Thursday, June 18, 2020

स्टँड-अप कॉमेडीची व्याख्या बदलणारा कपिल शर्मा


कपिल शर्मा...घराघरात पोचलेलं लोकप्रिय नाव...प्रत्येकाला कपिल शर्मा हे नाव माहित झालंय...एवढं यश यापूर्वी कोणत्या कॉमेडीयन ला मिळालं नाही.
स्टँड-अप कॉमेडी करणारे अनेक आहेत भारतात. त्यात भारती सिंग, कृष्णा अभिषेक, सुदेश लेहरी, राजू श्रीवास्तव, सुनील ग्रोव्हर, अली असगर, सुनील पाल, जॉनी लिव्हर असे अनेक स्टँड-अप कॉमेडी करणारे कलाकार आहेत. त्यात कपिल शर्मा याने आपला वेगळा ठसा उमटवला...
२००७ द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज मधून त्याने पदार्पण केलं...आणि विजेता ठरला....तेव्हापासून त्याने मागे वळून पाहिलं नाही...त्याआधी त्याने “हसदे हसांदे रहो” या पंजाबी शो मध्ये काम केलं होतं...
सोनी टीव्ही च्या कॉमेडी सर्कस च्या सहा सिझन मध्ये त्याने सहभाग घेतला आणि प्रत्येक सिझन चा विजेता ठरला... झलक दिखला जा हा डान्स शो होस्ट केला...
२०१३ मध्ये त्याने स्वतःचा कॉमेडी नाईट विद कपिल हा शो कलर्स वाहिनीवर सुरु केला....त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला...
द कपिल शर्मा शो हा कार्यक्रम सोनी वाहिनीवर प्रसारित होऊ लागला त्यालाही प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला...
तो तिथेच थांबला नाही तर विविध अवार्ड शो सुद्धा होस्ट करू लागला... किस किस को प्यार करू या चित्रपटातून त्याने चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं...
सध्याच्या घडीला कपिल शर्मा  आघाडीचा कॉमेडीयन आहे. अल्पावधीत त्याने या क्षेत्रात नाव कमावलंय.
त्याची संवादफेक आणि त्यातून निर्माण झालेला विनोद प्रेक्षकांना खिळवून ठेवतो...हसायला भाग पाडतो.
कमरेखालचे विनोद, पांचट विनोद हि आपल्याला पाहायला मिळतात पण म्हणून एक यशस्वी कॉमेडीयन म्हणून त्याचं अस्तित्व नाकारता येत नाही.
सुरुवातीला कॉमेडीयन  आणि प्रेक्षक एकमेकांसमोर असायचे. तंत्रज्ञानाचा जसा-जसा वापर वाढत गेला तसा स्टॅण्ड-अप कॉमेडी चा प्रसार होत गेला. यू-टय़ुब च्या माध्यमातून व्हिडीओ अपलोड करणे सुकर झालं.  खरं तर स्टॅण्ड-अप कॉमेडी हा अमेरिकेत उदयास आला आणि त्याचा इतर देशांमध्ये प्रसार झाला. मनोरंजन हा त्याचा मूळ उद्देश. हे क्षेत्र आता व्यावसायिक झालंय. अमाप पैसा मिळू लागलाय. त्यामुळे या क्षेत्रात करिअर करणाऱ्यांची संख्या हि वाढली आहे.

प्रेक्षकांना खीळखिळून हसवणं सोपं नाही. त्यासाठी प्रसंगावधान, आसपास चालणाऱ्या घडामोडी यावर लक्ष ठेवावं लागतं. वेळेवर उद्भवणाऱ्या प्रसंगावर विनोद करता यायला  हवा, व्यंग जमलं पाहिजे. सोबत भाषेवर पकड, body language , चेहऱ्यावरचे हावभाव त्याला अनुसरून असले पाहिजे.  हे सारं जुळून येण्यासाठी प्रचंड मेहनत. आणि तेच कपिल शर्माने केलंय.
स्टँड-अप कॉमेडी हा कलाप्रकार त्यानं सामान्यांपर्यंत पोचवला असं म्हणायला हरकत नाही.
स्टँड-अप कॉमेडी क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्यांनी कपिल शर्मा चं उदाहरण समोर ठेवून शिकावं.

सचिन भगत (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय
शेगाव

Wednesday, June 3, 2020

गुंतागुंत


नेहमी...कायम...सातत्याची...अखंड...अविरत...कितीही प्रयत्न करा बाहेर पडायचा...गुंता काही सुटत नाही....
तो कशाचाही असो मग...भावनिक...व्यावहारिक...आर्थिक...राजकीय अथवा सामाजिक....प्रत्येक ठिकाणी ती गुंतागुंत...
गोष्टी सोप्या करायला जावं तर कठीण होऊन बसतात...सोडून दिलं कि गुंता अधिकच वाढत जातो...कशा-कशातून सुटका करावी?
स्पष्ट बोललं कि गुंता सुटतो पण नाती तुटतात...नाती टिकवायला गेलं कि गुंता वाढत जातो...फसगत होत राहते नेहमी.....मग निमुटपणे सहन करत राहायचं....
आजकाल प्रत्येकाच्या अपेक्षा वाढल्या आहेत...त्या अपेक्षांची पूर्ती करणं कित्येकदा शक्य होत नाही...त्यातून सुरु होते आपली प्रतिमा हनन....भूतकाळातले अनुभव आपली पाठ सोडत नाही आणि वर्तमान जगू देत नाही अशी अवस्था....
जेव्हा जेव्हा हि बंधने झुगारण्याचा प्रयत्न करावा, आसपास ची लोकं आडकाठी करायला सुरु करतात....समाजाला अपेक्षित जगावं कि स्व-इच्छेने ...द्वंद...गुंतागुंत....इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती...
विचारप्रणाली...डावी...उजवी कि अजून कुठली...माणसाला जगण्यासाठी कुठल्यातरी विचारधारेचा आधार लागतो असंही म्हटलं जातं बर्याचदा...
या जगात एकच विचारप्रणाली होऊ शकते ती म्हणजे योग्य ते योग्य आणि अयोग्य ते अयोग्य...डाव्या...उजव्या या फंदात पडलं कि गोंधळ होतो...चुकीचं हि समर्थन करण्याची शक्यता असते किंवा असतेच...आजकाल ते सर्रास दिसून येते....मला हि विचारधारा आवडते म्हणून सारं काही बरोबर असं होऊ शकत नाही...
माणुसकी...माणूसपण हे विचारधारा होऊ शकत नाही का?
आज कुठे हि जा...लोकं सरळ-सरळ दोन गटात विभागले गेले आहेत....कुठलीही विचारधारा परिपूर्ण नाही...गुण-दोष आहेतच...त्यामुळे ते स्वीकारणं कठीणच...
मानवी कल्याणासाठी जो झटतो त्याची विचारधारा पहायची नसते… विचारधारा खायला देत नाही...पोटाचा प्रश्न सोडवत नाही...

गुंतागुंत आहे सगळी...नेमकं काय करावं हे सुचत नाही...आसपास चं वातावरण ही दिवसेंदिवस गढूळ होत चाललंय...निरागसता लोप पावत चाललीय....गोंधळ उडालाय विचारांचा सगळीकडे...सोपं...साधं...सरळ काही उरलं नाही...प्रत्येक गोष्ट किचकट होऊन बसली...गफलत होऊन बसली आहे...
हा गुंता कधीतरी सुटेल हीच काय ती आशा...

सचिन भगत (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय
शेगाव

अनुभव ९


प्रत्येकाचं आयुष्य हे चढ-उतारांनी भरलेलं आहे...प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या दिव्यातून जावं लागतेच...मी हि त्याला अपवाद नाही...
बर्याच वर्षापूर्वी ची गोष्ट आहे...शिक्षण सुरु होतं...नुकताच ग्रामीण भागातून शहरी भागात गेलो होतो....एकानं सल्ला दिला ...शिक्षण सोडून दे...शिकून तरी काय होतं....त्यापेक्षा कंपनीत जा...काम कर...आता साठ रुपये रोज आहे...वाढेल हळू हळू....मी काही बोललो नाही.
फार अपेक्षेने मी त्यांच्याकडे गेलो होतो....सुरुवातीच्या काही दिवसात त्यांचा शिक्षणा-बद्दलचा दृष्टीकोन फार बरा नाही हे कळून चुकलं होतं...त्यामुळे आज ना उद्या असं काहीतरी होईल असं मला माहित होतं...
....व्यावहारिक सल्ला होता त्यांचा...वर्तमान परिस्थितीत तो लागू होता...कारण त्यावेळी आर्थिक आवक नव्हतीच...शिकणं म्हणजे हि कसरत होती...आणि भविष्याचं काही खरं नव्हतं...सर्व काही माहित असूनही पण तो सल्ला मला रुचला नाही...
प्रोत्साहन देण्या ऐवजी हिरमोड करणारा सल्ला होता....गरिबांची स्वप्ने प्रत्यक्षात येत नाही...त्यांनी स्वप्ने पाहू नये असा आपला समज आहे...तेच प्रत्येकाच्या बाबतीत होत राहते...मी त्याला अपवाद कसा असणार?
वारंवार त्यांच्याकडून येणाऱ्या दबावाला बळी पडलो आणि एका कंपनीत आठ दिवस जाऊन काम केलं...पण जमेना...स्वप्न आणि वास्तव यात संघर्ष सुरु होता...मन लागत नव्हतं....काम करण्याचं वय हि नव्हतं....अंग मेहनतीचं काम होतं...सहन होईना.....सोडून दिलं मग...मिळकत हि फार कमी....श्रमाला मोल नाही आपल्या देशात...मेहनत करून लोकांच्या हातात तुटपुंजा पैसा येतो हे तेव्हा कळल...
माझी त्यातून सुटका झाली...प्रत्येकाची होईल असेही नाही....जे वाटतं ते करायला हवं....निर्णय चुकला तरी चालेल, त्यातून शिकायला मिळेल....इतरांच्या सल्ल्यानुसार केलं आणि फसगत झाली तर त्यांना शिव्या घालण्यात आयुष्य जाईल...
मी मनाला जे पटेल ते केलं...भविष्य चांगलं करायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे माहित होतं...त्यामुळे कुणालाही भिक घातली नाही...पार्ट टाईम काम करून शिकलो....पुढे जात राहिलो...मार्ग सापडत गेला...काही चांगली लोकं भेटली...त्यांनी तो प्रवास सोपा केला....कित्येक अडचणी सोडवल्या...
अजूनही आसपास कित्येक जण आर्थिक कारणामुळे शिक्षण घेऊ शकत नाही...अर्ध्यावर सोडून देणारेही अनेक...शिक्षण हा प्रत्येकाचा अधिकार...त्यांना तो मिळायला हवा...तळागाळापर्यंत शिक्षणाचा प्रसार व्हायला हवा...
इच्छा तेथे मार्ग...दुसरं काय?

मागे वळून पाहतो तेव्हा इतरांचं ऐकलं नाही ते बरं झालं असं वाटते...नाहीतर तर कुठेतरी तुटपुंज्या मिळकतीवर काम करावं लागलं असतं... स्वतःच्या आयुष्यातील निर्णय स्वतःच घ्यावेत...आसपास चे लोकं चांगला सल्ला देतीलच असे नाही.
अडचणी असंख्य आल्या...पण ती प्रत्येक अडचण काहीतरी शिकवून गेली...अनुभव देऊन गेली...


सचिन भगत (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय
शेगाव



Tuesday, June 2, 2020

अनलॉकिंग लॉकडाऊन...


....दहा-पंधरा दिवसांपूर्वी ची गोष्ट...... अकरा-साडे अकराची वेळ असावी....उन्हाचा पारा चढत होता....एका किराणा दुकानात गेलो होतो... सोबतच्या  मित्राला किराणा माल खरेदी करायचा होता...बरीच गर्दी होती दुकानात...मित्राला सोशल डिस्टन्स पळून लाईन मध्ये लागावं लागलं....थोड्या अंतरावर दुकानाच्या बाहेर दोन महिला उभ्या होत्या...त्यातील एक महिला त्या मित्राजवळ जाऊन काहीतरी द्या असं त्याला सांगत होती.....दुकानात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे त्या काहीतरी द्या असं हातवारे करत होत्या...बर्याच वेळानंतर तो मित्र खरेदी करून बाहेर आला...आणि त्या स्त्रियांना एक-दोन किलो तांदूळ, तेल असे बरेच काही सामान दिलं...मी बाहेर उभं राहून हे सर्व पाहत होतो....या मित्रा व्यतिरिक्त कुणीही त्यांच्याकडे लक्ष  दिलं नाही....त्यांच्या मागणीला दाद दिली नाही...उलट त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला....अर्धा-पाऊन  तास तिथे उभा होतो पण कुणी त्यांची मदत करताना दिसलं नाही...त्यांचे ते केविलवाणे / सुकलेले चेहरे, हडकुळी शरीरयष्टी, गौर वर्ण, मळलेले कपडे, पायात जुनाट स्लिपर असं चित्र पाहून मी विचारमग्न झालो...
त्या दृश्यानं मला अस्वस्थ केलं...विचलित केलं...याने दिलेलं दोन-चार दिवस पुरेल...पुढे काय? त्यानंतर मी दोन-तीन वेळेस त्या दुकानात गेलो....प्रत्येक वेळी त्या महिला तिथे दिसल्या....कित्येकांना मागतात....काही जण काही वस्तू घेऊन देतात....कित्येक जण टाळतात त्यांना...कित्येक तास म्हणजे दुकान बंद होईपर्यंत त्या तिथे उन्हा-तान्हात उभ्या राहतात... कुठलंही काम उपलब्ध नसल्याने त्या महिलांना हा मार्ग पत्करावा लागला...पोटाची भूक...दुसरं काय?
रात्री जेव्हा हि लोकं झोपी जात असतील ती उद्याच्या चिंतेत चं...आज निभावलं...उद्या काय? चिंता...चिंता आणि फक्त चिंता...पाचवीला पुजलेली...
त्यात आपला दृष्टीकोन फार चांगला नसतोच....आपल्यापैकी अनेक  त्यांच्याकडे कुत्सित नजरेने पाहणार, हेटाळणी करणार, त्यांच्या पासून दूर पळणार, दुर्लक्षित करणार, टीका-टिप्पणी करणार पण त्यांची हि अवस्था का यावर कधीही विचार करणार नाही कारण आपल्याला त्यांचे प्रश्न, अडचणी समजू शकत नाही... या गर्तेतून त्यांना बाहेर कोण काढणार?  असं चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळते....पण यांच्यासाठी आपल्याकडे अनलॉकिंग नाहीच...
James Baldwin या लेखकाने म्हटलंय...
“Anyone who has ever struggled with poverty knows how extremely expensive it is to be poor.”
वाटलं म्हणून अचानक सगळं बंद ची घोषणा करावी तेवढा सोपा हा देश नाही....मागचा-पुढचा विचार न करता घेतलेले निर्णय कित्येकांच्या आयुष्यात प्रचंड उलथा-पालथ करतात....देशोधडीला लावतात... लॉकडाऊन मुळे काय परिणाम झालाय हे घरात बसून कळणार नाही...मिडिया सुद्धा तळागाळापर्यंत पोचत नाही...आपल्या सोईने ते बातम्या छापतात, प्रसारित करतात... ज्याच्या खिशात पैसा आहे, बँकेत सेविंग आहे, पगार सुरु आहे त्यांना कधीही फरक पडणार नाही, पडला नाही. फरक पडला त्यांना ज्यांच्याकडे ना खिशात पैसा, ना बँकेत सेविंग, ना पगार...
काम करून पोट भरणार्यांचे जे हाल झाले असतील त्यांची कल्पना करता येणार नाही...त्याचं दु:ख हि आपण समजू शकत नाही...गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांना घरात बसावं लागलं...आर्थिक ओघ अचानक आटला....ओघाने अडचणी आल्याच...गरिबांच्या आयुष्यात सेविंग, पोलिसी,  मेडिक्लेम सारखे प्रकार नसतात...हे सगळे श्रीमंतांचे चोसले...

लॉकडाऊन च्या काळात मी जेव्हा हि बाहेर गेलो तेव्हा आसपास ची परिस्थिती पाहत होतो...ग्राउंड लेव्हल ला काय चाललं आहे त्याचा वेध घेत होतो...काही स्वयंसेवी संस्थांनी, धार्मिक संस्थांनी, राजकारणी लोकांनी कित्येकांना डबे पुरविण्याच काम केलय...तरीही ते प्रत्येक घटकापर्यंत पोचू शकले नाहीत हे तेवढंच खरं...यात हि काही लोकं फक्त फोटो सेशन साठी हि उठाठेव करत होते...अडचणी च्या काळात हि प्रसिद्धी चा मोह थोपवता आला  नाही अनेकांना...मदतीचा गवगवा करायचा नसतोच...पण कोण सांगणार त्यांना? लोकांची गरिबी  हि या लोकांच्या पत्थ्यावर पडते...त्यात हि ते स्वहित शोधत असतात...
आपण जो पर्यंत या शेवटच्या घटकापर्यंत पोचत नाही तो पर्यंत शाश्वत विकास म्हणता येणार नाही. तुम्ही कुठल्या हि विचारधारेचे असा....हे दृश्य तुम्ही दुर्लक्षित करू शकत नाही....
या देशातील प्रत्येक घटक जोपर्यंत आर्थिक बाबतीत स्वयंपूर्ण होत नाही तो पर्यंत विकासाच्या गप्पा मारण्यात अर्थ नाही.......
हजारो कोटी खर्चून बुलेट ट्रेन सारखे प्रकल्प आणणार..त्याची प्रसिद्धी करणार ...पण ती कुणासाठी? सामान्य माणूस तो खर्च करू शकतो? मुठभर लोकांसाठी सुविधा निर्माण करून काय करणार? इकडे बहुसंख्य लोकं अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी धडपड करत आहेत पिढ्यान-पिढ्या...त्या आर्थिक गर्तेतून ते अजूनही बाहेर निघाले नाहीत....
डिजिटल इंडिया ची स्वप्ने बघताना Poverty फ्री इंडिया हि प्रत्यक्षात आणायला हवं...मंगळ , चंद्र च्या वार्या   सुटल्या तरी चालतील...पण या मातीत जन्मलेल्या लोकांना सुखानं तर जगू द्यायची व्यवस्था करा...फुकटात देऊ नका पण रोजगाराच्या संधी तर निर्माण केल्या जाऊ शकतात...
त्या त्या भागात रोजगार निर्मिती करण्यासाठी आवश्यक ती सरकारी पाऊलं कधी पडली नाही...ठराविक शहरांचा विकास करण्याच्या नादात त्यांची हि अवस्था वाईट झाली...लोकसंख्या झेपवत नाही शहरांना...सुविधा पुरविल्या जात नाहीत...रोजगारानिमित्त शहरी भागात जाणारे लोकं आणि ओघाने वाढणार्या झोपडपट्ट्या, अतिक्रमणं...प्रश्न अधिक आणि उत्तरं कमी...अशी अवस्था...
लॉकडाऊन च्या निमित्ताने मजुरांचे लोंढे गावाकडे परताना पाहिले...गावाकडेच जर रोजगार निर्मिती झाली तर त्यांना शहरात जाण्याची गरज पडणार नाही...कित्येक गोष्टी टाळता येऊ शकतात...पण सरकारी अनास्था कशी घालवाल हा प्रश्न... जागतिकीकरणानंतर मुख्य प्रवाहातून दूर फेकल्या गेलेल्या कामगारांच्या बाजूने कुणीच लढत नाही... कामगार चळवळी नेस्तनाबूत झाल्यात....आता त्या कुठेही दिसत नाही... असंघटीत क्षेत्रातील लोकांचे अनेक प्रश्न आहेत...त्यांना कुणीही वाली नाही...नेतृत्व नाही त्यामुळे शासन दरबारी त्यांचे प्रश्न पोचत नाही...ज्यांनी पोचवायचा प्रयत्न केला ते नेते होऊन गब्बर झालेत...आणि त्यांनी यांना वार्यावर सोडलं...
मध्यंतरी एका प्रसिद्धी फेम आमदाराच्या मतदार संघात कामानिमित्त जाने झाले...गेल्या १५-२० वर्षांपासून त्या मतदार संघाचं प्रतिनिधित्व करत आहेत ते...पण त्या मतदार संघाची अवस्था वाईट...रस्ते, वीज, पाणी अशा मुलभूत गोष्टींची हि वानवा...मला राहवलं नाही...मी एका व्यक्तीला प्रश्न केला कि तुम्ही कस काय निवडून देता हो या व्यक्तीला....त्याचं उत्तर फार महत्त्वाचं होतं...ते म्हटले...आमदार साहेब बोलावलं तेव्हा येतात...प्रत्येक कार्यक्रमात हजर असतात गरिबापासून श्रीमंतांच्या....लोकं बढाया मारतात...आमच्याकडे आमदार साहेब आले होते लग्नात/कार्यक्रमात...लोकं यातच खुश आहेत...
“गरिबी हटावो” पासून “अच्छे दिन” पर्यंत व्हाया “इंडिया शायनिंग” चा प्रवास झालाय आपला....प्रत्येकानं या दुर्लक्षित वर्गाला स्वप्ने दाखविली...प्रलोभने दिली... त्यांची मते मिळवली...राजकीय फायदा करून घेतला...पण गरिबी हि हटली नाही...आणि अच्छे दिन हि आले नाहीत....खरं म्हणजे त्यांच्या आयुष्याचा कायापालट कधीच झाला नाही... शेवटी “आत्मनिर्भर” व्हा असं सांगून आपण मोकळे...
P.S.
नेल्सन मंडेला यांनी म्हटलंय...
“Poverty is not an act of Charity; it is an act of Justice”

सचिन भगत (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय
शेगाव


Monday, June 1, 2020

परीक्षेची परीक्षा...


गेल्या कित्येक दिवसांपासून अंतिम वर्षाच्या परीक्षांबद्दल चर्चा सुरु होती....काल तो प्रश्न मिटला....परीक्षा रद्द झाल्या आणि सरासरी च्या आधारावर गुण देऊन निकाल जाहीर करण्याचं ठरलं...यावर चर्चा होत राहील...योग्य कि अयोग्य यावर उठसुठ कुणीही बोलत राहील...
परीक्षा....शिकायला लागल्यापासून परीक्षा आपल्या मागे लागल्या....त्यात मिळणारे गुण यावर आपली गुणवत्ता ठरायला लागली...त्यातून हुशार, साधारण, ढ...अशा कॅटेगरी निर्माण झाल्या...आपली परीक्षा पद्धती चा विचार केला तर घोकंपट्टी...पाठांतर....च्या आधारावर केलेली चाचणी असं म्हणता येईल...आपण सर्वच हे करत आलो...करतोय...
पुस्तकी शिक्षण आणि व्यावहारिक शिक्षण यातला फरक प्रचंड आहे. मार्केट मध्ये किती गुण मिळाले हे कुणी विचारात नाही. तुम्ही काय शिकलात...त्याचा कसा उपयोग करू शकता यावर सर्व काही अवलंबून...
मग एखाद्या सेमिस्टर ची परीक्षा रद्द झाली तर काय फरक पडतो...परीक्षा महत्त्वाची कि जीव?....
कधी नव्हे तसं संकट उभं ठाकल आहे...त्यामुळे जीव धोक्यात घालणे परवडणारं नाही...
...असंही आपल्याकडे परीक्षा देणारे विद्यार्थी आणि त्याचं मुल्यांकन करणारे शिक्षक याचा कुठेही ताळमेळ नाही...
परीक्षा पद्धती म्हणजे भूलभुलैया...कागदपत्री शंभर टक्के दिसत असले तरी व्यावहारिक जीवनात त्याचा काहीच उपयोग होत नाही...
या परीक्षेचा एक प्रसंग:
माझ्या एका मित्राची गोष्ट...पदवी चं शेवटच वर्ष होतं...एकूण सहा विषय...वार्षिक परीक्षा होती तेव्हा...स्पेशलायझेशन चे चार विषय आणि दोन ऐच्छिक... स्पेशलायझेशन च्या विषयांचा प्रोब्लेम नव्हताच...सातत्याने अभ्यास असायचा...पण ऐच्छिक विषयाकडे त्यानं वर्षभर ढुंकून हि पाहिलं नाही....वार्षिक परीक्षेचं वेळापत्रक जेव्हा जाहीर झालं तेव्हा प्रत्येक पेपर साठी एक-दोन दिवस gap होता....त्यामुळे त्याने ठरवलं कि तेव्हाच अभ्यास करायचा...त्याचे ऐच्छिक विषय भूगोल आणि राज्यशास्त्र.... स्पेशलायझेशन चे चार विषय आणि भूगोल यांचे पेपर चांगले गेले...शेवटच्या पेपर साठी दोन दिवस अवधी होता...syllabus पाहून त्या दिवशी तो ग्रंथालयात गेला आणि राज्यशास्त्र विषयाशी सबंधित एक-दोन पुस्तके घेऊन आला. जाड-जुड पुस्तके....आठ विचारवंत होते अभ्यासक्रमात.....कार्ल मार्क्स, डॉ. आंबेडकर, महात्मा गांधी वगैरे वगैरे....
वाचायला घेतलं तर हे विचारवंत काही डोक्यात घुसेना...हे करू कि ते करू...कुठल्या विचारवंता पासून सुरुवात करू ....त्यात एक दिवस असाच निघून गेला. दुसर्या दिवशी रात्र थोडी सोंगे फार अशी परिस्थिती...त्याने ठरवलं कि आठ पैकी फक्त चार विचारवंत अभ्यासायचे....चार सोडून द्यायचे...ते ठरवताना त्याने मार्क्स सारखे समजायला कठीण सोडून दिले....जे समजायला सोपे होते फक्त तेच अभ्यासले...म्हणजे महत्त्वाचे विचारवंत ज्यावर हमखास प्रश्न येतात असे सोडले आणि कसे-बसें उरलेले चार विचारवंत अभ्यासून तो परीक्षेला गेला...प्रश्नपत्रिका जेव्हा हातात आली तेव्हा त्याच्या लक्षात आलं कि ज्याचा त्याने अभ्यास केला आहे त्यावर फक्त पंधरा मार्क चे प्रश्न आहेत आणि उरलेला पेपर जे अभ्यासले नाही त्यावर.... तारांबळ उडाली त्याची....काय करावं ते सुचेना....आयुष्यात पहिल्यांदा असं घडलं होतं.....करून घेऊ...एक दोन-दिवसात होऊन जाईल अभ्यास....हा अतिआत्मविश्वास, निष्काळजीपणा अंगलट आला होता....
...पंधरा मार्कांचा पेपर सोडवून झाल्यावर त्याने ठरवलं कि जे विचारवंत अभ्यासले आहेत त्यांचीच माहिती इथे लिहायची फक्त नावे बदलून...म्हणजे गांधींचे आर्थिक विचार अभ्यासले असतील तर मार्क्स च्या नावाखाली खपवायचे...तेच नाही तर स्वतःला जे वाटते ते या विचारवंतांच्या नावाखाली खपवायचे.....संपूर्ण पेपर त्याने असाच सोडवला...एक-दोन पुरवण्या लावल्या आणि बाहेर पडला.....निकाल लागेपर्यंत जीव टांगणीला लागला....आपला पेपर जर वाचला तपासनार्याने तर दहा-बारा गुणांच्या पलीकडे मिळणार नाहीत....दिवसामागून दिवस जात राहिले....जेव्हा निकाल जाहीर झाला तेव्हा त्याला त्या विषयात शंभर पैकी ८१ गुण होते....त्याला हि धक्का बसला...हीच का ती परीक्षापद्धती? मग हे जे मूल्यमापन होते ते खरं आहे कसं मानायचं....अमुक पहिला...तमुक पहिला...ऐंशी टक्के...नव्वद टक्के...सारं भुलभुलैय्या...
अभ्यास करून जेवढे गुण कधी मिळाले नाहीत तेवढे गुण मिळालेत...कसा विश्वास ठेवावा या व्यवस्थेवर...या परीक्षा पद्धतीवर...मुल्यांकन करणारे काय करत असतील यावरून समजेल....
प्रथम क्रमांक मिळवणारे, ढीगभर टक्के मिळवणारे  कुठे लुप्त होतात हे कधीच समजल नाही... रट्टे मारणारी मंडळी उत्तम गुणांनी पास होते...एवढं मात्र खरं...

...ज्यांना कमी गुण मिळतात त्यांना येणारं नैराश्य ...त्यातून निर्माण होणार्या मानसिक समस्या याकडे हि लक्ष द्यायची गरज आहे.
त्यामुळे टक्केवारीच्या या प्रवाहात अडकून न पडता काय गरजेचं आहे यावर लक्ष केंद्रित झालं पाहिजे...
आपली परीक्षा पद्धती च आरोपीच्या पिंजर्यात आहे...त्यात बदल गरजेचा आहे...काही प्रमाणात प्रयत्न सुरु आहेत...केस स्टडी, ओपन बुक टेस्ट हा त्यातील एक प्रकार...
शिकलेलं समजलं पाहिजे...त्याचा दैनंदिन जीवनात वापर करता आला पाहिजे असा व्यावहारिक दृष्टीकोन ठेऊन बदल व्हायला पाहिजेत...
पुस्तकांत सामाविष्ट करण्यात आलेले धडे समजावून न घेता केवळ घोकंपट्टी हा प्रकार बंद व्हायला हवा...पालकांनी गुणांच्या मागे न लागता कौशल्य वाढीकडे लक्ष द्यायला पाहिजे...
त्यामुळे परीक्षा रद्द झाली काही फरक पडणार नाही...ज्यांच्याकडे कौशल्ये आहेत त्यांना प्रचंड वाव आहे...
काही तथाकथित विद्यार्थी संघटनांना न जुमानता सरकारने विद्यार्थ्यांचा विचार करून निर्णय घेतला हे बरं झालं....


सचिन भगत (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय
शेगाव