Saturday, September 12, 2020

कंगना राणावत (Kangana Ranavat)-दुसरी बाजू

बॉलीवूड...मायानगरी....मायाजाल..... देशभरातून कित्येक युवक-युवती आपलं नशीब आजमावण्यासाठी मुंबईत येतात. काही यशस्वी होतात तर कित्येक  अयशस्वी... बॉलीवूड मधील राजकारण, वातावरण, संस्कृती  प्रत्येकाला झेपेल असंही नाही. तिथे काय योग्य नि काय अयोग्य यात फार अंतर नाही. कोण कधी कुणासोबत जाईल, कधी लग्न होईल नि कधी तुटेल अथवा लिव्ह इन असे अनेक प्रकार तेथे चालतात.  प्रसिद्धी, झगमगाट, पैसा इ. च्या मागे लागणारे अनेक. अशा अनेक नावांपैकी एक कंगना राणावत...मुळची हिमाचल प्रदेशातील...मुंबईत आली आणि आपली कारकीर्द घडवली...मुंबईत आलेली एक नवखी युवती ते एक यशस्वी अभिनेत्री असा तिचा प्रवास...

कंगना राणावत...बॉलीवूड क्वीन....सध्या सगळीकडे तिची चर्चा. तसंही ती नेहमी प्रसिद्धी झोतात असते. आजपर्यंत अनेक चित्रपटांमधून ती आपल्यासमोर आली आहे. अनेक दर्जेदार चित्रपट तिने दिलेत. तिच्या अभिनयाची सुद्धा प्रशंसा केली जाते. आज जे आपल्याला दिसते की ती आता रुळली आहे बॉलीवूड मध्ये, ते सहज घडून आलं नसेल. मेहनत असेल, संघर्ष असेल, मान-अपमान वाटेला आला असेल. परंतु ती त्यातून तावून सुलाखून बाहेर पडली. आणि एक चांगली अभिनेत्री, प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून आता आपण तिच्याकडे पाहतो. जेवढे प्रशंसक तेवढे टीकाकार ही असणार.

ती चित्रपटसृष्टीत आल्यापासून तिचा प्रवास दिसतो तेवढा सोपा नसणार. अलीकडे ती जरा जास्तच चिडचिड करतेय. अनेकदा वाद ओढवून घेते. तिच्यावर टीका-टिप्पणी सुद्धा ओघाने आलीच.परंतु आपल्या पैकी किती लोकांनी तिचं आयुष्य बघितलंय? ती अशी का वागतेय हे जाणून घेण्याचा आहे प्रयत्न केलाय का कधी?

कुटुंबाचा विरोध झुगारून ती वयाच्या सोळाव्या वर्षी दिल्लीला आली आणि थिएटर ग्रुप जॉईन केला. नंतर ती मुंबईत आली बॉलीवूड मध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी. ते सुद्धा कुठलीही पार्श्वभूमी नसताना. कुणी Godfather नाही की कुणाचा पाठींबा नाही. नेपोटीझम प्रचंड असताना करिअर घडवणे, स्वतःची ओळख निर्माण करणे वाटते तेवढंही सोपं नसणार. त्यामुळे खऱ्या अर्थाने ती Outsider. त्यामुळे प्रस्थापित लोकांचा किती त्रास झाला असणार त्याची आपल्याला कल्पना ही करता येणार नाही. पांचोली असो, महेश भट असो की ऋत्विक रोशन या साऱ्यांनी तिचा गैरफायदा उठवला. तिच्यावर अत्याचार केलेत.  हे सर्वाना माहित आहे. वेळोवेळी ती याबद्दल माध्यमांमध्ये बोलली आहे. एवढं सत्य बोलायला ही हिंमत लागते. आपली प्रतिमा काय होईल हा विचार न करता आपल्यासोबत काय घडलं ते जगासमोर मांडते आहे. एक महिला म्हणून आपण तिचं कौतुक नक्की करायला हवं.

एक महिला म्हणून तिचा विचार करायला हवा. आता तिचं करिअर चांगलं सेट झालंय, परंतु भूतकाळ कसा विसरणार? पावलागणिक फसवणूक झाली असणार, अत्याचार झाले असतील. ती साऱ्यांना पुरून उरली. आज जे तिचं वर्तन आपल्याला दिसतेय त्याचं उत्तर कदाचित तिच्या भूतकाळात दडलेलं असणार.

आजकाल ती सोशल मेडिया वर जोहर, कपूर, रोशन, पांचोली या प्रस्थापित सर्वांवर तोंडसुख घेतेय. नेपोटीझमवर बोलतेय. एवढी हिंमत आजपर्यंत कुणी दाखवली नाही. म्हणून तिचं स्वागत केलं पाहिजे. तिची भूमिका कदाचित आपल्याला पटणार नाही परंतु तिच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर आपण गदा आणू शकत नाही.

राजकारणी तिचा वापर करून घेतील स्वतःच्या फायद्यासाठी हे उघड आहे. सुशांत सिंग प्रकरणात ती सातत्याने वेगवेगळी विधाने करत आहे. मुंबई पोलिसांवर आक्षेप असो की मुंबई बद्दल चं तिचं वक्तव्य चुकीचं आहेच. मुख्यमंत्र्याचा एकेरी उल्लेख ही चुकीचाच.  पण म्हणून बीएमसी च्या कारवाई चं ही आपण समर्थन करू शकत नाही. मुंबई...मराठी माणसाच्या अस्मितेचं प्रतिक...त्यामुळे मुंबईबद्दल अपशब्द म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान...असं चित्र. त्यामुळे ती टीकेची धनी झाली. टीका सुद्धा व्हायला पाहिजे त्याबद्दल शंका नाही.

जेव्हा सर्वांच्याच नजरा वाईट, प्रत्येकजण परिस्थितीचा गैरफायदा उठवण्याच्या प्रयत्नात अशा परिस्थितीत एका महिलेला किती त्रास सहन करावा लागत असेल याची आपण कल्पना करू शकत नाही. सेक्स सिम्बॉल म्हणून तिच्याकडे पाहिलं जाते. ती त्याला बळीही पडली असणार. तिचा गैरफायदा घेतला गेला असणार. याबद्दल दुमत नाही. बॉलीवूड मध्ये काय चालते हे आपल्या सर्वाना माहित आहे. स्त्री कडे त्यांचा पाहण्याचा दृष्टीकोन काही नव्याने सांगण्याची गरज नाही. चित्रपटांमधून आपल्या समोर ते येतेच.

२०१३ मध्ये Daily News and Analysis ला दिलेल्या मुलाखतीत तिने म्हटलं:

"People in the industry treated me like I didn't deserve to be spoken to and I was some unwanted object. I couldn't speak English fluently and people made fun of me for that. So dealing with rejection became a part of life. ... All that has taken a toll, I guess. I find it hard to deal with praise. Today, when people say that I have made it and made it on my own, I feel like locking up myself somewhere ... It scares me."

संघर्ष, छळ त्यातून आलेल्या मानसिक, शारीरिक वेदना, नैराश्य तसे असह्यच. परंतु ती टिकली आणि आपलं अस्तित्व निर्माण केलं. त्यामुळे तिला या लोकांचा राग असणारच. तिच्या वाटेला आलेलं आयुष्य कसं असेल ते आपल्या गावी नाही. त्यामुळे आज जे काही कंगना करत आहे ते यातूनच आलं आहे असं म्हटलं तर हरकत नसावी.

ती कोणत्याही अवार्ड शो ला जात नाही कारण ते सगळं ठरवून केलेलं असते, मॅनेज असते असं तिचं मत. आजपर्यंत तिला तीन वेळा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार आणि चार वेळा फिल्म फेअर पुरस्कार मिळाले आहे अभियानाकरिता. याशिवाय तिला भारत सरकारच्या पद्मश्री या पुरस्काराने ने सुद्धा सन्मानित केलं गेलं आहे.

ती केवळ एका राज्याची नाही तर या देशाची नागरिक आहे. ती कुठे ही जाऊ शकते, राहू शकते. कुठलंही राज्य तिला तिचा तो हक्क नाकारू शकत नाही. देशात कायद्याचं राज्य आहे. तिचं काही चुकलं असेल तर कायदेशीर प्रक्रियेने तिच्यावर कारवाई करावी किंवा व्हायलाच पाहिजे.

याच बरोबर महिला सबलीकरणाच्या गप्पा करताना महिलांवर होणारे अत्याचार,त्यांचा छळ आपण टाळू शकलोय का, त्यांना खरं स्वातंत्र्य दिलंय का याचा ही विचार करण्याची गरज.एका महिलेला सुरक्षा पुरवून फार काही साध्य होणार नाही. साध्य होईल ते फक्त राजकारण. तुम्ही एक यशस्वी कलाकार आहात म्हणून कुठल्याही विषयावर आपण बोलू शकतो हा ट्रेंड अलीकडच्या काळात वाढीस लागला आहे.  राजकीय पक्ष फक्त आपला फायदा करून घेणार....दुसरं काहीच नाही.   कलाकारांनी हे टाळायला हवं.

एक अभिनेत्री, एक महिला म्हणून तिचा आदर...

सचिन भगत (९९२२१२७३८५)

श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय

शेगाव

राजू श्रीवास्तव

स्टँड-अप कॉमेडी हा कलाप्रकार फार प्रचलित नव्हता त्या काळात राजू श्रीवास्तव प्रसिद्धी झोतात आला. १९९३ पासून तो या क्षेत्रात काम करतोय. त्या काळी तंत्रज्ञान एवढं प्रगत नव्हतं. त्यामुळे तेवढी प्रसिद्धी त्याला कदाचित मिळाली नाही. मुळचा उत्तर प्रदेशातील कानपूरचा रहिवाशी असलेला राजू श्रीवास्तव आपलं करिअर घडविण्यासाठी मुंबईत आला. त्याचं खरं नाव सत्य प्रकाश श्रीवास्तव आहे.  सुरवातीला 'तेजाब' (1988), 'मैने प्यार किया' (1989) सारख्या काही चित्रपटांमध्ये  त्याने छोट्या-छोट्या भूमिका केल्या. सुरुवातीपासून त्याला कॉमेडिअन व्हायचं होतं. मात्र त्याला खरी ओळख मिळाली ती 'ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या मालिकेमधून. त्याला विजेता होता आलं नसलं तरी त्याची कॉमेडी मात्र लोकांना पसंत पडली.

त्यानंतर 'कॉमेडी का महामुकाबला', 'कॉमेडी सर्कस', 'लाफ इंडिया लाफ' आणि 'गँग्स ऑफ हंसीपूर'सारख्या कॉमेडी शोमध्ये त्याने सहभाग घेतला.  या शिवाय त्याने 'बिग बॉस'चे तिसरे पर्व आणि 'नच बलिए'चे 6 व्या पर्वातसुध्दा भाग घेतला.

देश-विदेशात त्याने आपले शो सादर केलेत. राजकारण, समाजकारण, आसपास घडणाऱ्या घटना, छोट्या-मोठ्या गोष्टींवर मिमिक्री करणे, कॉमेडी करणे यात त्याचा हातखंडा. व्यंग असो की विडंबन, विनोद असो की नक्कल अथवा शायरी  या सर्व गोष्टी तो कुशलतेने हाताळतो. आपल्या कॉमेडी मध्ये त्याने फालतू विनोद टाळले आहेत. असभ्य भाषा त्याने टाळली आहे. कुटुंबासोबत शो पाहता यावा असं त्याचं मत आहे. त्यामुळे पारिवारिक कॉमेडियन  ही प्रतिमा त्यानं कायम ठेवली आहे. आजकाल सर्रास अश्लिल कॉमेडी प्रसारित केली जाते. म्हणूनच तो वेगळा.



देशभरात विविध कार्यक्रमांमध्ये त्याने सहभाग घेऊन त्याने आपला शो सादर केला आहे. लोकांचं मनोरंजन केलं आहे. लोकांना हसवलं आहे. आजही यु ट्यूब वर सर्च केलं तर त्याचे अनेक शो आपल्याला पाहता येतील. त्याची स्वतःची एक स्वतंत्र शैली आहे सादरीकरणाची. प्रसंगावधान आहे. वेळेवर विनोद करण्याची कला अवगत आहे. शायरी, कविता, जोक्स तो सहजपणे सादर करतो.

अलीकडच्या काळात तो फारसा दिसत नाही. भारतात स्टँड-अप कॉमेडी रुजवण्यात मात्र त्याचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. कॉमेडी हा प्रकार लोकप्रिय करण्यात त्याचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्याला पाहून अनेक जण या क्षेत्रात उतरले. गेल्या काही वर्षात अनेक कलाकार कॉमेडी उदयास आले आणि प्रसिद्ध झाले. तरीही त्यानं आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलंय. प्रत्येकाला परिचित असं नाव आहे.  

सचिन भगत (९९२२१२७३८५)

श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय

शेगाव