Monday, January 27, 2020

नेमकं ४... (Article No.-100)


अभियांत्रिकीच्या (Engineering) पाचव्या आणि सहाव्या सेम (Semester) ला संभाषण कौशल्य (Communication Skills) हा विषय असतो. थेरी आणि प्रक्टिकल मिळून १०० गुण. तसं आठवड्याचे दोन तास आणि प्रक्टिकल दोन तासाच batch नुसार.
नेमकं संभाषण कौशल्य शिकवायचं कसं हा प्रश्न मला अनेकदा पडला आणि पडतोय. कारण त्यासारखं आव्हानात्मक काहीच नाही. जसं पोहणं शिकवता येत नाही तसंच. फार फार तर आपण मार्गदर्शन करू शकतो. दुसरं असं की आमचं जास्त काम motivation चं.
स्वतःला वृद्धिंगत करण्यासाठी वेगवेगळं काहीतरी करत असतो. पण काही ही करा माझं कधी समाधान झालं नाही किंवा होत नाही. विद्यार्थ्यांना काय अपेक्षित आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न सुरु असतो नेहमी.
मग जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्यांना विचारात असतो काय करायला पाहिजे म्हणून. गेल्या पाच-सहा वर्षांपासून External Practical परीक्षेच्या च्या वेळेस विद्यार्थ्यांकडून सूचना / सल्ला मागवत असतो. जे शक्य होते किवा आहे ते मी आमलात आणायचा प्रयत्न करतो.  एखाद्याचं मत negative असलं तरी ते स्विकारतो कारण स्वतःला अधिक समृद्ध करायचं आहे म्हणून. त्या विद्यार्थ्यांमुळे बरंच काही शिकता आलंय. त्याचे सल्ले नेहमीच फायदेशीर ठरलेत.

मध्यंतरी दोन दिवस  External Practical होतं. पुन्हा मी विद्यार्थ्यांना आपली मत मांडायला सांगितली. सुधारणेसाठी कुठे वाव आहे हे मला जाणून घ्यायचं होतं. तुम्हाला काय आवडलं नाही ते सांगा. Lecture/Practical चांगलं कसं करता येईल? मी काय करायला हवं? प्रत्येकाने काहीतरी सांगाव हे बंधनकारक.
काही मत/सूचना  पुढील प्रमाणे:
·          सेशन interactive असायला पाहिजे.
·        Activities जास्त आणि प्रत्येक विद्यार्थ्याचा सहभाग आवश्यक असला पाहिजे.
·        जो टोपिक शिकवला जातोय त्या संबंधित व्हिडीओ दाखवता येईल.
·        सेशन एक तासावरून ४५ मिनिटे असायला पाहिजे.
·         अर्ध्या तासानंतर ब्रेक पाहिजे.
·         सेशन मुव्ही सारखं पाहिजे. जसं मुव्ही बघायला कंटाळा येत नाही तसंच सेशन ला पण यायला नको.
·         विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्या.
·        विद्यार्थ्याना टास्क देऊन ते पूर्ण करून घ्यावे.
·        सेशन संध्याकाळी नसावं.
·          स्पर्धा आयोजित केल्या पाहिजे आणि त्यात तुम्ही पण सहभागी व्हावं.
अश्या अनेक सूचना/सल्ले आलेत. सगळेच अंमलात येत नाही.  कुणी म्हटलं सर पुस्तक लिहा, कुणी म्हटलं यु-ट्यूब  (YouTube) channel सुरु करा.
मी सगळ्यांचं ऐकून घेतलं. एका कागदावर लिहून घेतलं. जे लोजिकल (Logical) आहे ते आमलात येईलच.
माझा तास तसा शेवटी असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी जाण्याची ओढ असते. Mind-set वेगळा असतो. मी मात्र तसाच. वेळ कुठलीही असो फार काही फरक पडत नाही. वातावरण हसत-खेळत ठेवण्याचा प्रयत्न असतो. जगता-जगता शिकता आलं पाहिजे आणि शिकता-शिकता शिकता जगता आलं पाहिजे असं माझं मत आहे.
मुळात आपल्याला असलेलं ज्ञान ही प्रचंड कमी आहे. स्वतः ला समृद्ध करण्यासाठी खूप वाव आहे. पण ती शिकण्याची प्रक्रिया थांबून गेलीय. मग ते कधी काळी शिकलेलं आपण सांगत असतो किंवा त्याचं पद्धतीने शिकवत असतो. मग नवीन काय हा प्रश्न येतोच. आजकालच्या विद्यार्थ्यांना ते पचनी पडू शकत नाही. हे सत्य स्विकारलं तर कुठेतरी बदल होऊ शकतो.
एक तास वर्गात जाऊन बडबड करणे या व्यतिरिक्त काय? आपण विद्यार्थ्यांना चर्चेत सहभागी करून घेतो की कधीतरी शिकलेलं बोलून बाहेर पडतो? फक्त वेळ मारून नेण्यासाठी हा खटाटोप नाही. तसंही कित्येकदा विद्यार्थी तासाला येत नाहीत. ते यायला हवेत तशी वातावरण निर्मिती आपण कधी करत नाही. त्यामुळे फक्त विद्यार्थ्यांना दोष देता येत येणार नाही. आपण सारे दोषी.
आयुष्यात पुढे जायचं असेल तर criticism सुद्धा पचवता आलं पाहिजे.  Learn to accept criticism…सगळ्यात मोठं आव्हानं आहे.
स्पर्धेत टिकायचं तर आपल्यातील कमतरता दूर करता आल्याच पाहिजे.
काही विद्यार्थी म्हटले आम्ही १०-१५ मिनिटांपेक्षा जास्त ऐकू शकत नाही. लक्ष केंद्रित करता येत नाही. तो आमचा प्रोब्लेम आहे. पण तो त्यांचाच नाही तर आपलाही आहे. कारण आपण ऐकतो ते व्यक्त होण्यासाठी, प्रतिक्रिया देण्यासाठी, समजण्यासाठी नव्हे. समोरचा व्यक्ती पूर्ण सांगण्याआधी आपण बोलायला सुरु होतो. त्याचं ऐकत ही नाही. समोरच्या व्यक्तीला काय म्हणायचं आहे ते समजण्या-आधी आपण उडी घेतलेली असते.
ज्ञानार्जन / ज्ञानाचं आदान-प्रदान हे कधीही एकांगी होऊ शकत नाही. ते दुहेरी आहे.
तसच “Education is not an entertainment. It is not a movie. It is a process.”
विद्यार्थी हुशार असतात हे आपण मान्य केलं पाहिजे. काळ बदलला आहे. ते शिक्षकांवर पहिल्यासारखे अवलंबून नाहीत. ते आधीच बरंच काही शिकलेले असतात. त्यांना काहीतरी नवीन हवं असतं. आपण मात्र बदलायला तयार नाहीत. डिग्री आली म्हणजे ज्ञान येत नाही हे समजणे फार महत्त्वाचं. दुर्दैवाने तसं होत नाही. मानसिकता बदलायला आपण तयार नाही. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातले अंतर कमी व्हायला हवं, दरी कमी व्हायला पाहिजे.

Generation Gap मोठा आहे. आपण जे तिशीनंतर शिकलो ते वयाच्या चौथ्या –पाचव्या वर्षी शकतात मुले/आजची पिढी. कित्येकांच्या लक्षात येत नाही. तिथूनच खरी समस्या सुरु होते. मग आपलं सुरु होते...आजकालचे विद्यार्थी सिरिअस नाहीत...त्यांना टाईमपास हवा असतो...आम्ही असे नव्हतो वगैरे वगैरे...पुराण.
आपल्याला  असं का वाटते याचा  आपण कधी विचार केलाच नाही. हे एकविसावं शतक आहे याचा विसर पडलाय आपल्याला.  तंत्रज्ञानाने शिकणं सोपं केलंय. एका क्लिक ने ज्ञानाचं भांडार खुलं झालंय. ज्ञान आणि पदवीचा दूर-दूरचा ही संबंध नाही.
शिक्षण पद्धती बदलते आहे...विद्यार्थी बदलत आहेत...तसंच शिक्षकांनी बदलायला हवं.
तसंही हा विषय गंभीर आहे...अनेक पदर आहेत याला. त्याबद्दल न बोललेलं बरंच.
बदल...सर्वांनी अंगिकारला पाहिजे. विद्यार्थी असो की शिक्षक.
मध्यंतरी एक मित्र भेटला...म्हटला पि.एच.डी. कुठपर्यंत आलीय?
बंद आहे...काम केलंच नाही. मी उत्तरलो.
त्यावर तो म्हटला, मग पगार कसा वाढणार?
जाऊ दे. दुसरा विषयावर बोलूया. असं म्हणून मी तो विषय बदलला.
पि.एच. डी. आणि पगारवाढ या दोन गोष्टी घट्ट झाल्यात. पगारवाढ आहे म्हणून पि.एच. डी..
नाहीतर काय? आपण सुज्ञ.  त्यामुळे लाखो पि.एच. डी. होऊन बाहेर पडलेत पण कुठंय संशोधन. शोधून ही सापडणार नाही. हिच आपली मानसिकता. याच्या बाहेर आपण कधी येणार?
शिक्षकांच्या पदव्या वाढत जातात पण ज्ञानात मात्र फारसा फरक पडत नाही.  कारण ज्ञानासाठी पदव्या घेतल्याच जात नाहीत. तिच तर मोठी गोची आहे. आणि ती सर्वश्रुत आहे.
कधीतरी हे चित्र पालटेल या आशेवर...


सचिन भगत (9922127385)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय
शेगाव

1 comment: