने बीएसेणेल ला रेंज होती आणि आम्ही मित्रांना मागे बोलावलं. सगळेच टेन्शन मध्ये. मी गाडीकडे पाहिलं तर समोरचा भाग उद्धवस्त. तरी मी किक मारून पाहिली तर गाडी सुरु झाली. म्हटलं जाऊ द्या आता. आधी गडावर जाऊ आणि संध्याकाळी गाडी दुरुस्त करू.

आम्ही पुढचा प्रवास सुरु केला. तोरणा ची चढाई सुरु केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधताना सर्वप्रथम जिंकलेला किल्ला म्हणजे तोरणा. गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव पडले तोरणा. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत. यापैकी पहिल्या पदरावर तोरणा राजगड वसलेले आहेत. तोरणा म्हणजे पुणे जिल्ह्यातला सर्वात उंच डोंगर. तोरणा अत्यंत बिकट गड आहे. ताठ भिंतीसारखे कडे, अत्यंत अरुंद वाटा, भक्कम दरवाजेतटबंदी, अचूक मारा साधणारे बुरुज आणि गडाच्या सर्वोच्च माथ्यावर बालेकिल्ला असे तोरणाचे सौंदर्य. किल्ल्यावर मेंगाई देवी चं मंदिर आहे. वेळेअभावी तिथला सूर्यास्त आम्ही पाहू शकलो नाही. गडाच्या आजुबाजुला असलेल्या गर्द झाडीमुळे गड अतिशय सुंदर दिसतो.




तोरणा किल्ला फिरून झाला आणि राजगडाच्या पायथ्याशी पण जाऊन आलो. भरपूर मौज मस्ती केली. तरी गाडीचं किती नुकसान झालं असेल याचा विचार डोक्यात अधूनमधून येत होताच. परतल्यानंतर गाडी सरळ शोरूम ला दिली कारण त्यास्थितीत बाईक मला विद्यापीठात न्यायची नव्हती. पवार सर दवाखान्यात गेले. नाही म्हटलं तरीही त्यांनी मला पैसे दिलेच दुरुस्त करायला खर्च आला म्हणून. मला ते घ्यायचे नव्हतेच. पण घ्यावे लागले. वस्तू मध्ये माझा जीव कधी नव्हताच आणि अजूनपण पण नाही. अपघात होतात आयुष्यात. ते काही ठरवून होत नाही. पण आम्ही सुखरूप होतो. आणि तेच महत्त्वाचे होते आणि आहे. हा एक अविस्मरणीय प्रसंग होता. त्या छोट्या अपघातामुळे आमच्या आनंदावर मात्र काही फरक पडला नाही.
माणसाचं सामाजीकरण होण्यात अश्या भटकंतीचा खूप फायदा होतो. मला हि तो झालाच. एका ठराविक चौकटीतून मी बाहेर येत होतो. समोरच्या व्यक्ती मध्ये चांगलं काय हे शोधण्याचा प्रयत्न करत होतो. त्याआधी मी मानसं कधी जोडली नाहीत. माझा मित्र मला नेहमी म्हणायचा  कि  तू  destructive आहेस. तुला मानसं जोडता येत नाहीत. कारण माझा स्वभाव फार विचित्र होता. पण काळाच्या ओघात मी बदलत होतो. अपयश मला खूप काही शिकवून गेलं. म्हणूनच या सगळ्या मित्रांशी मी जोडलो गेलो. आमचे संबंध पूर्वी फार काही चांगले नव्हते. नंतर मी संबंध सुधारत गेलो. मानसं जोडण्याचा प्रयत्न केला. अपयशाच्या काळात याच लोकांनी आधार दिला.  खरं तर अपयश कसं पचवावं हे पवार सरांकडून शिकलो. चोथवे सर माझे सिनिअर असून पण माझ्याशी जुळवून घेतलं. सोबत अनेक क्षण घालवलेत. सुनील सर एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व. नेहमी हसत खेळत असायचे. त्यांच्या सोबत ट्रीप ला जाण्याची मजा काही औरच. जीवन फार मोठं आहे. वेगवेगळ्या वळणावर वेगवेगळी व्यक्तिमत्त्व भेटत राहतात. कित्येक आपण विसरून जातो पण काही मात्र लक्षात राहतात त्यांच्या वेगळेपणाने.

योगायोग असं कि काल परवा पवार सरांचा फोन आला त्यावेळी मी याच trip चे फोटो पाहत होतो. औपचारिक गप्पा झाल्या .कुठं, काय, कसं ने सुरु होणारे प्रश्न हि झालेत आणि उत्तरं हि झालीत.  नाहीतरी आजकाल प्रश्नही हि ठरलेले आणि उत्तरही हि. संभाषण संपल्यानंतर नकळत भूतकाळात गेलो. काय घडलं होतं ते शब्दात आणण्याचा प्रयत्न केला.
हे आर्टिकल या सगळ्या मित्रांची आठवण म्हणून......

सचिन भगत